Saturday, December 28, 2019

भाषिक प्रभावाचे भरजरीपण


🔶भाषिक प्रभावाचे भरजरीपण🔶

➡️ डाॅ.अमृता इंदूरकर

       मानवाचे संपूर्ण जगणे सततच कशा ना कशाच्या प्रभावामुळे कायम परिवर्तनशील असते. मानव कशाने तरी प्रभावित झालाच नसता तर त्याचे जगणे, वागणे, बोलणे, त्याच्या सगळ्या कृती यंत्रासारख्या एकसुरी झाल्या असल्या. त्याच्या आयुष्यात साैंदर्याचा अभाव कायमच राहिला असता. या अशा अभावापेक्षा कशाचा तरी चांगला प्रभाव असणे, विकसिनशिलतेला केव्हाही सहाय्यभूतच ठरणारे आहे. मानवच काय बारकाईने बघितले तर संपूर्ण विश्वच कुठल्या ना कुठल्या प्रभावाने प्रेरित झालेले दिसते. निसर्ग देखील यातून सुटला नाही. सूर्याचा चंद्रावर प्रभाव, चंद्राचा सागरावर प्रभाव, वृक्षांवर वर्ष, अवर्षणाचा प्रभाव इतकेच काय एखाद्या महाकाय वृक्षावर पसरलेल्या वेलीचा त्या संपूर्ण वृक्षावर प्रभाव असतो. निसर्गाचा मानव व प्राण्यांवरील प्रभाव, प्राण्यांवर मानवाचा प्रभाव, मानवावर मानवाचा प्रभाव असे कितीतरी प्रभाव घेऊन आपण जगत असतो. निसर्ग जर का मोठ्या मनाने हा प्रभाव स्वीकारतो तर मानवाची आद्य आेळख असणारी भाषा, त्यावरील पडलेल्या अन्य भाषाप्रभावांबद्दल आपण का संकुचित विचार करतो? उलट ज्याप्रमाणे एखादे तलम वस्त्र त्यावर केल्या गेलेल्या रेशमी अथवा जरतारी कामाच्या प्रभावाने अधिक साैंदर्यपूर्ण बनते, त्याचप्रमाणे एखाद्या भाषेत अन्य भाषेच्या प्रभावातून समाविष्ट झालेल्या नव्या शब्दांमुळे ती भाषा अधिक साैंदर्यपूर्ण लवचिक व समकाळात आपले नावीन्यपूर्ण अस्तित्व टिकवून ठेवणारी भाषा म्हणून लोकप्रिय ठरते. अर्थात इथे भाषिक प्रभाव आणि भाषाभ्रष्टता यांमध्ये गल्लत करता कामा नये. मराठी भाषा देखील आज अन्य भाषांचे प्रभाव मोठ्या मनाने आत्मसात करून भाषेच्या जागतिक व्यापक अशा पटावर खंबीरपणे उभी आहे. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत मराठीवर बऱ्याच भाषांचा प्रभाव पडलेला आहे. त्यातील काही प्रमुख भाषा प्रभाव आपण विस्ताराने बघूया.

प्रभावाची कारणे :

 विकसित होणारी कोणतीही भाषा एकजिनसी राहू शकत नाही हे आजपर्यंत मराठीची उत्पत्ती व वाढ पाहताना आपल्या ध्यानात आले आहे. कोणतीही जिवंत भाषा आपल्या मूळ स्वरूपात उरत नाही. परकीय आक्रमणे, राज्यक्रांती, दुष्काळादी आपत्ती, वैचारिक क्रांती इत्यादी विविध कारणांनी मानवी समूहांचे भ्रमण व मिश्रण सुरू होते. रीतिरिवाज, चालीरीती, पोषाखपद्धती, वाङमय, आवडीनिवडी यांच्यात देवाणघेवाण सुरू होते. मराठी एक वर्धिष्णू भाषा असल्याने ती या नियमास अपवाद राहिली नाही. वरील सर्व कारणांमुळे जे-जे फरक मानवी जीवनात झाले ते ते मराठी भाषेने नोंदविले आहे. इतर भाषांचे परिणाम घेऊनही मराठी भाषा वाढतच राहिली.

१) संस्कृत भाषेचा प्रभाव

संस्कृत व मराठीचा संबंध अतूट असा आहे.यादवकाळानंतर मराठी भाषेत संतांनी व पंडितांनी जे एेश्वर्यशाली वाङमय निर्माण केले त्याला आधार केवळ संस्कृतच आहे. वेदांचे बीज म्हणजे भगवद्गीता त्यावर कितीतरी मराठी कवींनी लिहिले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ महाराज यांच्या एकूणच साहित्यनिर्मितीचा आधार संस्कृत साहित्यच होते. पुढे शिवकाळातील मराठी काव्यास पंडिती वळण मिळाले व वामनपंडित, रघुनाथ पंडित, नागेश, विठ्ठल, मोरोपंत यांनी वृत्ते, शब्दरचना, समासप्राचुर्य, अलंकार, शृंगारादी वर्णनाचा अतिरेक इत्यादी बाबतीत संस्कृत भाषेचे अनुकरण केले. अव्वल इंग्रजीच्या काळात शास्त्री पंडितांनी काव्य व नाटक या क्षेत्रांत भाषांतरे केली ती संस्कृत भाषेतील ग्रंथाचीच.
      
 देव, धर्म, संस्कृती, ऐतिहासिक परंपरा, तत्त्वज्ञान, साहित्य, धर्माचार, कुलाचार, व्रतवैकल्ये इत्यादी बाबतीत आजही मराठी जीवन संस्कृतप्रचुर आहे. राजा, देव, देव, दर्शन, नृत्य, मंदिर, मेघ, पृथ्वी, प्रकाश, आकाश, चंद्र, सूर्य, तारा, शिखर, ब्राह्मण, पूजाअर्चा, निर्माल्य, उपचार, उपकार, दीप, पत्र, पुष्प, नैवेद्य, गंध, अभिषेक, मंत्र, घंटा, कलश, मूर्ती, पंचायतन, आसन, तीर्थ, प्रसाद, कथा, कीर्तन, आख्यान, नमन, तिथी, होम, हवन, तर्पण, क्षेत्र, पितामह, भोजन इत्यादी शेकडो तत्सम संस्कृत शब्द आज मराठी म्हणूनच वावरत आहेत. तर घर, हात, नाक, तण, पान, माकड, कमळ, कळशी, कान, पोथी, तोंड, पाय इत्यादी अनेक शब्दाची रूपे संस्कृतापासून आलेली आहेत. ज्यांना तद्भव शब्द म्हटले जाते. याशिवाय ‘अव्यापरेषु व्यापार’, ‘येनकेन प्रकारेण’, ‘पुनश्च हरी: ओम’,‘शुभस्य शीघ्रम्’,‘ प्रथमग्रासे मक्षिकापात’ इत्यादी शेकडो वाक्प्रचार आपण मराठीत वापरतो, ते संस्कृतमधीलच. सुभद्रा, अरविंद, मृणालिनी, पद्मावती, रवींद्र, अनुजा, शकुंतला, अनसूया इत्यादी विशेषनामे संस्कृत आहेत.

२) कन्नडचा प्रभाव :

 प्राचीन काळात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र इत्यादी प्रदेशावर सारख्याच राजवटी असल्याने देवणाघेवाण फार मोठ्या प्रमाणावर होत होती. भक्तीमार्गियांचे मुख्य दैवत विठोबा हे कर्नाटकी वा कानडी असल्याचे सर्वज्ञात आहेतच. शहाजीराजे, व्यंकोजीराजे, राजाराम इत्यादींचा दक्षिणेचा संबंध इतिहासात प्रसिद्ध आहे. तंजावर, बंगलोर, जिंजी, म्हैसूर इत्यादी प्रांतात जी मराठी कुटुंबे गेली, त्यांनी तेथील संस्कार आत्मसात केले. कन्नड, तेलुगू इत्यादी भाषातील काही शब्द ज्ञानेश्वरांच्या काळातील मराठीतही दिसून येतात. आरोगणे, आळ, उंडी, उळीग, गुंडा, गुढी, किडाळ, पोकळ, पहुडणे, कोंदण, तूप, कैवार इत्यादी, कन्नड शब्द जुन्या मराठीत दिसतात. बसव, विरण्णा, कोचाळे, तुवा, आेटा, गड्डा, बांबू, परडी, आेंडा इत्यादी शब्द सीमाप्रदेशात आजही वापरले जातात. ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, ळ हे मूर्धन्य उच्चार द्राविडी भाषांतून मराठीत आले. वस्त्रप्रकारात बंडी, लंगोटी, चोळणा, कांबळे, चिरगूट, गादी, तर उडीद, कलिंगड, पडवळ, चिंच, कोथिंबीर हे धान्य व फळे प्रकारात आेगराळे, गाडगे, तांब्या, हंडा, रोवळी हे उपकरणे प्रकारातील कन्नड शब्द आजही मराठीत वापरले जातात.
याशिवाय इरिंग मिरिंग लवंगा तिरिंग, आपडी थापडी गुळाची पापडी, अडगुले मडगुले, आैंडक चाैंडक इत्यादी खेळ व तत्संबंधी शब्द दक्षिणेकडूनच मराठीत आले.

३) फार्सीचा प्रभाव :

मराठी व फार्सी यांचा संबंध जवळ - जवळ ४५० वर्षांचा आहे. त्यामुळे फार्सीतील स्वर, शब्द, व्याकरणीक वैशिष्ट्ये आणि वाक्यप्रचार मराठीत आलेले आहेत. या खुणा ठिगळाप्रमाणे वर दिसत नाहीत.त्या मराठीच्या मुळाशी आहेत. जाजम, जमीन, ताकद आजमावणे, जिकीर, गरीब, जोर, गपगुमान हे सर्व शब्द फार्सी आहेत उदा. जिकीर हा शब्द जिक्र यावरून आला आहे, शतरंज या खेळासाठी जे अंथरतात त्याला सतरंजी केले.
शब्दसिद्धी, वाक्यरचना, वाक्प्रचार, म्हणी, फार्सीच्या प्रभावातील आहेत. दानत, सरकार, इनाम, तारीख, मजकूर, वजीर, पेशा, जिन्नस, तसवीर असे अनेक शब्द फार्सीतून मराठीत आले. वजा, बाकी अस्सल, एकदा, खुद्द, ही काही विशेषणे फार्सी आहेत. बस्स, अलबत, बेशक, खूप, वाह, शाबास, हाय अशी उद्गारवाची अव्यये फार्सी आहेत. हमेशा, बिलकुल, वारंवार ही क्रियाविशेषणे आणि दम घेणे, खरेदी करणे, नजर राखणे इत्यादी, संयुक्त क्रियापदांवर कार्याचा प्रभाव आहे. अमीर उमराव गरीबगुरीब अक्कलहुशारी, आलमदुनिया असे सामाजिक शब्द फार्सी प्रभावातून आले आहेत.

४) हिंदीचा प्रभाव :

मराठीशी हिंदीचा संबंध नामदेवांच्या काळापासून आहे. बहुतेक मराठी संतांनी हिंदीतून देखील रचना केल्या आहेत. अशा धार्मिक व राजकीय कारणांमुळे हिंदी- मराठी संबंध लक्षात घेण्याजोगा आहे. मराठीवरील हिंदीचा प्रभाव हा स्वर व उच्चारण पातळीवर झालेला नाही, पण बरेचसे रूढ शब्द आणि काही व्याकरणिक वैशिष्ट्ये यातून हा प्रभाव दिसतो. पण, तो कानडी, फार्सी इतका विस्तृत परिणाम करत नाही. हिंदीतील काही शब्द मराठीने जसेच्या तसे स्वीकारले आहेत. उदा. संपन्न, ऋण, धन्यवाद, योगदान, घेरावो वरून घेराव, याशिवाय कुमारी,साैभाग्यवतीच्या जागी श्रीमती, मान्यवर, सबकुछ, कक्ष, भाई, भैय्या, दीदी इत्यादी. मोलमजुरी, रितीरिवाज, धनदाैलत हे तर मराठीत मिसळले आहेत. ‘चोर तर चोर वर शिरजोर’, ‘हाजीर तो वजीर’, ‘छपडा छुपडा धनी का माल’ अशा कितीतरी हिंदीतल्या म्हणी मराठीत रूढ झाल्या आहेत.

५) इंग्रजीचा प्रभाव :

इंग्रजी राजवटीच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे मराठीवर इंग्रजीचा फार मोठा प्रभाव आहे. इंग्रजी नेत्यांची भाषा असल्यामुळे तिच्यातील शब्द वापरणे व इंग्रजी संस्कृतीतील अनेक गोष्टी स्वीकारणे अव्वल इंग्रजीच्या काळापासून घडलेले दिसते. त्याकाळात मराठीत लेखन करणारे पुढारी आणि विद्वान इंग्रजीतून प्रथम विद्या संपादन करीत व मग ती मराठीत येत असे. त्यामुळे कालांतराने दैनंदिन जीवनातील शब्द संग्रहाच्या बाबतीत असे म्हणता येते की स्वयंपाक घरापासून सभागृहापर्यंत मराठीत इंग्रजीचा वावर वाढला. टेबल, पेन, बोर्ड, ग्रुप, ग्राऊंड, बेल, फी, साॅरी, इन्स्पेक्टर, शर्ट, कोट, बटन, काॅलर, बूट,डाॅक्टर, व्हिजिट, कंपाऊंडर, डोझ, ड्रेसिंग, रेल्वे स्टेशन, कंडक्टर, कार्ड, मनीऑर्डर, पोस्टऑफिस, न्यूज, हेडलाइन, असे कितीतरी शिक्षणविषयक, पोषाख, दवाखाना, प्रवास, पोस्टांचे व्यवहार, वृत्तपत्रलेखन इत्यादी क्षेत्रांमध्ये इंग्रजी शब्द समाविष्ट झाले. अनेक इंग्रजी वाक्प्रचार मराठीत भाषांतर करून वापरले जाऊ लागले. गेट आऊट, टू बेल ए कॅट, याशिवाय शाॅर्ट व्हिजिट, आेपन डिस्कशन, थ्रो लाईट अपाॅन इत्यादीसारखे छोटी वाक्ये सहजपणे आज मराठीत वापरतात.
        इंग्रजीचा प्रभाव स्वीकारताना मराठी मोडणीचे भान सुटता कामा नये. फारसी, हिंदी आणि इंग्रजी यापैकी फारसीच्या प्रभावाला मराठीचे मराठीपण बदलता आले नाही. इंग्रजीबद्दल मात्र ती भीती आहे. आजही शासकीय आणि ज्ञानात्मक व्यवहार आधी इंग्रजीतून व नंतर देशी भाषांमधून होतात. पण, मराठी ही जिवंत भाषा आहे याचे भान राखून मराठी शिकवणे, शिकणे आणि बोलणे होणे आवश्यक आहे.

(लेखिका भाषाशास्त्री, साहित्यिक आहेत.)

दि.२२/१२/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Monday, December 9, 2019

आंबेडकरवादाचे समर्थ भाष्यकार:यशवंत मनोहर

🔶आंबेडकरवादाचे समर्थ भाष्यकार:यशवंत मनोहर🔶

➡️ डाॅ.अमृता इंदूरकर

विसाव्या शतकातील वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. आत्मग्लानीत असलेल्या भारतीय जनमानसाला एक नवी विज्ञानसापेक्ष जीवनदृष्टी देण्याचे महत्कार्य बाबासाहेबांनी केले. ६ डिसेंबर ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी, महापरिनिर्वाण दिन म्हणून सर्वत्र आदरांजली अर्पण केली जाते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस्र व्यक्तिमत्त्व आजही आपणा सर्व भारतीयांना सदैव स्फूर्ती देणारे व दिशादर्शक, प्रेरणादायी आहे. या जीवनसागरात वैचारिकदृष्ट्या भरकटलेल्यांसाठी बाबासाहेब जणूकाही दीपस्तंभ आहेत. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने ‘ज्ञानाचे प्रतीक’ असे संबोधून या भारतमातेच्या सुपुत्राचा गौरव केला आहे. विद्वत्तेचे प्रकांड पंडित, अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेपंडित, पत्रकार, संसदपटू, समाजसुधारक, राजकीय मुत्सद्दी आणि बौद्ध धम्मचक्र अनुप्रवर्तक असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट वक्ते आणि बुद्धिवादी विचारवंत असल्यामुळे त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम समग्र भारतीय जीवनावर झाला. या परिणामापासून मराठी साहित्य तरी त्याला कसा अपवाद असणार? बाबासाहेबांच्या कार्याचा दृश्य परिणाम जसा त्यांच्या हयातीत राजकारणावर, समाजकारणावर आणि धर्मकारणावर दिसू लागला तसा तो साहित्यावर दिसू शकला नाही, पण त्यांच्या मरणोत्तर दलित वर्गातून साहित्यिकांचा असा वर्ग उसळून वर आला की ज्याने मराठी साहित्यांची पुनर्व्यवस्था अपेक्षिली.

 साहित्याबद्दल डाॅ. बाबासाहेबांचे विचार वर्षानुवर्षे चालत आलेल्या वाङ्मयीन विचारधारेपेक्षा निराळे होते. ते म्हणत, ‘what instructs me, amuses me’. मनोरंजनवादी साहित्य आंबेडकरांना व साहित्यात पुढे येऊ घातलेल्या आंबेडकरवादी साहित्याला देखील मान्य नव्हते. जे साहित्य मला प्रेरणा देतं, तेच माझी करमणूक करतं असे त्यांचे स्पष्ट मत होते. वाङ्मयाने कायमच वाचकापुढे मानवाला उपकारक असा उजेड अंथरावा. जीवनाचा गहन अर्थ सांगून वाचकाला अंतर्मुख करावे. साहित्यातून माणुसकीचे अधिक डोळस, समंजस, परिवर्तनदर्शी रूप प्रस्थापित व्हावे. हे करणे म्हणजेच बाबासाहेबांना अपेक्षित असणारे instruct करणारे साहित्य होय.

१९६० पासून दलित साहित्याची निर्मिती होऊ लागली. कथा, कविता, कादंबरी, वैचारिक निबंध या वाङ्मयप्रकारात दलित साहित्याची व नवनव्या साहित्यकारांची भर पडायला लागली, पण या सर्व वाङ्मयप्रकारात बाबुराव बागुल, डाॅ. भालचंद्र फडके प्रा. रा. ग. जाधव या समीक्षकांचा अपवाद वगळता दलित साहित्य समीक्षेचे क्षेत्र मात्र तितकेसे जोरकस, काटेकोर असे नव्हते. या दलित साहित्य समीक्षेला असे काटेकोर अधिष्ठान देण्याचे कार्य आंबेडकरवादी विचारवंत, समीक्षक डाॅ. यशवंत मनोहर यांनी ‘दलित साहित्य : सिद्धान्त आणि स्वरूप’, ‘दलित साहित्य चिंतन’, ‘समाज आणि साहित्यसमीक्षा’, ‘परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये इत्यादी पुस्तकांमधून आंबेडकरवादी सौंदर्यशास्त्राचा आग्रह मांडलेला आहे. मात्र पुढे १९९९ साली आपल्या 'आंबेडकरवादी मराठी साहित्य’ या ग्रंथांची निर्मिती करून एकूणच दलित साहित्य समीक्षेला एक आगळी वेगळी दिशा दाखविलेली आहे. मराठी साहित्यात सुसूत्रपणे आंबेडकरवादाची मांडणी करणारे ते अग्रनायक, प्रथम भाष्यकार ठरले.

एक कवी म्हणून आपल्या काव्याद्वारे मनोहरांनी आपल्या परिवर्तनवादी कवितेला कायमच जडवादी नैतिकतेचे रेखीवपण बहाल केले आहे. तर आपल्या साहित्य समीक्षेतून त्यांनी परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि सौंदर्यमूल्ये यांची एकजीव मांडणी करणाऱ्या जडवादी सौंदर्यविज्ञानाचा ध्यास प्रकट केला आहे. या ध्यासाचे अलीकडचे मूर्त रूप म्हणजे त्यांचा अलिकडे प्रकाशित झालेला ‘साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र’ हा ग्रंथ, पण ‘आंबेडकरवादी मराठी साहित्य’ या ग्रंथामधून आंबेडकरवादी साहित्याची संज्ञा व संकल्पनेचा जो पाया रचला गेला, त्यावरच आजवरचे आंबेडकरवादी साहित्य वाटचाल करीत आहे, हे नाकारता येत नाही.

एकूणच विविध मराठी वाङ्मयप्रवाहांमधे दलित साहित्य या संज्ञेखाली दलित साहित्याचा प्रारंभ झाला असला तरी या संज्ञेच्या मर्यादित चौकटी पार भेदून डाॅ. मनोहरांनी या साहित्याला आंबेडकरवादी विचारधारेचे बळ दिले आणि जे तेज निर्माण केले त्यातून एकूणच दलित साहित्याचा पैस लांबी, रूंदी, खोली, उंचीने समकालीन साहित्यात अधिकच वेगवान झाला. दलित साहित्याला दलित साहित्य असे न संबोधता आंबेडकरवादी साहित्य का म्हटले पाहिजे किंवा भविष्यात आंबेडकरवादी साहित्य का निर्माण व्हायला पाहिजे, याचा खुलासा करताना डाॅ. मनोहर म्हणतात, ‘बुद्ध फुल्यांना सोबत घेऊन निघालेले आंबेडकरसूत्र ही युगाची गरज आहे. या सूत्राला आपण हृदयात, मेंदूत जागा करून दिली पाहिजे. त्यासाठी दलित हे विशिष्ट सामाजिक स्तराचे वर्णन करणारे सूत्र आपण मनातून काढून टाकले पाहिजे. या ना त्या पातळीवरची विभाजनाची प्रक्रिया आपण थांबविली पाहिजे. जोडण्याच्या, अभिसरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला पाहिजे. यापुढे कोणालाही दलित म्हणवून घेणे आवडणार नाही, असे सांस्कृतिक पर्यावरण साकार झाले पाहिजे. त्यामुळे आंबेडकरवादी साहित्य ही संकल्पना आपण स्वीकारणे हे प्रत्यक्ष जीवनक्रांतीच्या दृष्टीने आणि साहित्यक्रांतीच्या दृष्टीने हितावहच ठरणारे आहे."

डाॅ. मनोहरांच्या दृष्टीने जीवननिष्ठेतून जन्माला येणारी ज्ञाननिष्ठा हा philosophy या शब्दाचा अर्थ आहे. दलित साहित्य ही संज्ञा तत्त्वज्ञानाचा निर्देश करीत नाही. ही संज्ञा विवक्षित तत्त्वज्ञानाचे अधोरेखन करीत नाही. ही संज्ञा ढगळ आहे. तिच्यामागे रेखीव असे तात्त्विक अधिष्ठान नाही असे निश्चित, ठोस, तात्त्विक अधिष्ठान त्यांना साहित्याचा आणि जीवनमूल्यांचा परस्परसंबंध असलेल्या आंबेडकरवादी साहित्यविचारात दिसले. 

➡️ डाॅ. मनोहरांनी त्याची सुस्पष्ट कल्पना येण्यासाठी आंबेडकरवादी वाङ्मयदृष्टीची भूमिका स्पष्ट करणारे पाच मुद्दे मांडले आहेत.

१) उदात्त जीवनमूल्ये
२) सर्व जीवनाला कवेत घेणारी कलावंतमनाची व्यापकता
३) अज्ञान, दु:ख, दारिद्र्य दूर होईल हे लक्ष्य
४) उपेक्षितांचे जीवन उन्नत व्हावे ही आंतरिक निष्ठा
५) या जाणिवेचे मानवता असे नाव मानणे

या मुद्द्यांना अनुसरणारी आंबेडकरवादी साहित्यनीती स्पष्ट करणारी वाङ्मयीन मूल्येही डाॅ. मनोहरांनी सांगितली आहेत. त्यांच्या मते झोप उडणे, विचारशक्ती जागी होणे, तंद्री लागणे हा सर्व साहित्याचा हेतू आहे आणि ते मनोरंजनवादी होणार नाही, यासाठी ‘जिवंत’ अभिव्यक्तीची आणि सौंदर्यबंधाची जोड कलाकृती लाभली पाहिजे. असे सौंदर्यसामर्थ्य अर्थातच कलाकृतीत बाहेरून आणून ओतता येत नाही. ते कलाकृतीतील अनुभवात, अनुभवाच्या आशयात आणि या सर्वाचे संयोजन, संघटन करणाऱ्या जीवनदृष्टीतच असते. अभिव्यक्तीचा जिवंतपणा हा तिच्या उत्कटतेचा, प्रत्ययकारितेचा द्योतक आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की प्रस्तुत ग्रंथाद्वारे आंबेडकरवादी जीवनमूल्ये हीच खऱ्या वाङ्मयीन महत्तेचे सर्जन करणारी सौंदर्यमूल्ये आहेत. असा निष्कर्ष डाॅ. मनोहरांनी काढलेला आहे.

साहित्यिकांना दलित या नाभाभिधानामुळे नकळत झालेला न्यूडगंडाचा स्पर्श डाॅ. मनोहरांच्या या तत्त्वज्ञानात्मक शास्त्रीय मांडणीमुळे पुसून जाऊन त्यांना आत्मशक्तीचा प्रत्यय आला. त्यांच्यातील संघर्षशीलतेला धार चढली. वैचारिक स्वातंत्र्याचे वारे अंगाअंगात भिनून आक्रमकपणे एका सामाजिक संघर्षासाठी त्यांची वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वे पेटून उठली. या ग्रंथाच्या निमित्ताने मनोहरांनी आंबेडकरवादी साहित्यिकांसाठी असा दीपस्तंभ निर्माण केला आहे, की ज्याच्या प्रकाशात आंबेडकरवादी लेखकांच्या पिढ्यानपिढ्या आपल्या उच्च ध्येय आणि उद्दिष्टांकडे सातत्याने अग्रेसर होत राहतील. या ग्रंथाद्वारे डाॅ. यशवंत मनोहरांनी एकूणच दलित साहित्यप्रवाहांचे आंबेडकरवादी विचारधारेच्या अंतर्गत येणाऱ्या मानवतेच्या, समतेच्या अनुषंगाने पुनर्मूल्यांकन केलेले आहे. म्हणूनच डाॅ. यशवंत मनोहर खऱ्या अर्थाने आंबेडकरवादाचे समर्थ भाष्यकार आहे.

(लेखिका भाषाशास्त्री, साहित्यिक आहेत.)

दि.८/१२/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, December 8, 2019

मूळ शब्द शोधा क्र.२

🔶मूळ भाषेतील शब्द शोधा🔶

प्रश्न १- ' ताम्बूल' शब्द कोणत्या भाषेतील आहे जो संस्कृतमधे समाविष्ट झाला.
अ) रोमन
ब)तुर्की
क)बंगाली
ड)ऑस्ट्रिक

उत्तर-ड- ऑस्ट्रीक

संस्कृतमधे ऑस्ट्रीक भाषेतून देखील शंभरपेक्षा जास्त शब्द समाविष्ट झालेले आहेत.'ताम्बूल' हा शब्द ऑस्ट्रीक भाषेतून आला आहे.हा शब्द आपण हमखास पौरोहित्य करणार्या भटजींच्या तोंडून पूजाविधींमधे संस्कृतमधून नेहमीच ऐकतो.

प्रश्न २- यवन,यवनिका हे शब्द कोणत्या मूळ भाषेतून संस्कृतमधे आलेत?
अ)ईराणी
ब)यूनानी
क)अर्धमागधी
ड)प्राकृत

उत्तर-ब-यूनानी

सिकंदर भारतात येण्यापूर्वीपासून यूनान व भारतामधे बरेच जुने व्यापारी संबंध होते.या संपर्कामुळेच बरेच शब्द यूनानी भाषेने संस्कृतमधून घेतले तर संस्कृतने यूनानीमधून घेतले.म्हणजेच यूनानी-संस्कृतमधे त्यावेळी भाषिक आदानप्रदान झालेले आहे.परिणामस्वरूप यवन,यवनिका यूनानीमधून सहजच संस्कृतमधे आले व कालांतराने मराठीने देखील घेतले.

प्रश्न ३- ' मिहीर' म्हणजे सूर्य.हा कोणत्या भाषेतून आला ?
अ)अरबी
ब)ईराणी
क)उर्दू 
ड)संस्कृत

उत्तर-ब-ईराणी

भाषावर्गिकरणानूसार भारतीय भाषापरिवारातील 'भारत-ईराणी'ही एक शाखा आहे.या शाखेमधे ईराणी अंतर्गत अवेस्ता,फारसी,पश्तो आदि भाषा येतात.यापैकी कोणत्याही भाषेमधून मिहीर शब्दाचे आदानप्रदान झालेले संभवते;म्हणून इथे पर्यायांमधे सर्वसमावेशक असा ईराणी हा पर्याय दिला आहे.ईराण आणि भारतातील संबंध प्राचीन आहेत.यामुळे ईराणी भाषांमधून शेकडो शब्द भारतात आले.मिहीरप्रमाणे 'बादाम'हा शब्द देखील ईराणमधूनच आलेला आहे.

डाॅ. अमृता इंदूरकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

मूळ भाषेतील शब्द-१

🔶मूळ भाषेतील शब्द शोधा🔶

◾ प्रश्न १- ' प्रावृष' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? ज्याचे मराठीतील बदललेले रूप 'पाऊस' आहे.
अ)मागधी
ब) पाली
क) शौरसेनी
ड)महाराष्ट्री

➡️ उत्तर:-ब -पाली

मराठीत शेकडा सत्तर टक्के शब्द संग्रह संस्कृतनिष्ठ असले तरी मराठी भाषानिर्मीतीसाठी अनेक प्राकृत व अपभ्रंश भाषांची देखील मदत झालेली आहे.एखाद्या शब्दाचे मूळ रूप संस्कृत असले तरी कालांतराने त्यामधे होत जाणारे स्वनलोप,स्वनरूपांतर,वर्णबदल,प्रयोगातील वेगळेपणा,वचनबदल तर उच्चारबदल इत्यादींमुळे ते रूप परिवर्तन होत होत पुढील भाषेत ते बदललेले रूपच तो शब्दच बनून जातात.'प्रावृट्'चे एक वचन प्रावृष आहे पण पुढे वर्णबदल होता होता पालीमधे प्रावृष रूढ झाले व कालांतराने त्याचे पाऊस झाले व मराठीत ते रूढ झाले.  

प्रश्न २- 'तहान'हा शब्द कोणत्या भाषेतील आहे जो मराठीतही सहज वापरल्या जातो?
अ) प्राकृत
ब)अर्धमागधी
क)पैशाची
ड) पाली

➡️ उत्तर:-क-पैशाची

मराठीने पैशाची भाषेतील एक विशेष उचललेला आहे.तो म्हणजे पैशाचीत 'ण'कार नाही,'ण'साठी नेहमी 'न'चा वापर झालेला आहे.मराठीने 'ण'चा 'न'करण्याची प्रवृत्ती पैशाचीकडून घेतलेली आहे.त्यामुळे संस्कृतात आपल्याला तृष्णा दिसते तर पैशाचीमधे त्याचे 'तहान'मधे परिवर्तन झाले आहे जे मराठीने जसेच्या तसे घेतले.

प्रश्न३- 'कुक्कुट' हा कोणत्या भाषाकूळातील शब्द आहे जो संस्कृतमधेही आढळतो?
अ)द्रविड
ब)इंडो-युरोपियन 
क)आस्ट्रिक 
ड)सेमेटिक

➡️ उत्तर:-अ-द्रविड

संस्कृतातही हा शब्द आढळतो.द्रविडकूळातून संस्कृतात साधारणतः एकहजारच्याही वरती शब्द आलेले आहेत.कुक्कुट हा द्रविडकूळातील शब्द आहे.

डाॅ.अमृता इंदूरकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान.

Saturday, December 7, 2019

ते शारदा विश्वमोहिनी!

ते शारदा विश्वमोहिनी!

डाॅ.अमृता इंदूरकर

              सुटीच्या दिवशीची निवांत सकाळ.घरची थोडी कामं आवरून रेडिओ लावून आरामात बसत नाही तोच बऱ्याच वर्षांनी आशाबाईंचे 'जय शारदे वागीश्वरी' हे गाणे कानावर पडले.शांत,प्रसन्न अशा सकाळी गाणे ऐकता ऐकताच आपोआप डोळ्यासमोर त्या मयूरारूढ शारदेची मूर्ती डोळ्यासमोर प्रकटली.तिच्या त्या रूपवर्णनाने शारदा/सरस्वतीचे कितीतरी जुने संदर्भ,तिची विविध रूपे आठवू लागली.
            भारतीय पंरपरेत शारदा आणि सरस्वती या दोन्हींना विद्या व कला यांची देवता म्हणून मानले जाते.यांची कितीतरी नावे आहेत.वाक्,वाग्देवी,वागीश्वरी,
वाणी,शारदा,भारती,वीणापाणी इत्यादी नावांनी ती संबोधली जाते.आध्यात्मिक अर्थाने ती निष्क्रिय ब्रह्माचे सक्रिय रूप आहे.म्हणूनच तिला ब्रह्मा,विष्णू,महेश या सर्वांना गती देणारी शक्ती असे म्हणतात.तिचा वर्ण उज्ज्वल असल्यामुळे ती ज्योतिर्मय ब्रह्माचे प्रतीक आहे. उपनिषदांमधे सरस्वती/शारदेची वाणीशी एकरूपता मानलेली आहे.प्रज्ञावृद्धीसाठी आणि वाणीत गोडवा येण्यासाठी उपनिषदात तिची प्रार्थना केलेली आहे.वाणीची स्फूर्तिदेवता,विज्ञान,साहित्य यांची अधिष्ठात्री देवता ती आहे.


            प्राचीन ग्रंथांमधे शारदावर्णनपर कितीतरी संदर्भ मिळतात.यामधे प्रामुख्याने १) विष्णूधर्मोत्तर पुराण २) अंशुमद भेदागम ३) पूर्ण कारणागम ४) रूपमंडन इत्यादी ग्रंथांमधे तिचे स्वतंत्रपणे वर्णन आले आहे.
           बालपणी शाळेच्या पहिल्या दिवशी जशी राष्ट्रगीताची ओळख होते तशीच 'या कुन्देन्दु तुषार हारधवला' ह्या श्लोकातून ती आपल्या प्रातःस्मरणीय जीवनाचा एक अभिन्न भाग होते.बालपणी केवळ पाठ करून म्हटल्या जाणाऱ्या या श्लोकाचा थोडे मोठे झाल्यावर जेव्हा अर्थ कळतो तेव्हा कुठे अंश मात्र तिने आपल्यावर कृपेचा वरदहस्त ठेवल्याचा समाधान मिळते.

या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्र वस्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना
या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता   
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा

म्हणजेच- कुंद,चंद्र व हिमतुषार यांच्यासारखा जिचा वर्ण आहे.जी शुभ्र वस्त्रांनी आवृत्त आहे,जिचा हात सुंदर वीणेने अलंकृत आहे,जी श्वेत कमलावर बसली आहे,जिची ब्रह्मा,विष्णू (अच्युत),शङ्कर आदी देवगण सर्वकाल वंदना करतात आणि जी सर्व प्रकारच्या जडतेचा नाश करणारी आहे,अशी सरस्वती देवी माझे रक्षण करो.
      याशिवाय पुढील ध्यानश्लोक शारदेचे आध्यात्मिक सामर्थ्य व्यक्त करणारा आहे.

शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामाद्यां जगद्व्यापिनीं
वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्।
हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां
वन्दे त्वां परमेश्वरीं भगवती बुद्धीप्रदां शारदाम्॥

म्हणजे- शुभ्र वर्णाची म्हणजे सत्वगुणी,ब्रह्मविद्येचे श्रेष्ठ असे सार,विश्वातली आद्य शक्ती,जगताला व्यापून उरलेली,वीणा व पुस्तक धारण करणारी,हातात स्फटिकमण्यांची माळ धारण करणारी,पद्मासनावर बसलेली आणि बुद्धीदात्री अशा त्या भगवती परमेश्वरी शारदेला वंदन करतो.
           बृहदारण्यक उपनिषदात सरस्वतीचे वर्णन आले आहे.सरस्वतीच्या चार भुजा या चार दिशांची प्रतीके आहेत जे तिच्या सर्वव्यापित्वाचे लक्षण आहे.तिच्या हातातील पुस्तक हे स्थूल रूपाने ज्ञानप्राप्तीचे साधन असून,आध्यात्मिक अर्थाने सर्वज्ञानमय अशा वेदांचे प्रतीक आहे.तिच्या हातातली माला ही स्थूल अर्थाने एकाग्रतेचे चिन्ह असून,आध्यात्मिक अर्थाने मातृकावर्ण शक्ती आहे.वीणा ही स्थूल अर्थाने जीवनसंगीताचे प्रतीक व आध्यात्मिक अर्थाने साधकांना सिद्धी व निर्वाण देणारी आहे.तर तिच्या हातातील कमळ हे सृष्टीचे प्रतीक आहे.
         संपूर्ण भारतातील विविध परंपरांमधे ती विविध वाहनारूढ दाखविली आहे.श्वेत हंस हे प्रामुख्याने सरस्वतीचे वाहन कल्पिलेले आहे.सरस्वती कधी हंसावर बसलेली दिसते,तर कधी हंस तिच्या मागे असतो.बौद्ध व जैन परंपरेत मयूर हे तिचे वाहन आहे.महत्त्वाचे म्हणजे हिंदूंप्रमाणेच बौद्ध व जैन धर्मांना पण शारदा/सरस्वती पूज्य आहे.बौद्ध परंपरेत ती मंजुश्रीची पत्नी असल्याचे उल्लेख आढळतात. बौद्धांनी तिचे पाच भिन्न आकार-प्रकार कल्पीलें आहेत ते असे-
१) महासरस्वती--जी द्वादशवर्षा,हिमगौर,द्विभुज,उजवा हात अभयमुद्रेत आणि डाव्या हातात कमळ असलेली.
२)वज्रवीणा सरस्वती--गौर,द्विभुज व वीणावादिनी.
३) वज्रशारदा--कमळात बसलेली,मुकुटात चंद्रकोर,त्रिनेत्र,द्विभुज तसेच कमळ व पुस्तक धारण करणारी.
४) आर्यसरस्वती-- चतुर्दशवर्षा,गौरकांती,डाव्या हातात कमलनाल व त्यावर प्रज्ञापारमितेची पोथी.
५)वज्रसरस्वती--त्रिमुख,षड्भुज,रक्तवर्ण,रक्तकेशी,समोरचे मुख निळे,रक्तकमकमळावर प्रत्यालीढ मुद्रेत बसलेली,हातात कमळ व त्यावर प्रज्ञापारमितेची पोथी. तलवार आणि कात्री ही डाव्या हातातली आयुधे व उजव्या हाती ब्रह्मकपाल,रत्न व चक्र.
         जैनांची श्रुतदेवी म्हणजे सरस्वती च आहे.स्कंदपुराणात शिवाची शक्ती अशा कल्पनेने तिचे रूपध्यान वर्णन केले आहे.
         संपूर्ण भारतात विविध ठिकाणी सरस्वती/शारदेच्या मूर्ती सापडल्या आहेत.उत्तर भारतातल्या सरस्वतीच्या मूर्ती सामान्यपणे द्विभुज किंवा चतुर्भुज आहेत.भारतीय कलेत सरस्वती सन पूर्व दुसऱ्या शतकापासून आढळते.भरहूतच्या कठड्यावर तिची मूर्ती पद्मपीठावरील आहे.मध्ययुगात बंगाल-बिहारमधे ती चतुर्भुज व वीणाधारिणी बनली.तर आंध्र प्रदेशात घंटाशाला येथे जी मूर्ती आहे ती मोहेंजोदडोसारख्या कलेशी साधर्म्य साधते.मथुरेजवळ कंकाली टीला येथे उत्खननात जी मूर्ती आढळली ती जैनकालीन आहे.तर बीकानेर येथे गुप्तकाळातील मूर्तींचे संदर्भ मिळतात.
          अशा या विविध रूपातील शारदा/सरस्वतीचा गौरव ज्ञानदेवांनी आपल्या भावार्थदीपिकेतील मंगलाचरणात केला आहे.ओंकाररूप गणेशाचे रूपक प्रारंभीच्या २० ओव्यांमधे केल्यानंतर २१वी ओवी त्यांनी शारदास्तवनाला अर्पण केली आहे.ज्ञानदेवांना शारदेची थोरवी,महात्म्य वर्णनासाठी फक्त एकच ओवी पुरेशी वाटली यावरून तिचे सामर्थ्य लक्षात येते.
*आता अभिनववाग्विलासीनी।जे चातुर्यकलाकामिनी।*
*ते शारदा विश्वमोहिनी।नमिली मिया॥*
म्हणजेच- अभिनववाग्विलासीनी म्हणजे माधुर्य,लालित्यादी गुण लाभलेली,वाणीचे नवनवीन विलास प्रकट करणारी,चातुर्य आणि कला यांचा जिला विशेष छंद आहे.अशा या साक्षात विश्वालाच मोहविणाऱ्या शारदेला वंदन करतो.
         दासबोधातील शारदास्तवन समासातही शारदेचा गौरव केलेला आहे.ही शारदा योगी लोकांना ध्यानावस्थेत भेटते.साधकांना ज्ञानमार्गातील चिंतनामधे साथ देते.भक्तीमार्गातील पराभक्ती हे शारदेचेच रूप आहे.तर सिद्धपुरूषांच्या अंतःकरणामधील स्वरूपस्थान किंवा समाधी हा शारदेचाच आशीर्वाद आहे.अशी ही शारदा उत्तम ग्रंथनिर्मितीसाठी सदा पूजिली जाते.

अमृतवेल    
डाॅ अमृता इंदूरकर
दि.६/१२/२०१९
नागपूर

Thursday, December 5, 2019

पिंपळ-एक डायरी

पिंपळ-एक डायरी

डाॅ.अमृता इंदूरकर

              दिवाळी नुकतीच संपली होती.संपूर्ण वातावरणात हिवाळ्याची अस्पष्टशी चाहूल लागल्यासारखी वाटत होती.त्यादिवशी विभागात यायला उशीर झाला.मी जरा घाईघाईतच खोलीचे कुलूप उघडले आणि खुर्चीवर येऊन बसले.आल्यावर एरवी आठवणीने खोलीचे दार लोटून,एकांतात बसणारी मी,डोक्यात कामाची घाई असल्यामुळे दार उघडे ठेवून बसले.घाईघाईत शोधनिबंध लिहायला सुरूवात केली;आणि अचानक कानावर कसलीतरी ओळखीची सळसळ ऐकू आली.त्याचा आवेग इतका जास्त होता की ती सळसळ आता माझ्या थेट अंगावरच येणार असे मला वाटले.म्हणून क्षणभर थांबून मी खोलीबाहेर पाहिले.माझ्या खोलीसमोर उभा होता विशाल पिंपळ!सोसाट्याचा वारा सुटला होता आणि हा पिंपळ अशी काही जीवघेणी सळसळ करीत होता की मी क्षणभर विचारमग्न झाले आणि अचानक वर्षानुवर्षे शांत असलेले माझ्या अंतरीचे स्मृतितळ विविध घटना,प्रसंगांचे एकावर एक सूर मारून ढवळून निघू लागले.



             त्या क्षणी मला असे वाटले आजच ह्या पिंपळाला काय झाले.जणुकाही हे सर्व मला विसरू देण्याची का त्याची इच्छा नव्हती?या विभागात मी प्रथम आले ते एक विद्यार्थीनी म्हणून. वर्गात फारशी कुणाशी माझी नव्याने मैत्री झाली नव्हती. रोज वेळेवर येणे,वर्ग मनापासून करणे,वेळ असला तर ग्रंथालयात जाणे नाहीतर सरळ घरी परतणे.पण या साध्या वाटणाऱ्या दिनचर्येत माझ्यासाठी एकच गोष्ट कठीण होती ती म्हणजे दोन तासिकांमधे असणारा वेळ किंवा तास उशीरा सुरू होणार असेल किंवा होणारच नसेल तर पुढच्या तासाची वाट पाहण्यासाठीचा मधला वेळ.नवीन ओळख करून घेऊन बोलणाऱ्यांपैकी मी नव्हते.मग काय!वर्गाबाहेर आल्यावर समोर भव्य पिंपळ दिसायचा.योगायोग असा की ज्या दिवशी मी अस्वस्थ असायची त्या दिवशी ह्याची सळसळ इतकी व्हायची की हक्काचा मित्र जसा विचारतो तसा हा विचारायचा, काय झाले?इतकी उदास का?अस्वस्थ का?मला सांग!मी आहे ना! पुढे असे योगायोग वारंवार घडून यायला लागले. आपण आतून पार उन्मळून पडलेलो असायचो आणि नेमका हा विचारून विचारून बोलते करायचा.माझे उसळणे,कोसळणे समजून घेणारा कोणीतरी मला हवा होता.मनातली घुसमट,वैफल्य,त्वेष,उद्विग्नता सगळे कुठे तरी व्यक्त व्हावे असे सारखे वाटायचे.मग मलाही रोज त्याच्या समोर येऊन उभे राहायचे वेडच लागले.

             मी मनातील गुंतागुतीच्या अतर्क्य जाळ्यातले एक एक धागे उकलण्याचा प्रयत्न करीत होते. तितकाच गुंता अधिक वाढायचा आणि हाती यायचा तो निरगाठीवर निरगाठी पडलेला गुंत्याचा गोळा.प्रत्येक नात्यात हेच,प्रत्येक संवादात हेच.रक्ताच्या नात्याबद्दलही तेच आणि मानलेल्या मैत्री,प्रेम या नात्यांबद्दलही तेच.त्यावेळी नकळतच मर्ढेकरांची,     

नाही कुणी का कुणाचा।बाप-लेक-मामा-भाचा।
मग अर्थ काय बेंबीचा।विश्वचक्री?॥
ह्या ओळी मला माझेच मनोगत वाटू लागल्या.बालकवींची उदासीनता मला माझ्या उदासीनतेशी साधर्म्य सांगू लागली.
कोठून येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते तेही कळेना
हृदयाच्या अंर्तहृदयाला   

तर ग्रेसची जीवघेणी कातरसंध्या माझ्या भासचक्रात अनाकलनीय,मंत्रभारीत उच्छाद मांडू लागली.मग माझा रोजचा दिनक्रमच ठरून गेला.रिकामा वेळ मिळाला की मी आपली पिंपळासमोर त्याला न्याहाळायला,त्याच्याशी बोलायला लागली.इरावती मला विचारायची की तासनतास या पिंपळाकडे पाहण्यात तुला काय मिळतं? मी अनुत्तरीतच उभी राहत असे.काय सांगणार?आमची मनातल्या मनात वाटावाटी सुरू आहे म्हणून!

            हा पिंपळ त्यावेळी माझ्यासाठी जणुकाही डायरी झाला होता. आपण संपूर्ण दिवस सरल्यावर रात्री डायरी लिहितो आणि दिवसभराचा लेखाजोखा मांडतो.पण माझं मात्र वेगळच सुरू होतं. मी दिवसाचीच नाही तर क्षणाक्षणाची,एक एक भावनांची व्याकूळ,दुखरी स्पंदने त्या पिंपळाच्या प्रत्येक पानावर कोरायचा प्रयत्न करीत होते.प्रत्येक पान माझे आहे आणि या विशाल डायरीची लक्ष लक्ष पाने माझे कागद बनले आहेत असे वाटायचे.माझ्यासाठी तर एक एक पान लागे गळावया हा हिशेबही नव्हता.पिंपळच इतका डेरेदार,विशाल आहे की पानगळ होऊन संपूर्ण निष्पर्ण वृक्ष कधी पाहिलाच नाही.माझ्या मानसिक आंदोलनाचे आघात लीलया पेलायला लगेच नवी पालवी तयार.

           आज तिथपासून ते आजतागायत विभागाशी संबंधित असल्यामुळे माझी पिंपळ डायरी माझ्यासोबत आहे.इतके लिहिले,इतके व्यक्त केले पण ह्याची पाने अजून शिल्लकच आहेत.ती पाने मी आली की जास्तच सळसळतात.जुन्या पानांनी नव्यांना सांगितले,नव्याने कोवळ्यांना सांगितले की ही एकमेव आहे आपल्याशी संवाद साधणारी;तेव्हा हीला आजन्म प्रतिसाद द्या.त्यादिवशी घाईघाईत असूनही हा पिंपळ मला विसरला नाही.त्याने विचारलेच कशाची एवढी घाई?कोणता ताण आहे का?आणि मला माझ्या माणुसपणाची खंत वाटली.हा एवढा हजारो कानांनी ऐकायला आतूर असताना मी मात्र भलतेच ठरीव हक्काचे कान शोधत होती.ह्या पिंपळ डायरीच्या साक्षीने खळकन दोन अश्रू गळले आणि अंतरीचे तळ शांत झाले.ह्या पिंपळाने मला असे काही आश्वस्त केले की मनातली सगळी घुसमट त्या सळसळत्या पानांमध्ये कधी विरली कळलेच नाही!!!

अमृतवेल
डाॅ अमृता इंदूरकर
दि.५/१२/२०१९
नागपूर

Wednesday, December 4, 2019

मराठी रंगभूमीचे विश्वकर्मा : विष्णुदास भावे

मराठी रंगभूमीचे विश्वकर्मा : विष्णुदास भावे

मराठी जनतेचे अद्वितीय प्रीतिस्थान बनलेल्या ह्या नाट्यकलेच्या म्हणजे रंगभूमीच्या जन्माशी विष्णुदास उर्फ विष्णू अमृत भावे या पुरूषाचे नाव कायमचे निगडीत झालेले आहे.ही सांगड इतकी वज्रलेप झालेली आहे की मराठी रंगभूमी अथवा नाट्यकला यांविषयी बोलण्याचा प्रसंग आला असता मराठी रंगभूमीचे जन्मदाते म्हणून विष्णुदासांच्या नावाचा उल्लेख करण्याचा एक शिरस्ताच पडून गेला आहे.विष्णुदासांचे नाव मराठी रंगभूमीचा विश्वकर्मा या पदवीवर अढळपदाने विराजित झालेले आहे.पौराणिक नाटकांचा प्रयोग केव्हा ही, कोठेही होवो, त्या प्रयोगाच्या प्रारंभी सूत्रधाराकडून,
हे शारदे, ब्रह्मतनये, सांगली ग्रामी विष्णुदास कवी आहेत, त्यांना तुझा आशीर्वाद असावा' अशा रितीने आशीर्वाद मागण्यासाठी ज्यांच्या नावाचे उच्चारण निरंतर होत असे ते म्हणजे विष्णुदास भावे.

विष्णुदास भावे बाह्यात्कारी कवी असले तरी सर्वप्रथम ते सांगलीकरांच्या पदरी खासगीकडे एक सामान्य नोकर होते.विष्णुदास भावे ही एक अतिशय बुद्धीमान, कल्पक व हरहुन्नरी व्यक्ती होती.रंगभूमीची संस्थापना त्यांच्या हातून झाली ही निर्भेळ योगायोगाची गोष्ट नसून भावे यांची योग्य तेच खरोखरी तशी होती.लहानपणापासूनच त्यांना कलेची व कारागिरीची आवड होती.ही त्यांची कारागिरी श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब यांच्या नजरेस पडली.श्रीमंतांनी १८४२ साली कर्नाटकी नाटके पाहून आपल्याही दरबारात मराठी नाटके करावीत अशी इच्छा व्यक्त केली.तेव्हा साहजिकच त्यांनी ती कामगिरी विष्णुपंतांवर सोपविली.

जनतेमधे अनादिसिद्ध परंपरेने चालू असलेल्या दाक्षिणात्य रंगभूमीच्या स्वरूपाचे सर्वप्रथम विष्णुदासांनी अवलोकन केले. तिचा जो नमुना सांगली मुक्कामी विष्णुदासांच्या पाहण्यात आला व ज्यावरून त्यांनी आपले नाटक निर्माण केले त्यांचे निश्चित स्वरूप नक्की कसे होते याची माहिती उपलब्ध नाही.खुद्द विष्णुदासांनी त्याला ' ओबडधोबड व बिभत्स' म्हणजेच अचकट- विचकट, ओंगळ,किळसवाणे अशी विशेषणे लावली होती.

विष्णुदासांनी निर्मिलेल्या पौराणिक नाटकांत मात्र भिन्न भिन्न नाटक मंडळ्या व भिन्न भिन्न परंपरा यांच्या विशिष्ट लकबी व प्रयोगपद्धतीत आणि वेशभुषेत निराळेपणा हा असायचा.विष्णुदासांचे चरित्रकार रा.सा.भावे यांचे म्हणणे असे की, 'विष्णुदासांनी आपल्या नाट्याचे स्वरूप शक्य तितके वास्तववादी  असावे याबद्दल फार प्रयत्न केले.चित्रकलेत व मूर्तीकलेत विष्णुदासांचे कौशल्य अप्रतिम असल्यामुळे त्यांनी प्रत्येक भूमिकेच्या वेशभूषेत आणि सजावटीत वैशिष्ट्य आणि वैचित्र्य निर्माण केले.कलानिर्मितीचे तत्त्व या नात्याने वास्तववाद त्यांनी आपल्या कृतीत आणला होता.'

 विष्णुदासांनी 'सीतास्वयंवर' हे पहिले नाटक इ.स.१८४३ साली केले.तेव्हापासून सुमारे ४०-५० वर्षे त्यांनी सुरू केलेला पौराणिक नाटकांचा प्रकार रंगभूमीवर जीवंत होता.त्यानंतर रामायणापैकीच त्यांनी १०नाटके केलीत.त्यांचा नाट्यव्यवसाय पहिली ३० वर्षे तर पूर्णपणे जोमात व भरभराटीत होता.ही जणुकाही जीवंत सामाजिक संस्थाच होती.अर्थात समाजजीवनाच्या इतर अंगांप्रमाणे तिच्यामधे एकसारखा बदल होत असला पाहिजे, जो होत होता हे सत्य आहे.रचनेच्या बाबतीत एक महत्त्वाची सुधारणा विष्णुदासांनी घडवून आणली.कानडी अथवा दाक्षिणात्य नाटके आरंभापासून अखेरपर्यंत एकसुरी, सळनळीत , एकप्रवेशी होते.कथानकाचा ओघ एकप्रवाही,अखंड चालायचा.

विष्णुदासांनी यामधे सुधारणा करून नाटकाची रचना अनेकप्रवेशी केली.ह्या प्रवेशांना कचेऱ्या म्हणत.प्रथम देवांची कचेरी, नंतर राक्षसांची कचेरी, नंतर राक्षसांनी केलेल्या अत्याचाराचे दिग्दर्शन, नंतर देवस्त्रीयांची कचेरी, नंतर देव- राक्षसांचे युद्ध याप्रमाणे स्थूलमानाने प्रवेशांचा आराखडा त्यांनी आखला.आख्यानातील कथाभागाच्या स्वरूपानुसार यांत फरक होत असे.या बदलामुळे  विष्णुदासी पद्धतीची पौराणिक नाटके कानडी प्रदेशातही लोकप्रिय झाली.विष्णुदासी नाटकांचा आशय शब्दात्मक होता.जे काही नृत्य विष्णुदासी नाटकांत घेतले गेले ते कथावस्तुच्या आणि भावनेच्या दृष्टीने निष्प्रयोजन जरी होते, तरी पण रंजन करणारे मात्र होते.गणपतीनंतर मयूरवाहिनी सरस्वतीचा प्रवेश ही विष्णुदासी पौराणिक नाटकांची खास खुण होय.कानडी नाटकात सरस्वती नव्हती.विष्णुदासांनी आपल्या कल्पनेने तिचा समावेश केला.विष्णुदासांच्या कवितेत ओवी,साकी,श्लोक इत्यादी सर्व प्रकार होते पण रागदारीतील पदांच्या मानाने त्यांचे प्रमाण थोडे होते.

स्थानिक गावांमध्ये बरीच वर्षे प्रयोग केल्यानंतर विष्णुदासांनी आपली नाटक मंडळी प्रथमच पुणे व मुंबई या मोठ्या शहरी नेली.मराठी भाषेतील रंगभूमीचे हे अभिनव दर्शन पाहून पुणे व मुंबई येथील विद्वान व रसिक पुढारी मंडळींना आनंद झाला.सर्व महाराष्टाभर विष्णुदासांच्या पौराणिक नाट्यपद्धतीची छाप बसली आणि सर्वत्र तिचे अनुकरण होण्यास सुरूवात झाली. या प्रयोगात आरंभी ' इंद्रजितवध आणि सुलोचना सहगमन' हे आख्यान आणि नंतर ' अश्वमेधयज्ञ आणि लवकुशाख्यान' हे करून दाखविण्यात आले.त्यानंतर विष्णुपंतांनी मुंबईच्या ग्रॅन्टरोड थिएटरमधे ९मार्च १८५३ मधे दुसरा खेळ केला.त्यानंतरच्या प्रयोगात मत्स्य,कूर्म, वराह, नारसिंह या अवतारांची आख्याने आणि रासक्रीडा यांचे प्रयोग केलेत.

विष्णुदासांनी आपली ५२ आख्याने एकत्र करून, त्यांच्या प्रारंभी देवतास्तुतीपर पद्ये जोडून त्यांना दहा पानांची प्रस्तावना लिहून ती जानेवारी १८८५ मध्ये 'नाट्यकवितासंग्रह' या नावाने प्रसिध्द केली.एकंदर ५२ आख्यानांपैकी १९ रामकथेवर आहेत.ही केवळ वाल्मिकी रामायणाच्याच आधाराने रचलेली आहेत असे नव्हे.आनंद रामायणातील अहिमहिरावणकथा,जैमिनी अश्वमेधातील लवकुशाख्यान वगैरे अनेक ठिकाणांहून आलेल्या लोकप्रिय कथांचाही विष्णुदासांनी आपल्या आख्यानांकरिता उपयोग केला.कौरव-पांडव कथा आणि महाभारतातील इतर काही कथा यांवर १४ आख्याने आहेत.श्रीकृष्ण चरित्रावर ६, विष्णुच्या दशावतारांपैकी इतर अवतारांवर ५, आणि फुटकळ ८ याप्रमाणे वर्गवारी आहे.रामकथेवर त्यांचा सर्वाधिक भर होता.१९ आख्यानांमधे श्रीरामचंद्राचे संपूर्ण चरित्र सुसंगत रीतीने आणले होते.त्यांच्या आख्यानांपैकी 'सीतास्वयंवर' , 'इंद्रजितवध आणि सुलोचनासहगमन' , ' रावणनिधन', 'अश्वमेधयज्ञ व लवकुश', 'रासक्रीडा', 'पारिजातक', 'द्रौपदीस्वयंवर', 'वत्सलाहरण', 'कीचकवध', 'सुधन्वा', 'चंद्रहास', 'हरिश्चंद्र सत्वदर्शन', 'वीरभद्र' ही विशेष लोकप्रिय ठरलीत.   

 विष्णुदास भावे स्वतः नाटककार,पद्यकार,दिग्दर्शक, तालीममात्सर, गायन मास्तर,कपडेवाला, रंगवाला सर्व काही तेच होते.या सर्व गोष्टी स्वतः निर्माण करून रंगभूमीचा जो एक साचा त्यांनी निर्माण केला तो पौराणिक नाटक या नावाने पुढे ५०-६० वर्षे चालू राहिला.पण संगीत नाटक, गद्यनाटक इ.नाट्यप्रकारांना देखील तो मूळ पाया म्हणून उपयोगी पडला.सर्व गोष्टी मुळापासून निर्माण करण्याचे काम त्यांच्यानंतर मराठी रंगभूमीवर कोणासच करावे लागले नाही.हे सर्व लक्षात घेतले म्हणजे विष्णुदासांच्या उन्मेषशालिनी प्रतिभेची कल्पना येते.महाराष्ट्राचा भरतमुनी किंवा रंगभूमीचे विश्वकर्मा या पदव्या ज्या त्यांना देण्यात येतात त्या यथार्थ असल्याची खुण पटते.

त्या वेळचा समाज सुसंस्कृत व सद्भिरूचीसंपन्न अशा रंजनसाधनासाठी मुकलेला होता.विष्णुदास निर्मित रंगभूमीने त्यांची ही भूक भागवली.त्यांनी नाटक तयार केले त्यावेळी ती सरंजामशाही समाजव्यवस्थेतील एक निष्पत्ती होती.कारण त्याकाळात मनोरंजनाचे दुसरे साधन नव्हते.त्यातल्या त्यात तमाशा, कीर्तन, व नायकिणींचे नाचगाणे ही परंपराप्राप्त करमणुकीची साधने होती.या तीन साधनांपैकी तमाशा किंवा नायकिणीच्या नाचगाण्याला समाजाने नेमून दिलेल्या नितीनियमांची बंधने होती.कीर्तन हे एकमेव समाजमान्य व दर्जेदार असे मनोरंजनाचे साधन होते.परंतु, सरंजामी पांढरपेशा वर्गास ही साधने अपुरी वाटत होती.म्हणूनच विष्णुदास भाव्यांच्या प्रेरणेमुळे पौराणिक नाटकास प्रारंभ झाला.पण बदलत असलेल्या समाजस्थितीच्या प्रभावाने ही नाटके द्रव्याधिष्ठीत भांडवलशाही समाजव्यवस्थेचा घटक बनली.विष्णुदासांनी इ.स.१८५१ ते१८६२ पर्यंत म्हणजे सुमारे बारा वर्षे नाट्यव्यवसाय केला.या अवधीत त्यांनी उत्तरेस मुंबई पासून दक्षिणेस बेळगावपर्यंतच्या मराठी प्रदेशात एकूण सात दौरे केले.

उपलब्ध पुराव्याप्रमाणे आर्थिक चणचण उद्भवल्यामुळे सातवा दौरा हा त्यांचा शेवटचा दौरा होता.विष्णुदासांनी ४० वर्षे अखंड आणि बिकट परिस्थितीत देखील रंगदेवतेची मनोभावे सेवा केली. पण काळ पुढे बदलत गेला .बदलत्या काळात नवीन गोष्टी मिसळल्या. लोकही बदलले त्याचप्रमाणे त्यांच्या मनोरंजनाच्या संकल्पना बदलल्या.त्यामुळे निश्चितच विष्णुदासांनी सुरू केलेल्या नाटकांचे, प्रयोगांचे स्वरूप बदलले.त्यात काळानुसार नवीनता आली पण आजही फिरून जेव्हा नाटकाचा, त्याच्या इतिहासाचा विचार होतो तेव्हा नकळतच मनात येणारे पहिले नाव म्हणजे- ' आद्य रंगकर्मी विष्णुदास भावे'हे होय.त्यांच्या नावाने साजरा होणाऱ्या आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमीत्त विष्णुदास भावे यांचे स्मरण.

डाॅ.अमृता इंदूरकर,नागपूर
विश्वस्त

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान