Tuesday, November 26, 2019

🔶प्रहसन:अकल्पनीय, असंभाव्य नाट्यप्रकार🔶

🔶प्रहसन:अकल्पनीय, असंभाव्य नाट्यप्रकार🔶

➡️डाॅ.अमृता इंदूरकर
 
प्रसहन: ‘प्र’ म्हणजे अधिक आणि ‘हसन’ म्हणजे हास्य किंवा हसणे. सामान्य पातळीपेक्षा अधिक हसण्याला प्रहसन म्हणतात.

नाट्यप्रकारात मोडणारा प्रहसन किंवा फार्स हा सुखात्मिकेचाच एक प्रकार होय. विनोद निर्मितीचा एकमेव हेतू डोळ्यांपुढे ठेवून निर्माण केलेल्या प्रहसनाची प्रकृती मात्र सुखात्मिकेपेक्षा बरीचशी वेगळी असते. हा हास्यरसोत्पादक नाट्यप्रकार एकांकी असेल किंवा अनेक प्रवेशयुक्त एकांकी असेल किंवा तीन अंकात ऐसपैस पसरलेला असेल. सामान्यपणे कनिष्ठ दर्जाचा विनोद त्यात ठासून भरलेला असतो. पात्रांच्या कृती-उक्तीत अतिशयोक्ती, असंबद्धता, विसंगती, मूर्खपणा, वेडाचार यांचा मालमसाला असतो. तसेच एरवी ज्या घटना असंभाव्य किंवा अवास्तव वाटतील, त्या प्रहसनात गुंफलेल्या असतात.

भरतमुनींनी दशक रुपात प्रहसनाला स्वतंत्र स्थान दिले आहे. त्याने प्रहसनाचे ‘शुद्ध’ व ‘संकीर्ण’ असे दोन प्रकार मानले आहेत. शारदातनय म्हणतो की प्रहसनात एक अंक, दोन संधी, सहा रस असावेत. संस्कृतात दामक, भगवतज्युक, हास्यार्णव, मत्तविलास यासारखी काही प्रहसने सोडली तर फारशी प्रहसनरचना नाही.

➡️ पाश्चात्य फार्सचा उगम

पाश्चात्य फार्सचा उगम हा इसवीसनपूर्व पाचव्या शतकात झाला, असे मानले जाते. जुन्या ग्रीक सुखात्मिकेबरोबर रचलेले हास्योत्पादक लघुनाटक म्हणजे फार्स. Farcire (कोंबून भरणे) या लॅटीन शब्दापासून ‘फार्स’ ही संज्ञा सिद्ध झाली. Mystere म्हणजे बायबलमधील नव्या व जुन्या करारांतील कथांवर आधारलेली नाटके. धार्मिक स्वरूपाच्या या गंभीर नाटकांमध्ये फार्स घुसडले जात असत. युरोपमधील प्रबोधनानंतर फार्सच्या निर्मितीला बहर आला. इटलीमधील फार्स या प्रकारात साचेबंद स्वरूपाची पात्रे असत. मोल्येरच्या फार्समध्ये व्यंगचित्रे असत आणि मानवी जीवनातील विसंगतीचे भेदक, दर्शनही. १९ व्या शतकात फार्सला पुन्हा बहर आला, तो फ्रान्समध्ये. त्याचबरोबर जर्मनी, रशिया, ब्रिटन इत्यादी देशातही तो अवतरला.
घटनाकेंद्री नाट्य!

प्रहसन हे घटनाकेंद्री असते. घटना अतिरंजित व असंभाव्य असतात. त्या वेगाने घडतात व त्यातून माैज निर्माण होते. सुखात्मिकेत ठसठशीत व्यक्तिचित्रण असते तर प्रहसनातील व्यक्ती उथळ, तऱ्हेवाईक व विक्षिप्त स्वभावाच्या आणि साचेबंद व्यक्तिमत्त्वाच्या असतात. विविध क्लृप्त्या योजून हास्य निर्माण करणारे प्रहसन सुखात्मिकेसारखे प्रेक्षकाला अंतर्मुख करीत नाही, मात्र फार्समधील विनोद हा नेहमीच वरकरणी वाटतो, तितका उथळ नसतो. कित्येकदा त्याला कारुण्याची झालर असते. जगप्रसिद्ध अभिनेता चार्ली चॅप्लिनचे मूकपट किंवा मार्क्स बंधूंचे चित्रपट याच फार्सच्या प्रकारात मोडतात. प्रहसनात काहीही घडू शकते आणि कसेही घडू शकते हे खरे आहे. पण सुखात्मिकेप्रमाणेच प्रहसनालाही स्वत:ची अशी सुसंगत रचना असते. प्रहसनाला स्वत:चा असा रचनाबंध असतो. त्यात एकाच वेळी गांभीर्य आणि गंमत यांचा प्रत्यय येतो. त्यातील व्यक्ती व घटना अस्वाभाविक वाटल्या तरी त्यातून मानवी जीवनातील वास्तवावर प्रकाश पडतो. विसंगतीचे चित्र रंगवितानाच प्रहसन संगतीची जाणीव करून देते. प्रहसन हे काही अंशी मुक्त नाट्य म्हणता येईल किंवा जीवनाकडे पाहण्याची ती एक रीत असेही म्हणता येईल. चित्रपट क्षेत्रातील प्रहसनाचे सर्वात बोलके उदाहरण म्हणजे नासिरुद्दीन शहा, विवेक वासवानी, भक्ती बर्वे यांचा ‘जाने भी दो यारों’ हा हिंदी चित्रपट. यामधील मृत सतीश शहाला जीवंत समजून कोफिनमध्ये हलविणे आणि चित्रपटाच्या शेवटी महाभारताचा प्रसंग, या दोन्ही घटना फार्सचा उत्तम नमुना आहेत.

बोलणे, वागणे अतिशयोक्तीचे

प्रहसनात विनोदनिर्मितीवर मुख्यत: भर दिलेला असतो. पात्रांचे वागणे, बोलणे अतिशयोक्तीच्या पातळीवरचे असते. पात्रांना असंभाव्य किंवा चमत्कारिक स्थितीत टाकलेले असते. पात्रांच्या जलद हालचाली, धावपळ, वेड्यावाकड्या मुद्रा, द्वयर्थी बोलणे, स्त्री-पुरूष संबंधविषयक प्रसंग वा बोलणे ही प्रहसनाची वैशिष्ट्ये होत. परंतु, त्याचबरोबर समकालीन जीवनाचे चित्रण करण्याची प्रवृत्तीही प्रहसनामुळे रंगभूमीवर प्रभावीपणे प्रकटली. समाजामध्ये असणारे उपहासात्मक प्रकार विडंबनाचा आश्रय घेऊन प्रहसनातून अवतरले. नाट्यकला केवळ रंजनात्मक न राहाता सामाजिक टीकेसाठी राबवीत, विशिष्ट लकबा किंवा स्वभावदोष असलेली समाजातली प्रतिकरूपे प्रहसनांमधून उभी होऊ लागली. प्रारंभीच्या काळातला नाटकाचा साचेबंदपणा प्रहसनामुळे कमी झाला. अभिनयातील तोचतोचपणा जाऊन अभिनय काैशल्याला वाव मिळाला. त्यामुळे पुढच्या काळात प्रहसने ही पुरक नाटके न राहता स्वतंत्रपणे सादर केली जाऊ लागली.

मराठी फार्सचा अवतार

        मराठी रंगभूमीवर फार्सचा अवतार झाला तो इंग्रजी नाट्यप्रयोगाच्या अनुकरणामुळे पौराणिक नाटकाच्या जोडीला फार्स सादर करण्याची युक्ती अमरचंद वाडीकर नाट्य मंडळीने १८५६ रोजी केली. हा फार्स हास्यकारक व लाैकिक जीवनाचे चित्रण करणारा असा होता. रुचिपालट म्हणून योजण्यात आलेल्या प्रहसनाचे स्वरूप मात्र पुढे पालटत गेले. फार्स म्हणजे केवळ विनोदी स्वरूपाचे प्रहसनवजा असलेले नाट्य अशी जी पुढे समजूत झाली, ती फार्सच्या जन्माच्या वेळी नव्हती. काही ऐतिहासिक स्वरूपाच्या गंभीर अथवा शोकांत नाटकांनासुद्धा फार्स म्हणण्याची पद्धत होती. उदा. नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूचा फार्स, अफझलखानाच्या मृत्यूचा फार्स. प्रहसनवजा फार्सची नावे त्यांच्या विषयांची कल्पना देणारी, विनोद स्पष्ट करणारी आहेत. उदा. ढोंगी बैराग्याचा फार्स, बासुंदीपुरीचा मनोरंजक फार्स, चहाडखोराचे प्रहसन अथवा कळलाव्या शास्त्राचा फार्स इत्यादी.....

कोटीभास्कर नावाच्या गृहस्थाने एका इंग्रजी नाटकाचा प्रयोग पाहिला. त्या नाटकाच्या शेवटी त्याने एक फार्स केलेलाही पाहिला. त्याच धर्तीवर त्याने ‘सीताहरण’ या पाैराणिक नाटकाच्या अखेरीस अगदी अनपेक्षितपणे जरठ कुमारी विवाहाचे दुष्परिणाम दाखवणारा एक भडक फार्स करून दाखवला. मराठीतील हा पहिला फार्स ठरला. तो फार्स पाहून अनेकांनी फार्स लिहिले. १८७० ते १८९० या वीस वर्षांत फार्सचे प्रमाण जाणवण्याइतपत होते. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या काळात मात्र व्यक्तिजीवनातील अगर आपल्या समाजातील वैगुण्ये, उणिवा धारदारपणे मांडण्याचे माध्यम म्हणून प्रहसनाचा उपयोग होऊ लागला.

बबन प्रभूंचे योगदान

        मराठी नाट्यसाहित्यात उत्तम असे फार्स देणारे नाव म्हणजे बबन प्रभू. १९५० च्या सुमारास मराठी रंगभूमीवर विनोदाच्या क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावलेले बबन प्रभू यांनी बऱ्याच फार्सचे लेखन केले. झोपी गेलेला जागा झाला, दिनूच्या सासूबाई राधाबाई, पळा पळा कोण पुढे पळतो, घोळात घोळ इत्यादी उत्तमोत्तम फार्स प्रभू यांनी मराठी रंगभूमीला दिले. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाचा उल्लेख केला, त्या चित्रपटात महाभारताचा जो थिएटरमधला प्रसंग आहे. त्या प्रसंगात थिएटरच्या प्रवेशद्वारावर चालू असलेल्या नाटकांचे फलक दाखविले आहेत. त्यामध्ये एक फलक ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या फार्सचा आहे. दिग्दर्शकाने हा फलक दाखवून केवढी सूचकता साधली आहे, याचा अनुभव येतो. मराठी रंगभूमीवर फार्स रूजला, प्रकटला आणि बहरला तो बबन प्रभूंमुळे यात शंकाच नाही.

(लेखिका भाषाशास्त्री, साहित्यिक आहेत.)

दि.२४/११/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Monday, November 25, 2019

ग्रंथ : ज्ञानाचे शाश्वत माध्यम

🔶ग्रंथ : ज्ञानाचे शाश्वत माध्यम🔶

➡️ डाॅ.अमृता इंदूरकर

वाचकं ज्ञानदं बाल्ये
तारूण्य शिलरक्षकम्।
वार्धक्ये दु:खहरणं
हितं सद्ग्रंथवाचनं।।

मानवाच्या वयाच्या विविध टप्प्यांमध्ये कायमस्वरूपी साथ देणारे कोणी असेल तर ते ग्रंथ होत किती सहजपणे हे सुभाषित आपल्याला सुचवते की वय कोणतेही असो, पण त्या-त्या वयात ग्रंथ वाचन आपल्याला काय काय प्रदान करतात.
'उत्तम ग्रंथ वाचन केल्याने लहान वयात ज्ञानप्राप्ती होते, तारुण्यात चारित्र्य रक्षण होते, वृद्धत्वात दु:ख निवारण होते म्हणून सतत चांगले वाचन करावे!' मंडळी नुकताच १५ आॅक्टोबरला आपण सर्वांनी वाचन प्रेरणा दिवस आणि भारताचा अभिमान असणारे वैज्ञानिक, संशोधक डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम याचा जन्मदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने आजच्या ज्ञान- विज्ञान- तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथ आजही ज्ञानाचे शाश्वत माध्यम आहेत, यावर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न आहे.

एका एका क्षणाने, एका एका कणाने हे जग पुढे जात आहे. विज्ञानाची कास धरून नव्याने उलगडणाऱ्या ज्ञानाच्या महाद्वारांना सन्मुख होणे ही वर्तमान जगाची गरज आहे. वेळेलाच गतिमान करून, जगण्याची अधिक गती पकडण्याकडे प्रत्येक व्यक्तीचा कल दिसतो. मग यासाठी विज्ञानानुकूल होणे क्रमप्राप्तच आहे. पुढे विज्ञानाकडून तंत्रज्ञान अवगत करणे साहजिकच आले, पण मुळात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे आधी ज्ञान संपादन केले तर विज्ञान मिळवता येईल आणि विज्ञान मिळविले तर तंत्रज्ञान अवगत होईल. उन्नतीकडे जाणाऱ्या, विकास घडवून आणणाऱ्या या तीन पायऱ्या आहेत. ज्ञान- विज्ञान- तंत्रज्ञान. यामधल्या ज्ञानाच्या पहिल्या पायरीला वगळून आपण पुढे जाऊ म्हटले तर ते अशक्य आहे. कारण ज्ञानाचा मुलभूत पाया पक्का असणे सर्वात महत्त्वाचे आहे. ज्ञान संपादन करणे म्हणजे आपली मुळं पक्की करणे होय. ज्ञानाची मुळं पक्की असली तर मग विज्ञान, तंत्रज्ञानाचा आपोआपच विकास होतो.

ज्ञान जितके सोप्या, सहज मार्गाने मनुष्याला मिळेल तितका त्याचा विकास होईल. उदा. घ्यायचेच झाले तर ज्ञान संपादन करण्याचे श्वाश्वत माध्यम म्हणजे ‘ग्रंथ’. या ग्रंथामधून पायाभूत ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला एक विधायक दृष्टीकोन मिळतो आणि त्यानुसार तो त्या ज्ञानाच्या आधारावरच नवनवे शोध लावू शकतो. आता विज्ञान, तंत्रज्ञानाने ज्ञानसंपादनाची माध्यमे बरीच बदलली आहेत. प्रारंभी कागद बनला. मग त्यापासून ग्रंथनिर्मितीची प्रेरणा मिळाली व ग्रंथ तयार झाले. यासंदर्भात ग्रंथनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदाचा जन्म कसा व कुठे झाला याचा थोडक्यात इतिहास समजून घेणे रोचक ठरेल.

अगदी प्राचीन काळी, कागदाचा शोध लागण्यापूर्वी लिहिण्यासाठी व चित्रे काढण्यासाठी दगड, विटा, हाडे, धातूंचे पत्रे जनावराची चामडी, रेशमाचे किंवा लिननचे कापड, काही झाडांची पाने, साली, गुळगुळीत केलेल्या लाकडी फळ्या इत्यादींचा उपयोग करीत. प्राचीन काळी चिनी लोक बांबूच्या कामट्यांच्या पट्ट्यांवर लेखन करीत. प्राचीन इजिप्तमधील लोकांनी बनविलेला ‘पपायरस’ नावाचा पदार्थ, मात्र कागदासारखा व वापरण्यात कागदाइतकाच सोयीचा असे. तो नाईल नदीच्या किनाऱ्यावर वाढणाऱ्या एका जातीच्या बोरूपासून तयार केलेला असे. तर दुसरीकडे अलेक्झांड्रिया येथील ख्रि. पू. तिसऱ्या शतकातील फिलडेल्फस टाॅलेमी यांच्या ग्रंथालयातील पुस्तके चामड्यावर लिहिलेली होती, असे म्हणतात. कागद तयार करण्याचा शोध प्रथम चीनमध्ये लागला, असे मत प्रचलित आहे. इ. स. १०५ साली त्साइ लून याने लावला.

भारतात देखील कागदासारखा उपयोग प्राचीन काळापासून दीर्घकाळपर्यंत करण्यात आला, ते म्हणजे ताडपत्र व भूर्जपत्र यावर. भारतातील व मध्य आशियातील जुने संस्कृत ग्रंथकार भूर्जपत्रावर लिहित. भारतावर स्वाऱ्या करणाऱ्या मुसलमानांबरोबर कागद करण्याची कला भारतात आली, असे कित्येक युरोपियन विद्वानांचे मत आहे. परंतु, ख्रि. पू. ३१७ च्या सुमारास अलेक्झांडर यांच्याबरोबर भारतात आलेल्या निआर्कस यांनी हिंदू लोक रुई (कापूस) कुटून कागद तयार करतात, अशी माहिती लिहून ठेवली आहे. यावरून तितक्या प्राचीन काळीही भारतात कागद तयार होत असे असे दिसते. त्याचा उपयोग मात्र विस्तृत प्रमाणात होत नसे. कालांतराने काश्मिरात व पंजाबात हाताने कागद तयार करण्याच्या गिरण्या निघाल्या. त्यांची वाढ झाली व नंतर तसेच कारखाने राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, कर्नाटक व तामिळनाडू या प्रदेशात निघाले. त्या कारखान्यात साध्या कापडाच्या व गोणपाटाच्या चिंध्या आणि रद्दी कागद यांच्या लगद्यापासून कागद तयार करीत. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात या कारखान्यांनी तयार केलेला कागद चांगल्या दर्जाचा व टिकाऊ असे व कागदाच्या धंद्यात चांगली भरभराट झाली. त्यानंतर ब्रिटीश राजवटीत मात्र त्यांच्या यंत्राच्या सहाय्याने तयार झालेला स्वस्त कागद येऊ लागला व तोच कागद पुढे स्वीकारला गेला. याच प्रवाहात पुढे पुस्तक छपाई सुरू झाली व ग्रंथनिर्मिती होऊ लागली.
 
ग्रंथनिर्मिती झाल्यानंतर स्वाभाविकच ग्रंथालय ही संकल्पना जन्माला आली. भारतातील पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्नागिरी येथे स्थापन झाले. अर्थातच हे ग्रंथालय ब्रिटीश अमदानीत स्थापन झाले. ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था आहे. ग्रंथाचे महत्त्व लक्षात घेऊन भारतातील ग्रंथालय चळवळीचा प्रारंभ बडोदा नरेश श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी केला. पुढे याच चळवळीला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सशक्त पाठिंबा देऊन जनमानसात ग्रंथांप्रती महत्त्व पटवून देण्याचे कार्य केले. जसजसा ग्रंथ व ग्रंथालय संकल्पनेचा विकास झाला तसतसे काळानुरूप त्यामध्ये स्थित्यंतरे येत गेली. ग्रंथशास्त्र म्हणजे Library Science ही स्वतंत्र अभ्यासशाखा तयार झाली. यामुळे ग्रंथ संस्कृतीचे महत्त्व पटत गेले व अधिक चांगल्या पद्धतीने ग्रंथसंवर्धन होऊ लागले.

वर्तमानात मात्र तंत्रज्ञानाची कास धरून लोकं टेक्नोसॅव्ही होण्याचा प्रयत्न करीत आहेत. साहजिकच या विचारसरणीचा परिणाम ग्रंथांवरही पडला आहे. लोकांना आजकाल, पुस्तक हातात घेऊन वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय करणे आहे, असे वाटते किंवा कागदाचा अतिरिक्त वापर होत असल्याने मानवाने आता ‘पेपरलेस’ होणे महत्त्वाचे असे काही तंत्रज्ञानप्रेमींना वाटते. पण, इथे महत्त्वाचा मुद्दा असा की ज्ञानाचा व्यावहारिक पातळीवरील वापर हाच खरा ज्ञानसंवर्धन करणारा ठरतो. उदा : शालेय पातळीवरच्या विद्यार्थ्यांना आपण ग्रंथरहित, पुस्तकरहित ठेऊन कसे ज्ञान देणार? आजकाल शाळांमध्ये educom सारखे तंत्रज्ञान आल्यामुळे दृश्य पातळीवरील त्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडते, पण अभ्यासाची गोडी लागण्यासाठी त्यांना नेमलेल्या सचित्र पुस्तकाची आकर्षकता, त्या कोऱ्या पुस्तकाचा स्पर्श इतर माध्यमातून कसा येणार? हातात पुस्तक घेऊन वर्णमाला, पाढे, अंक, अक्षरे, शब्द, कविता लघुगोष्टी इत्यादींचे जे वाचन होते, त्याचा परिणाम बालमनावर भाषा-काैशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने अधिक होतो. ‘विवेकवैराग्यदशका’ त समर्थ रामदासांनी वाचन, लेखनाला फार महत्त्व दिले आहे. ते म्हणतात, *‘लिहिणे नाही, वाचणे नाही। पुसणे नाही सांगणे नाही। नेमस्तपणाचा अभ्यास नाही।’* ग्रंथ वाचनाबाबतही समर्थ फार मोलाचा सल्ला देताना दिसतात, *‘काही वाची, चर्चा करी। एकांती जाऊन विवरी। प्रेचात येईल तो घ्यावा। अर्थ मनी।’* समर्थांना जी वाचन प्रक्रिया वाचनध्यास अपेक्षित आहे. त्या पद्धतीचा अनुभव संगणक, लॅपटाॅप यांवर कसा येणार! ग्रंथवाचनातील ही एकाग्रता, साधना यंत्र माध्यमातून कशी येणार?

७० ते ८० टक्के भारतीय जनता ग्रामीण जीवनाशी निगडीत आहे. या पार्श्वभूमीवर गावागावातील विद्यार्थी ग्रंथरहित ज्ञान कसे संपादन करणार? संपूर्ण भारतातील सर्वच ज्ञानशाखा शालेय पातळीपासून उच्चशिक्षणापर्यंत ग्रंथरहित होण्यासाठी कमीतकमी १०० वर्षाचा अवकाश लागेल. इतकेही करून ग्रंथाला मरण नाहीच. कारण व्यक्ती विनाश पावते पण तिचे विचार ग्रंथरूपाने काळाच्या पटावर अविनाशी, चिरंतन राहतात.

संपूर्ण महाराष्ट्रात वर्षाकाठी २४० च्या आसपास साहित्यसंमेलने होतात. ज्यांची सुरूवातच ग्रंथदिंडीपासून होते. म्हणजे ज्याच्या कृपेने आपण या संमेलनाचा एक घटक झालो त्या ग्रंथाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. याशिवाय अशा ठिकाणी भरणाऱ्या ग्रंथमेळाव्याची व्यावहारिक देवाण-घेवाण ही एक व्यवहार्य बाजू मानली तरी यामधून व्यापक स्वरूपाचे ग्रंथ आदान-प्रदान घडून येते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात लेखन व वाचन यांचा फार माैलिक शब्दात गाैरव केला आहे. आणि ग्रंथोपजिविये विशेषी लोकी इये। दृष्टादृष्ट विजये। हो आवे।’ म्हणजेच ज्यांची ग्रंथावर उपजीविका चालते म्हणजे लेखक व वाचक असे दोन्ही. ज्ञानदेवांना इथे केवळ लाैकिक अर्थाने उपजीविका म्हणायचे नाही तर साहित्यनिर्मिती करणारे लेखक, साहित्यिक व या लेखनाचा आस्वाद घेणारे ज्ञानोपासक वाचन असे म्हणायचे आहे. ६०० वर्षांपूर्वी ज्ञानदेवांनी ग्रंथ- लेखक- वाचक, या एकाच सूत्रामध्ये गुंफलेल्या तीनही घटकांचा गाैरव केलेला आहे. यावरून ग्रंथाचे महात्म्य केवढे असेल, याचा आपल्याला प्रत्यय येतो. हे ग्रंथ महात्म्य ज्यांना समजले तेच पुढे दृष्ट म्हणजे लाैकिक व अदृष्ट म्हणजे पारलौकिक यावर विजय मिळवू शकतात, असे ज्ञानदेवांनी लक्षणेने सूचित केले. यावरून हे स्पष्ट होते की जग कितीही विज्ञान, तंत्रज्ञानमार्गी झाले तरी ज्ञानसंपादनाची जी काही नैसर्गिक माध्यमे आहेत ती शाश्वतच आहे. म्हणूनच ग्रंथ हे ज्ञानाचे शाश्वत माध्यम आहेत.

(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)

दि.२०/११/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, November 10, 2019

पुलंचा विठ्ठल..... समूह मनाचा आरसा

🔶पुलंचा विठ्ठल..... समूह मनाचा आरसा🔶

➡️ डाॅ.अमृता इंदूरकर

 नोव्हेंबर महिन्यात काय योग जुळून आला आहे बघा! ५ नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून महाराष्ट्र, गोवा आणि जेथे जेथे मराठी भाषाप्रेमी आहेत, तेथे साजरा होतो. यासोबतच यावर्षी ८ नोव्हेंबरला हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीवर्षाची सांगता होत आहे. ‘पु. ल. आणि विनोद’ हे समीकरण इतके एकरूप झाले आहे की जनमानसात त्यांची विनोदी लेखक म्हणून असणारी प्रतिमा वाचकांना अधिक प्रिय आहे. पु. ल. आपल्याला यशस्वी विनोदी लेखक म्हणून जास्त परिचित असले तरी त्यांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व मात्र, अष्टपैलू आहे. विनोदी लेखक, नाटककार, एकांकीकाकार, रूपांतरकार, प्रवासवर्णनकार, संगीततज्ज्ञ, दिग्दर्शक, गायक, अभिनेता व अशा सर्व वैशिष्ट्यांनी पु. ल. परिपूर्ण आहेत. पण, एक नाटककार म्हणून त्यांनी एकूणच मराठी नाट्यक्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केलेले आहे. एके ठिकाणी पु. लं. नी म्हटले आहे. ‘मला या ‘जीवन’ वगैरे शब्दांची मोठी धास्ती वाटते. जगण्याला ‘जीवन’ म्हणावे अशी माणसं हजार वर्षांतून एकदा जन्माला येतात. परंतु, रसिकांना आणि पुलंवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना पुलंसारखे व्यक्तिमत्त्व हजार वर्षांतून एकदाच जन्माला येत असते, याची खचितच जाणीव आहे.

 पु. लं. चा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी गावदेवी पुलाजवळच्या हरिश्चंद्र गोरेगावकर रस्त्यावरील कृपाळ हेमराज चाळीत झाला. पु. लं. ची आई लक्ष्मीबाई आणि वडील लक्ष्मणराव देशपांडे हे सामान्य आर्थिक परिस्थितीत जगणारे दाम्पत्य असूनही दोघांनाही नाटकाची आवड होती. नाटकाचा वारसा आपल्याला आईवडिलांकडूनच मिळाला आहे. हे त्यांनी ‘गणगोत’ मध्ये नमूद केले आहे. ते म्हणतात ‘देवाच्या खालोखाल माझ्या वडिलांनी बालगंधर्वाना मानले आणि जाताना मला आणि माझ्या भावडांना ते हाच भक्तिभावाचा वारसा ठेवून गेले. अशा या कलासक्त घराण्याचा वारसा लाभलेल्या पु. लं. ची जेवढी स्वतंत्र व रूपांतरित नाटके लोकप्रिय ठरली तितक्याच त्यांच्या एकांकिकादेखील लोकप्रिय ठरल्या. ‘विठ्ठल तो आला आला’, ‘सांत्वन’, ‘नाही आसू नाही माया’, ‘सारं कसं शांत शांत’, ‘छोटे मासे मोठे मासे’, ‘सदू आणि दादू’ इत्यादी एकांकिका त्यांनी लिहिल्या. यामध्ये ‘विठ्ठल तो आला आला’ ही एकांकिका लोकसमूहाला स्वच्छ आरसा दाखविणारी एकांकिका आहे. प्रत्यक्ष एकांकिकेकडे जाण्याआधी ‘एकांकिका म्हणजे काय’ हे देखील बघणे आवश्यक आहे.

‘एकांकिका’ हा स्वतंत्र वाङ्मयप्रकार म्हणून आता सर्वमान्य झालेला आहे. ‘विश्वकोशा’त एकांकिकेची संकल्पना स्पष्ट केलेली आहे ती अशी, ‘एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. एकांकिका नाटकाचे लघुरूप आहे’, अशी एकांकिकेची व्याख्या त्यात आढळते. डाॅ. तारा भवाळकर एकांकिकेची संकल्पना मांडताना म्हणतात की, ‘नाट्यानुभवातील एकरसात्मकता, एककेंद्रित्व आणि एकजिनसीपणा हा या एकाच अंकात जेव्हा नाट्यरूपाने व्यक्त होतो, तेव्हा तिला एकांकिका म्हणता येईल. परंतु, एकांकिकेत एकच घटना, एखादाच प्रसंगानुभव एकरसात्मक, एकजिनसीपणाने प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा असतो. त्यात व्यक्तिदर्शन, उपकथानके वा उपविषयांना फारसा वाव नसतो. कारण एकांकिकासुद्धा पूर्णाकृती आहे. ती एखाद्या बिंदूसारखी असते. नाटक आणि एकांकिकेत आकाराचा फरक आहे. त्यात पात्रसंख्या निश्चिती करता येत नाही. त्यात एकेरी आशय मांडण्यात येतो व तोदेखील अधिक जटिल, अधिक व्यामिश्र, परिपूर्ण असतो. एखादेवेळी नाटकसुद्धा जो प्रभावी आशय, परिणाम साधू शकत नाही तो एकांकिका साधू शकते. एकांकिकेचे नाटक होऊ शकते. कारण त्याचे सामर्थ्य, आशयाची ताकदच मुळात जबरदस्त असते.
        
‘विठ्ठल तो आला आला’ हा पुलंचा एकांकिकासंग्रह १९६१ साली प्रसिद्ध झाला. या एकांकिकेचे कथाबीज मोठे रोचक आहे. ही एकांकिका घडते ती एका विठ्ठल मंदिरात. तेथे ‘युगे अठ्ठावीस’ ही आरती जोरजोरात चाललेली आहे. मंत्रपुष्पांजली इत्यादीचा वेगवेगळ्या आवाजात गोंधळ सुरू आहे. गाभाऱ्यातील विठ्ठलाच्या कपाळावर आठ्या पडलेल्या आहेत. या गदारोळातच विठ्ठल ‘थांबा’ असे म्हणतो. पण, त्याचे ‘थांबा’ कोणालाच एेकू येत नाही. मग विठ्ठल वैतागून आपल्याच कपाळावर बुक्क्या मारून घेतो. विठ्ठल रागावून बोलतो. पण, विठ्ठलाची दगडी मूर्ती बोलेल यावर कुणाचा विश्वासच बसत नाही. त्यामुळे एकमेकांची बिंगे माहिती असलेले भटजी, मास्तर, वकील, डाॅक्टर, शेटजी, शिंपी, सखुबाई, द्वारकाबाई यांना एकमेकांचा संशय येतो, मग एकमेकांची उणीदुणी बाहेर काढली जातात. भांडणे सुरू होतात. प्रत्येकजण एकमेकांच्या ढोंगावर प्रहार करतो. शेवटी विठ्ठल भटजींच्या कमरेत गुद्दा लगावतो, तेव्हा संघर्षाचा प्रसंग निर्माण होतो.
 
गाभाऱ्यातून आवाज येतो तो पांडुरंगाचा आहे हे आंधळ्या भिकाऱ्याला तेवढे कळते. पण, इतर डोळ्यांना ते कळत नाही. शिवाय त्यांचा आंधळ्याच्या बोलण्यावर विश्वासही नाही. शेवटी भटजी गाभाऱ्यातून आवाज येतो आहे, म्हणून आत जातात, अंगावरची कोळीष्टके झटकत परत येतात. मग ‘बोलणारा विठ्ठल आहे’ हे खरे की खोटे हे तपासून पाहण्यासाठी शेठजी रुपया सोन्याचा करायला सांगतात. पण, तो रूपयाच खोटा असतो. मग विठ्ठल आंधळ्याला डोळस करतो.
 
विठ्ठल मग आपल्या तक्रारी सांगतो. त्याला उभे राहून कंटाळा आला आहे. भटजी नैवेद्य हडप करतो. पितांबर धूत नाही. बेकार उभे राहण्यापेक्षा काही काम द्या म्हणून तो विनंती करतो. पण प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात आता कुठलाच राम नाही, असे सांगतो. एकप्रकारे जगातल्या भ्रष्टाचाराचे दर्शनच विठ्ठलाला होते. शेवटी सर्वजण ‘तुम्ही आहात तिथेच ठीक आहात’, असे विठ्ठलाला सांगतात. सर्वांच्या सांगण्यावरून विठ्ठल परत देव्हाऱ्यात कर कटेवर ठेवून विटेवर उभा राहतो. जाण्यापूर्वी विठ्ठल आंधळ्याच्या विनंतीवरून त्याला परत आंधळे करतो.

देव गाभाऱ्यात गेल्यावर तो स्थिर आहे की नाही हे भटजीला तपासून पहायला वकील सांगतो आणि तो स्थिर आहे हे लक्षात येताच सर्वजण ‘हेचि दान देगा देवा’ म्हणायला सुरूवात करतात आणि एकांकिका संपते.

‘विठ्ठल तो आला आला’ ही एक फॅण्टसी विनोदी एकांकिका आहे. अद्भुताचा इतका चांगला उपयोग क्वचित कोणी केला असेल. भक्तांचा व पुजाऱ्याचा ढोंगीपणा उघडकीस आणणारी ही पुलंची एकांकिका अर्थपूर्ण आहे. या एकांकिकेतून सामाजिक दंभावर पुलंनी कोरडे आेढले आहेत. या एकांकिकेचा आशय इतका जबरदस्त आहे की बाह्य सजावटीकडे लक्ष जात नाही. विठ्ठलाने प्रत्यक्षात येणे, या फॅण्टसीद्वारे लेखकाने एकप्रकारचे वास्तवच दर्शविले आहे.फॅण्टसी आणि वास्तव असे हे परस्पर विरोधी नाते आहे. पुलंनी सामाजिक वृत्तीचं तथाकथित रूढीचं मूर्तिभंजन विडंबनाच्या शस्त्राने केले आहे. त्यातील नर्मविनोद एेकून वरवर हसू येते, पण पुढच्याच सणाला वाचक विचारगंभीर झाल्याशिवाय राहत नाही. एकप्रकारची विपरितता अधोरेखित केली आहे. आंधळ्याला केवळ आवाजानेच विठ्ठलाची जाणीव होते तर तिथल्या डोळसांना मात्र कळत नाही. भटजींचे पात्र लक्षात घेता धर्म संस्कृतीच्या नावावर जी थोतांडं होतात तिचे खरे आेंगळवाणे रूप आपल्याला यामध्ये दिसते.

विठ्ठलाला सुद्धा लोकं स्वतःच्या स्वार्थासाठी जाऊ देत नाहीत. यावरून जगात एकही क्षेत्र भ्रष्टाचारापासून मुक्त नाही. मग ती भक्ती का असेना हेच पुलंना सांगायचे होते. समाजाच्या डोळ्यांत याद्वारे झणझणीत अंजनच घातले आहे. या एकांकिकेतील सर्व माणसे आपला राग दुसऱ्यांवर काढताना दिसतात. तसे भटजी मास्तरांवर, शेठजी वकिलावर.... हा गोंधळ पाहून वाचकाला प्रकर्षाने जाणवते की यातील माणसे माणसासारखी वागत नाहीत आणि देव देवासारखं वागत नाही. जगातील अनागोंदी पाहून देवालाही वैताग यावा, अशी ही परिस्थिती आहे.'देव' दाखवता आला नसता तर ही एकांकिका उभीच राहू शकली नसती. सुरूवातीला तो बोलतो पण दिसत नाही. त्यामुळे देवळातील मंडळींना प्रत्येकाला आपल्या उण्यावर असलेला कोणी प्रतिस्पर्धीच बोलत आहे, असे वाटते. कारण देवाचेही शोषण करणारा भटजी येथे आहे. ‘ नशिबाचे भोग कुणा चुकले.गप् गुमान विटेवर उभं रावा’ हे आंधळ्याचे वाक्य भारतीय माणसाचा दैव यावरील विश्वास प्रकट करणारे आहे. आंधळाच शेवटी विठ्ठलाला जगाची रीत समजावून सांगतो. म्हणूनच की काय एकांकिकेच्या शेवटी विठ्ठलाला तो पुन्हा आंधळे करून मागतो, कारण जगाचा व्यवहारच तसा आहे.

पुलंचं लिखाण संपूर्णतया स्वतंत्र धाटणीचे आहे. भालचंद्र नेमाड्यांनी ‘देशी’ अशी संकल्पना मांडली आहे. त्याला आशयदृष्ट्या समांतर जाणारी ही कलाकृती वाटते. स्वतंत्र प्रतिभेची झेप घेऊन या एकांकिकेत पुलंनी पात्रागणिक वृत्तीचे काटेकोर निदर्शन केले आहे. पुराणकाळाची व समकाळाची पुलंनी उत्तम सांगड घातलेली दिसते. आजच्या परिस्थितीमुळे देवही कालबाह्य झाला असल्यामुळे त्याच्या हातात केवळ विटेवर उभे राहणेच उरले आहे. जणूकाही आजच्या जगरहाटीत देवही आउटडेटेड झाला आहे.असा एक विचार पुलंनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. पुलंनी विठ्ठलालाही माणसांच्या तुलनेने सर्वसामान्य केला आहे. भोवतालच्या जीवनातील हास्यगर्भ नाट्य टिपून त्याचा एकांकिकेच्या रुपाने समर्थपणे आविष्कार करण्याचे कार्य मुख्यत: पुलंनी केले. ‘विठ्ठल तो आला आला’ ही एकांकिका आंतरिक टोचणी उरात बाळगून वरवर हसविणारी कलाकृती आहे. तेवढीच समूहमनाला आरसा दाखविणारीही आहे.

(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)

दि.१०/११/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल