हरिपाठातील नामसंकीर्तन महात्म्य
डाॅ. अमृता इंदूरकर
ज्येष्ठाच्या पाठीवर जसा अाषाढ येतो तसाच ज्येष्ठ म्हणजे निवृत्तीनाथ तर अाषाढ म्हणजे ज्ञानदेव, असा विचार दरवर्षी अाषाढ येऊ घातला की मनात येताेच. अाजचा योगही पहा कसा जुळून अाला अाहे. अाज संत निवृत्तीनाथांची पुण्यतिथी देखील अाहे. अाजच्या या निवृत्तीनाथांच्या पुण्यतिथीच्या पर्वावर पुढे येऊ घातलेल्या अाषाढी एकादशीचा कौल घेऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचे महात्म्य उलगडण्याची संधी, हेही भाग्यच अाहे!
प्राचीन काव्याचा एकूणच कालखंड बघितला तर संख्यात्मकदृष्ट्या संतांची व त्यांच्या काव्यनिर्मितीची श्रीमंती अापल्या लक्षात येते. त्यातही संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनातल्या माऊलीचे मूर्त रुपच. ज्ञानदेवांच्या साहित्यसंपदेचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक तत्त्वज्ञानात्मक व दुसरा भावात्मक. कारण त्यांच्या साहित्यातील ईश्वरी अस्तित्वाचे दार्शनिक स्वरुप वेगळ्या अंगांनी जाताना दिसते, तर भावनात्मक स्वरुप वेगळ्या अंगांनी जाताना दिसते. ‘चांगदेवपासष्टी’, ‘अमृतानुभव’ हे ग्रंथ त्यांचे दार्शनिकत्व सिद्ध करणारे अाहेत. या दोन्ही ग्रंथांत आध्यात्मिक तत्त्वज्ञानच स्पष्ट झालेले दिसते. ‘ज्ञानेश्वरी’ च्या बाबतीत थोडक्यात बोलायचे झाले तर ज्ञानेश्वरी ही खरोखर शब्दशः ‘भावार्थदीपिका’ अाहे. तत्त्वज्ञानाचा व भक्तिमय काव्याचा मनोज्ञ संगम यात झालेला अाहे. ‘जे जे भूत भेटेल तें तें भगवंत मानणे’ हाच ज्ञानदेवांच्या मते खरा भक्तियोग होय. ज्ञानेश्वरी ही ज्ञानदेवांसाठी अात्मानुभव होती. पण, ज्ञानदेवांची अभंगरचना, हरिपाठ मात्र त्यांचा स्वानुभव ठरते.
ज्ञानदेवांनी रचलेले हरिपाठ म्हणजे सामान्य, अतिसामान्य समृद्ध भक्ताचा वेद अाहेत. या हरिपाठाची महती अशी की सामान्य भक्त पारंपरिक, आध्यात्मिक, कर्मठ अशा तत्त्वज्ञानापर्यंत पोहचू शकत नाही म्हणून ज्ञानदेवांनी हरिपाठाच्या रुपाने त्या तत्त्वज्ञानाचे सार अधिक सोपे, सरल करून केवळ नामभक्तीचा ठेवा हाती दिला. ज्ञानेश्वरीतही काही अशी नामसंकीर्तनगौरव अाढळतो, पण तो मुख्यत: गीतेतील सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: अश्या श्लोकांवरील भाष्याच्या आलेला आहे.पण हरिपाठात मात्र नामस्मरण मार्गाचा स्वतंत्र थाट बघायला, अनुभवायला मिळतो. किंबहुना, त्यासाठीच त्याची निर्मिती झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्या समृद्ध जीवांना कर्मठ शक्ती, ईश्वरपूजा जमत नाही त्यांनी काय मग भक्ती करणे सोडून द्यायचे? नाही! या समस्येवरचा उपाय म्हणजेच ‘हरिपाठ’.
हरिपाठात ज्ञानदेवांनी सरल, सहजभक्तीच्या अाड येणाऱ्या पाच समस्यांचा, अडसरांचा प्रामुख्याने उल्लेख केला अाहे. त्या समस्या म्हणजे
१)योगयागविधी २)तीर्थव्रतनेम ३)जप-तपकर्म ४) योगयागक्रिया ५) यज्ञयागक्रिया.
१)योगयागविधी २)तीर्थव्रतनेम ३)जप-तपकर्म ४) योगयागक्रिया ५) यज्ञयागक्रिया.
एखाद्या सिद्ध पुरुषाला, हठयोग्याला या मार्गाने उपचारांनी परमेश्वरप्राप्ती होणे कठीणच. मग त्यांनी कोणत्या मार्गावरून जायचे जेणेकरून ईश्वरसान्निध्य मिळेल तर यासाठी ज्ञानदेव हरिपाठाच्या प्रारंभीच फारच साधेपणाने अावाहन करतात.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।तेणे मुक्ती चारी साधियेल्या।।
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।
शुद्ध मनाने फक्त या इष्टदेवतेच्या दारात क्षणभरच उभे रहा, तिथेच तुम्हाला चारही मुक्ती प्राप्त होतील. कारण पाप-पुण्याच्या हिशोबात भक्तीच जास्त वजा होत असते. तेव्हा भक्तीमध्ये पुण्याच्या हिशोब न करता नि:स्वार्थपणे हरिचा जप करा. कारण तो हरी अाणि अापला अात्मा हे जणूकाही जीवशिवएैक्य अाहे. हा हरी चराचरात वास करतो. ‘भरला घनदाट हरि दिसे’ मग ‘वाया तू दुर्गम न घाली मन’. त्या हरीच्या प्राप्तीसाठी मग व्यर्थच दुर्गम मार्ग का निवडतोस? ज्ञानदेव या हरीचे स्वरुप स्पष्ट करताना म्हणतात,
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।
शुद्ध मनाने फक्त या इष्टदेवतेच्या दारात क्षणभरच उभे रहा, तिथेच तुम्हाला चारही मुक्ती प्राप्त होतील. कारण पाप-पुण्याच्या हिशोबात भक्तीच जास्त वजा होत असते. तेव्हा भक्तीमध्ये पुण्याच्या हिशोब न करता नि:स्वार्थपणे हरिचा जप करा. कारण तो हरी अाणि अापला अात्मा हे जणूकाही जीवशिवएैक्य अाहे. हा हरी चराचरात वास करतो. ‘भरला घनदाट हरि दिसे’ मग ‘वाया तू दुर्गम न घाली मन’. त्या हरीच्या प्राप्तीसाठी मग व्यर्थच दुर्गम मार्ग का निवडतोस? ज्ञानदेव या हरीचे स्वरुप स्पष्ट करताना म्हणतात,
‘अव्यक्त निराकार नाही ज्या अाकार। जेथोनि चराचर त्यासी भजे।।’ शेवटी काय तर या सृष्टीमधली प्रत्येक गोष्ट त्या-त्या वैशिष्ट्यांसकट अात्मसात केली तरच ती अाकळते व प्राप्तही होते. यासाठी ते उदाहरण देतात की भाव विरहित भक्ती, भक्तीविरहित मुक्ती, बळविरहित शक्ती बोलू व दाखवू नये. उलट लोकांना दाखविण्यासाठी करण्यात येणारा योगयागविधि हा सिद्धीचा मार्ग तर नव्हेच उलट दंभमार्ग प्रकट करणारा अाहे. नाना तिर्थांची भ्रमंती करून मुखातील हरिनामात चित्तच नसेल तर ते सर्व व्यर्थच अाहे. उलट जो निर्मळ मनाने हरिचे उच्चारण करील त्याच्या अनंत-पापराशी क्षणमात्रच लयाला जातील, हा विश्वास ज्ञानदेव सामान्यांना देतात.
दुसरी समस्या म्हणजे ‘तीर्थव्रतनेम’. केवल उपचार म्हणून तीर्थ, व्रत, नेम हे सर्व व्यर्थ अाहे, जर त्या कारणांमध्ये भावनेचा अभाव असेल तर अशा भावविरहित व्रतवैकल्याने मिळविलेली उपाधी वायाच जाणार. कारण सातत्याने हरीचा उच्चार हा यंत्रवत पद्धतीने होऊ शकत नाही. ही गोष्ट भावनेने अाकळण्याची अाहे म्हणून ते म्हणतात, ‘भावबळे अाकले येऱ्हवी नाकळे’. किमान भावनेने हा नाममहिमा समजण्याचा प्रयत्न केला तर कळेलही नाहीतर एरव्ही कळणारच नाही. अर्थात हेही वाटते तितके सोपे नाही, ज्याप्रमाणे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याचा कण पकडणे, उचलणे कठीण असते, त्याप्रमाणेच हे नाममहात्म्य अाहे.
‘पारियाचा रवा घेता भूमीवरी। यत्न परोपरी साधन तैसे। अाज नामस्मरण खूप केले, उद्या काहीच नाही, मग पुन्हा कालांतराने सोयीने असे नामस्मरण काही कामाचे नाही. ते तितकेच सहज,अनायास यायला हवे. कारण ‘रामकृष्ण’ नामाच्या नित्य स्मरणाने कळिकाळही दूर राहतो. अापल्या दैनंदिन जीवनाच्या अाचरणातील अनंत पापांचे कळप जळत जळत पुढे जातात. इतकी या नामाची सिद्धी अाहे.
तिसरी समस्या अाहे ‘जप-तप-कर्म.’ ज्ञानदेव म्हणतात, सगळ्या वेदशास्त्र- श्रुती- स्मृती- पुराण यांचे सार एकच ते म्हणजे ‘नारायण’. त्यांच्या प्राप्तीसाठी खूप जप, कठोर तप, त्यातून येणाऱ्या कर्मकांडात्मक क्रिया या सर्व श्रम वाया घालविणाऱ्या अाहेत. उलट हरिनामाचे एकमेव शास्त्र असे अाहे जे कुळगोत्र वर्ज्य मानते. अात्मसिद्धीच्या दृष्टीने हे सगळे निरर्थक उपाधींचे अवडंबर अाहे.
तिसरी समस्या अाहे ‘जप-तप-कर्म.’ ज्ञानदेव म्हणतात, सगळ्या वेदशास्त्र- श्रुती- स्मृती- पुराण यांचे सार एकच ते म्हणजे ‘नारायण’. त्यांच्या प्राप्तीसाठी खूप जप, कठोर तप, त्यातून येणाऱ्या कर्मकांडात्मक क्रिया या सर्व श्रम वाया घालविणाऱ्या अाहेत. उलट हरिनामाचे एकमेव शास्त्र असे अाहे जे कुळगोत्र वर्ज्य मानते. अात्मसिद्धीच्या दृष्टीने हे सगळे निरर्थक उपाधींचे अवडंबर अाहे.
चवथी ‘योगयोगक्रिया’ व पाचवी ‘यज्ञयोगक्रिया’ या समस्या देखील मानवाचे श्रम व्यर्थ ठरविणाऱ्या अाहेत. या अवडंबर मार्गापेक्षा नाम श्रेष्ठ अाहे. या नाममहात्म्यातून ज्ञानदेवांनी अप्रत्यक्षपणे व्रतधर्माचा, वर्णधर्माचा अधिक्षेप सुचविलेला अाहे. ‘योगयोग क्रिया धर्माधर्म माया। गेले ते विलया हरिपाठी।।’कारण जाती, वित्त, गोत्र, कुळ, शील हा विचारच मुळात लौकिक पातळीवरचा अाहे. नाम तर याहीपलीकडचे म्हणजे अलौकिक अाहे. नामसंकीर्तन हे या लटिक्या संसारातून तरून जाण्याचे सर्वात सोपे साधन अाहे. त्यासाठी काळवेळेची शुद्धी पाहावी लागत नाही. उलट नामसंकीर्तन हे कार्य ज्याप्रमाणे एखादा भ्रमर सुमनकालिकेमध्ये नकळतच गुंततो. त्याप्रमाणे हे नामसंकीर्तन व्हायला हवे.
ज्ञानदेव सांगतात की मनाच्या मार्गाने जो जातो अाणि वासनेला बळी पडतो तो हरिनामसंकीर्तनातून मिळणाऱ्या अानंदाला मुकतो. ‘मनोमार्गे गेला तो तेथे मुकला’. पण, जो रामकृष्ण नामात तल्लीन होतो. त्याला उन्मनीच्या अानंदाचा लाभ होतो. रामकृष्णनामी उन्मनीच्या अानंदाचा लाभ होतो.
‘रामकृष्णनामी उन्मनी साधिली। तयासी लाधली सकल सिद्धी।’ हरिपाठाद्वारे ज्ञानदेव हेच सांगण्याचा प्रयत्न करीत अाहेत की, माणसाचे मन व या मनाचे व्यापार फार अतर्क्य असतात. मानवी स्वभाव फारच सहजरीत्या अापल्या इच्छा, अाकांक्षा, मोह यांना बळी पडून जीवनात त्यांनाच प्राधान्य देत असतो. या मनोव्यापारात मोडणारा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे नीती, अनीती, पाप-पुण्य, धर्म-अधर्म, कर्म- अकर्म माणुस अापल्या श्रद्धेची, भक्तीची, धर्माची, पुण्याची टक्केवारी शेवटी यावरूनच तपासत असतो. पण हरिनामाचा व यावरील सर्व गोष्टींचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. तुमचा धर्म, पुण्य कर्म हे काही भक्ती मोजण्याचे मापक नसते. नामभक्तीचे जग या सर्वांच्या पलीकडचे अाहे. कोणते भक्तीतत्त्व निश्चित करायचेच असेल तर ज्ञानदेव म्हणतात,
एकतत्त्व नाम दृढ धरी मना। हरीसी करुणा येईल तुझी।।
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद। वाचेसी सद्गद जपा अाधी।।
एकतत्त्व नाम दृढ धरी मना। हरीसी करुणा येईल तुझी।।
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद। वाचेसी सद्गद जपा अाधी।।
‘हरिनाम’ हे एकमेव तत्त्व मनात दृढपणे, कायम ठेवले तर हरीची प्राप्ती होणारच कारण ‘रामकृष्णगोविंद’ हे नामच इतके सोपे अाहे की ज्याला कोणत्या कर्मकांडी बैठकीची गरजच नाही. ज्याला रामाचा अाचार, कृष्णाचा विचार मनोमनी कळला तो रामकृष्णगोविंदमय झाला. या २६ व्या हरिपाठातून रामकृष्ण गोविंद नामसंकीर्तनाची महती ज्ञानदेवांनी सांगितली व शेवटी जाता जाता ते एका सूचनेकडे लक्ष वेधतात. ते म्हणतात, या हरिपाठाचे नित्यपठण करावे असे सांगतातच, पण पुढे म्हणतात, ‘असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन। उल्हासे करून स्मरण जीवी।। अशा पद्धतीने हे नामसंकीर्तन व्हायला पाहिजे.
या हरिपाठातून हे स्पष्ट होते की, ‘हरिविण सौजन्य नेणे काही’ अशी ज्ञानदेवांची श्रद्धा अाहे. हरिपाठातील अभंगवाणीतून अाशय अभिव्यक्तीनुरुप प्रकट होणारी सहज सुलभता फारच तरल अाहे. एकूणच असे म्हणता येईल की हरिपाठात भक्तीचा अोलावा, तत्त्वज्ञानाचे सुलभीकरण, नाममहात्म्याची तल्लीनता यांचा अद्भुत असा त्रिवेणी संगमच झाला अाहे.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.३०/०६/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल
#अमृतवेल