कवित्वाची पाक सुराही: अमृता प्रीतम
©डाॅ.अमृत इंदूरकर
'अक्षरो का हुस्न, कागज की अमानत है’ असे म्हणणाऱ्या किंवा ‘मेरी सारी रचना क्या; कविता और क्या कहानी और उपन्यास मैं जानती हूँ, एक गैरकानूनी बच्चे की तरह है,’ अशी कबुली देणाऱ्या किंवा ‘हर व्यक्ती की पीडा उसकी अपनी होती है, पर कई बार इन पीडाओं की आकृतियाँ मिल जाती है।’ असे आपल्या साहत्यानिर्मितीचे एक कारण सांगणाऱ्या हिंदी-पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम अाज आपल्यामध्ये असत्या तर समस्त भारतीयांनी येत्या ३१ ऑगस्टला पूर्ण होणारे त्यांचे जन्मशताब्दीवर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले असते. खरंच विश्वास बसला असता का, की अमृता प्रीतम यांनी वयाची शंभरी गाठली? नक्कीच नाही!
भारतीय साहित्यविश्वाचा विचार केल्यास या साहित्यविश्वाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक उंचीवर नेण्याचे कार्य कोणी केले असेल तर ते अमृता प्रीतम यांनी पंजाबी आणि तितकेच हिंदी वाङ्मयाला त्यांच्या साहित्यकृतींनी सौंदर्य प्रदान केले आहे, सकस बनविले आहे. अमृता प्रीतम यांच्याशिवाय पंजाबी हिंदी वाङ्मयाचा विचार परिपूर्ण होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे. ३१ ऑगस्ट १९१९ साली जन्मलेल्या अमृता यांचा साहित्यिक पिंड मूलत: कविव्यक्तिमत्त्वाचा आहे. असे असले तरी त्यांनी कादंबरी, कथा, ललित- गद्य आत्मचरित्र, डायरी, पत्रे, वैचारिक मूल्यांकनावर आधारित निबंध इत्यादी वाङ्मयप्रकार लीलया हाताळले आहेत. त्यावर आपला एक वैशिष्ट्यपूर्ण अमीट असा ठसा उमटवला आहे. अमृता प्रीतम यांचे एकूण १६ काव्यसंग्रह आहेत. त्यापैकी ‘कागज ते कैनवास’ साठी १९८१ साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्या सन्मानित केल्या गेल्या. हा बहुमान प्राप्त झालेल्या त्या पंजाबी साहित्यामधील पहिल्या कवयित्री ठरल्या.
एका कवीला शेवटी काय प्रिय असते? कोणत्याही अभिजात साहित्यिकाला, कवीला त्याची लेखणी, कलम प्रिय असते. तीच खरी त्याच्या सुख- दु:खाची साथीदार असते ही कलमच त्याच्या काव्य-व्यक्तिमत्त्वाचा खरा मापदंड असते. प्रत्येक कवी स्वत:च्या काव्य-व्यक्तिमत्त्वाचा, निर्मिती प्रक्रियेचा, कविता -कलम यांचे त्याच्या आयुष्यात कोणते स्थान आहे या सर्वांचा सतत विचार करीत असतो. अमृता प्रीतमही त्या जाणीवा व्यक्त करताना अपवाद ठरल्या नाहीत. त्यांच्यासाठी त्यांचा आपल्या कलमवर असा काही भरोसा होता की जसा एखाद्या भक्ताचा त्याच्या ईश्वरावर असतो तसा. या कलमला उद्देशून त्यांनी म्हटले आहे ‘ईश्वर जैसा भरोसा तेरा’ कारण आयुष्यात असे कितीतरी दिवस आले जेव्हा या कलमलाच गळ्याजवळ घेऊन रडल्या आहेत. त्या म्हणतात, ‘यह कलम मेरे लिए सदा हाजिर-नाजिर, खुदा के समान रहा है। इसे आँखो से देख सकती हूँ, हाथों से छू सकती हूँ और एक सूने कागजों की तरह इसके गले लग सकती हूँ,’ या लेखणीनेच अमृता प्रीतम यांना त्यांच्या आयुष्य-कहाणीचा शोध घ्यायला कायमच साथ दिली. त्यांची काव्यकहाणी नेहमीच आदी आणि अंताच्या शोधात राहिली आहे.
पण, प्रत्येक कवीचा शोध हा काही फार सुखावणारा नसतोच प्रत्येकाचे दु:ख हे त्याचेच असते, पण सामान्य व्यक्ती या दु:खाला कुठलाच आकार देऊ शकत नाही. मात्र, कवी आपल्या सृजन दु:खाला नेहमीच कलात्मक सौंदर्याने परिपूर्ण असा आकार देऊ शकतो. आयुष्यातले छोटे- छोटे आघात देखील कवीला प्रतिभाहीन करतात म्हणजे त्या आघाताचे दु:ख आणि त्या दुु:खामुळे ती प्रतिभा कवीचा साथ सोडते, असे दुहेरी दु:ख कायमच कवीच्या वाट्याला येते. म्हणूनच अमृता प्रीतम म्हणतात,
कलम ने आज गीतों का काफिया तोड दिया
मेरा इश्क यह किस मुकाम पर आ गया है।
मेरा इश्क यह किस मुकाम पर आ गया है।
एकीकडे रुसलेल्या कवितेचे दु:ख असले तरी दुसरीकडे त्यांना आपल्या कवयित्री असण्याचा सार्थ अभिमान होता. जेव्हा जेव्हा मृत्यूपासून आयुष्याचा एक-एक क्षण उधार घेतला आहे तेव्हा तेव्हा माझ्या गीतांनी या क्षणांची किंमत अदा केली आहे, असे आपल्या कवितेत त्या मोठ्या अभिमानाने म्हणत.
अमृता प्रीतम यांच्या कवितेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कविता ‘ककनूसी नस्ल’ ची आहे. हा शब्द त्यांचाच आहे. अमृता यांना सूर्यप्रतिमेचे प्रचंड आकर्षण होते. त्यांच्या काव्यातून या सूर्यप्रतिमा, तेजप्रतिमा इतक्या ठिकाणी प्रकाशमान होताना दिसतात की सूर्याला त्या आपल्या प्रत्येक रचनेचे जणू काही अर्घ्यच देत आहेत की काय असे वाटावे. ककनूस म्हणजे फिनिक्स पक्षी. तो स्वत:चीच राख सूर्याला अर्पण करतो. या सूर्याला त्यांनी कधी केशरदुधाचा कटोरा म्हटले, त्याची लाली म्हणजे मेहंदी आहे. अशी कल्पना केली. वैयक्तिक प्रेमकवितांमध्ये तर या सूर्यप्रतिमा असंख्य किरण सर्वदूर पसरावेत, तशा विखुरल्या आहेत. त्याशिवाय त्यांच्या सामाजिक कवितांमध्ये देखील या सूर्यप्रतिमेला आवाहन केलेले आहे. त्या एवढ्यावरच नाही थांबल्या तर सूर्याच्या या सर्व रुपांव्यतिरिक्त सूर्यासोबत संभोगाची देखील कल्पना केली आहे. नि:संशय या कल्पनेने एका उत्तम कलात्मक रचनेला जन्म दिला आहे.
एक कटोरा धूप का
मैं एक साँस मे पी लूूँ
और एक टुकडा धूप का
मैं अपनी कोख मे रख लूूँ
और इस तरह शायद
जन्म-जन्म का जाडा बीत जाये...
मैं एक साँस मे पी लूूँ
और एक टुकडा धूप का
मैं अपनी कोख मे रख लूूँ
और इस तरह शायद
जन्म-जन्म का जाडा बीत जाये...
अमृत प्रीतम यांच्या कवितांचा एक मोठा भाग प्रेमजाणिवेनी व्यापलेला आहे. ती त्यांच्या काव्याची केंद्रवर्ती जाणीव आहे. त्यांच्या प्रेमकवीतांचा मूर्त चेहरा स्वत: अमृता प्रीतमच आहेत, इतक्या त्या सहज आहेत. त्यांच्या प्रेमकविता जे अनुभवलं, जसं अनुभवलं त्यातून साकार झाल्या आहेत. प्रेमातल्या विविध अनुभूतींना त्यांनी एका सच्चेपणाने कवितेतून मांडले आहे. त्या त्यांच्या प्रेमाचे वर्णन. ‘सच्छे दुध जैसी मेरी मुहब्बत’ असे एका वाक्यात करायच्या. त्यांच्या कवितेतील सजन जितका सत्यरूप आहे तितकाच स्वप्नरूप आहे. जितका परका आहे तितकाच आपला आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तीला एक तर त्याची मुहब्बत हवी असते, नाहीतर मोक्ष हवा असतो. त्याचे प्रेम हे ईश्वरस्वरूप कधी होते, हे त्यालाही कळत नाही. या प्रियकरायमध्ये जेव्हा ईश्वररूप दिसायला लागले तेव्हा अमृता प्रीतम म्हणतात,
‘खुदा का इक अन्दाज तू
औ’ फजर की नमाज तू
अल्लाह की इक रजा भी तू
यह सारी कायनात तू
खुदा की मुलाकात तू’
औ’ फजर की नमाज तू
अल्लाह की इक रजा भी तू
यह सारी कायनात तू
खुदा की मुलाकात तू’
माणसाला दु:खात नेहमीच ईश्वराचे स्मरण होत असते. मनातून सततच ईश्वराशी संवाद साधत सर्वकाही सांगितले जाते. पण, प्रेमव्यथा सांगायला ईश्वराचे स्मरण करावे आणि त्याचवेळी प्रियकरच ईश्वराच्या जागी दिसावा इततकी तद्रूपता अमृता प्रीतमना देखील आश्चर्यचकीत करून गेली. आपल्या प्रेमाने आता आपल्या मनातील ईश्वराचा दर्जा प्राप्त केला आहे, हे जेव्हा त्यांना जाणवले तेव्हा त्या म्हणाल्या ‘अल्लाह, यह कौन आया है। कि तेरी जगह जबान पर। अब उसका नाम आया है?’
इतकी भावविव्हळ कविता लिहिणाऱ्या अमृता प्रीतम यांचे कवयित्री म्हणून तितकेच उग्र रूप त्यांच्या सामाजिक कवितांमधून दिसते. त्यांनी फाळणीचा घाव झेलला, सोसला असल्यामुळे त्यांच्या सामाजिक कवितांना एक वेगळीच धार आहे. फाळणीवर आधारित ‘मजबूर’ कविता भारतमातेची अगतिकता व्यक्त करते.
‘मेरी माँ की कोख मजबूर थी
आजादियों की टक्कर में
उस चोट का निशान हूँ
उस हादसे की लकीर हूँ
जो मेरी माँ के माथे पर
लगनी जरूर थी’
आजादियों की टक्कर में
उस चोट का निशान हूँ
उस हादसे की लकीर हूँ
जो मेरी माँ के माथे पर
लगनी जरूर थी’
स्वत:च्या फायद्यासाठी जे जनतेचे आहे, त्याचीच निर्लज्जासारखी चोरी करणारे नेते, त्यांच्या कवी नजरेतून सुटले नाहीत. ‘मेरा शहर एक लम्बी बहस की तरह है। असे त्या म्हणतात. या शहरातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू कशी पोखरली गेली आहेे, स्वार्थाचा, विकृतीचा किडा लागून कशी सडली आहे, हे त्यांनी ‘शहर’ कवितेतून सांगितले आहे. ‘घोर काली घटा’ या पंजाबी कवितेत तर खालच्या दर्जाची पत्रकारिता, धार्मिकतेवरून अंदाधुंदी माजवणे, समाज आणि राजनीतीचा केलेला वैचारिक चिखल यावर त्यांनी प्रखर, भडक शब्दांत व्यक्त झाल्या आहेत.
एक कवयित्री म्हणून त्यांच्या शैलीचा जेव्हा विचार आपण करतो, तेव्हा त्यांच्या काव्यशैलीतील रूपक, प्रतिमांची श्रीमंती लक्षणीय आहे हे प्रकर्षाने जाणवते. आपली प्रत्येक संवेदना, जाणीव व्यक्त करताना त्यांनी समस्त निसर्गच प्राशन केला आहे आणि या निसर्गावरच मानवी भाव-भावनांचे आरोपण करीत एक-एक रूपकात्मक काव्यफुले त्या उधळत आहेत, असे वाटते.
भारतीय पंजाबी, हिंदी साहित्यजगतामध्ये एक कवयित्री म्हणून अमृता प्रीतम यांची छबी अशी आहेे; ज्यांनी जीवन जगण्यामध्ये आणि कविता रचण्यामध्ये कधीही एक विभाजक रेषा निर्माण केली नाही. ती इतकी पारदर्शी आहे की त्यांच्या कवितांना जाणणे म्हणजे स्वत:ला कुठे ना कुठे ओळखणे आणि या जगाच्या समस्त प्राणस्पंदनाला मानव हृदयाच्या स्पंदनाशी सन्मुख होणे आहे.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
२५/०८/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल
#अमृतवेल