Sunday, July 14, 2019

सिध्दहस्त नाटककार:विष्णू सूर्या वाघ

सिध्दहस्त नाटककार:विष्णू सूर्या वाघ
डाॅ.अमृता इंदूरकर

            कधी कधी असे वाटते की या ब्रह्मांडाच्या अवकाशात निर्माण होणारी प्रचंड ऊर्जा जेव्हा ब्रह्मांडालाच पेलवत नाही, मावत नाही तेव्हा ती पृथ्वीवरील काही लोकांमध्ये संक्रमित केली जाते. या लोकांच्या बाैद्धिक शक्तीचा जसजसा इतरांना अनुभव येतो तसतसे या त्यांच्यामध्ये असलेल्या ऊर्जेचे विविध आयाम स्पष्ट होऊ लागतात. असेच एक प्रचंड ऊर्जा अंगी वागविणारे, गोमंतकीय भूमीतील व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘विष्णू सूर्या वाघ.’
गेल्या फेब्रुवारीत ते आपल्यामधून निघून गेले. येत्या २४ जुलैला त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त नाटककार विष्णू वाघ आणि कवी विष्णू वाघ अशा दोन लेखांद्वारे त्यांचे स्मरण करून त्यांच्यातील साहित्यिक उर्जेचा एक स्रोत समस्त वाचकांपर्यंत पोहचविण्याचा एक प्रयत्न.

खरेतर केवळ नाटककार आणि कवी एवढीच विष्णू सूर्या वाघ यांची आेळख मर्यादित नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अजून काय काय होतं? असे विचारण्यापेक्षा काय काय नव्हतं? हे विचारणे अधिक योग्य ठरेल. नाटककार कवी यासोबतच उत्तम साहित्यिक, संगीततज्ज्ञ, चित्रकार, वक्ता, गायक, वादक, उत्तम अभिनय, पत्रकारिता, संपादनकार्य, राजकारण, प्रवचनकार, पुराणाचे गाढे अभ्यासक, अध्यात्मचिंतक अशा सर्व सर्व क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटविणारे उर्जस्वल रसायन होते ते. याशिवाय आमदारकी, कला अकादमीचे अध्यक्षपद, ‘काव्यहोत्र’ हा लोकप्रिय उपक्रम लीलया समर्थपणे हाताळणारे असे विष्णू सूर्या वाघ म्हणजे हरहुन्नरी, जिंदादील, झंझावाती व्यक्तिमत्त्व.

नाटककार म्हणून विष्णू वाघ सिद्धहस्तच होते. कोकणी व मराठी मिळून चाळीसहून अधिक नाटके त्यांनी लिहिलीत. ‘एका माणसाचा मृत्यू’ हे त्यांचं पहिलं नाटक. या चाळीस नाटकांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर ‘धर्मश्री’, ‘समुद्रपक्षी’, ‘साम्राज्य’, ‘तुका अभंग अभंग’, ‘पुन्हा एकदा’, ‘भगव्या मातीचा माणूस’, ‘घर थकलेले एकाकी’, ‘स्मशानवेद’, ‘शिवगोमंतक’, ‘सुंवारी’, ‘पेद्रू पडलो बायंत’, ‘तीन पैशांचो तियात्र’ यासारख्या नाटकांचा समावेश आहे. यापैकी, ‘तुका अभंग अभंग’, ‘शिवगोमंतक’ आणि ‘आदित्यचक्षू’ ही तीन नाटके ग्रंथ स्वरूपात प्रकाशित झाली व याचे बरेच प्रयोगही झाले. त्यातही यामध्ये ज्या दोन नाटकांनी इतिहास घडविला ती नाटके म्हणजे ‘तुका अभंग अभंग’आणि ‘आदित्यचक्षू’. ही दोन्ही वाखाणण्यासारखी नाटके.
दोन्ही नाटकांतील वाघ यांना जाणवलेले वेगळेपण आता पाहू.

नाटकांतील वेगळेपण :

‘तुका अभंग अभंग’ या शीर्षकावरुनच स्पष्ट होते की हे संत तुकाराम महाराजांवर आधारित नाटक आहे. आजवर मराठी साहित्यात संत तुकारामांवर कितीतरी लेखक, साहित्यिकांनी लिहीलेले आहे. मग या नाटकात वेगळे असे काय आहे? हा प्रश्न साहजिकच पडतो. उलट या नाटकात इतके असे काय वेगळे आहे, ज्यामुळे हे नाटक वादग्रस्त ठरले, त्यांच्या प्रयोगांवर बंदी आली होती, असे विचारणे अधिक संयुक्तिक ठरेल. सहा-सात वर्षे अखंडपणे वाघ यांच्या मनात तुकारामावरील नाटक लिहिण्याचा विचार घोळत होता. संतांपेक्षा तुकोबा वेगळे आहेत. ते केवळ भक्तीत अडकलेले नाहीत. त्यापलीकडे गेलेले आहेत. त्यांचा ‘विठ्ठल’ हा केवळ पंढरपूरच्या विटेवर उभी असलेली पाषाण मूर्ती नाही. त्यांची भाषा केवळ भावनेने आेथंबलेली नाही तर क्रांतीनेही पेटलेली आहे, हे सतत विष्णू वाघांना जाणवत होते. खऱ्या अर्थाने तुकारामाला आत्मसात करून पचवून घेताना विष्णूपंत पागनीसांनी रंगवलेला भोळा, रडका, व्यवहारशून्य तुकाराम तेवढा मराठी जनतेच्या मनात ठसला आणि भोवतालच्या प्रखर सामाजिक वास्तवातून आत्मभानाचा वेध घेणारा महाकवी तुकाराम मात्र अंधारात फेकला गेला, असे विष्णू वाघांचे ठाम मत होते. तुकोबांच्या चरित्रात वर्तमानाच्या संदर्भात गतकालीन घटना व प्रसंगांची पुनर्निर्मिती करण्याची ताकद होती.

अभंगाच्या चोपड्या इंद्रायणीवर तरंगल्या यावर आता कुणीही विश्वास ठेवणे अशक्य. उलट आताचा संत तुकारामाचा आस्तिक भक्त असो किंवा नास्तिक व्यक्ती हाच तर्क लावणार की त्या चमत्कार घडून तरंगल्या नाहीत तर ते अभंगच मुळात, जनमानसात इतके मुखोद्गत झाले होते की तत्कालीन लोकांच्या मुखाद्वारे सतत म्हटले जात असल्यामुळे अमर झाले. तुकोबांचे असे बहुजन समाजातील, तळागाळातील लोकांच्या मनात आदराचे, उच्च स्थान प्राप्त करणे तत्कालीन उच्चवर्णियांना सहन न झाल्याने मंबाजी सारखा, लोकांची दिशाभूल करणारा पंडित संत तुकारामाचा काटा वाढतो आणि संपूर्ण गावात भोळ्याभाबड्या जनतेचा चटकन विश्वास बसेल अशी आवई उठवतो की तुकाराम महाराज विमानात बसून सदेह वैकुंठात गेले. असा तर्कशुद्ध विचार करून वाघ यांनी या नाटकाचा शेवट लिहिला. पण, एरवी कजाग बायको म्हणून रंगविण्यात आलेली तुकोबांची पत्नी आवली मात्र मंबाजीचे हे कटकारस्थान आेळखते आणि बाणेदारपणे तिच्यामधील प्रखर स्त्रीवादाची झलक दाखवत म्हणते, ‘तुमच्या अंगाला वास येतोय माज्या तुकोबाच्या रगताचा, पन लक्षात ठिवा, तुमी लाख येळा मारलात तरी तुकोबा मरणार न्हाय.’

'आदित्यचक्षू’ हे मुळात उपनिषदकालीन एका अलक्षित राहिलेल्या महर्षीचे अनवट चरित्र मांडणारे नाटक आहे. महान दार्शनिक महर्षी याज्ञवल्क्य यांचे जीवन आणि तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविणारे हे नाटक. भारतीयांना व्यास, वाल्मिकी, जैमिनी, शुक, वैशंपायन, दुर्वास, काश्यप, कपिल, पाराशर अशा कितीतरी ऋषींची माहिती आहे. मराठी साहित्यात यावर भरपूर लिहिलेही गेले आहे. पण याज्ञवल्क्य हे नाव माहीत असलेले मोजके सोडले तर एकूणच त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारे फारसे कुणी लिहिले नाही. ‘शाकल्य’ या आपल्याच गुरूबरोबर संघर्ष करणारा निर्भीड, बाणेदार शिष्य म्हणून याज्ञवल्क्याची प्रतिमा वाघ यांच्या मनात ठसली.
या तीन अंकी नाटकाच्या पहिल्या अंकात एेन कुमारवयात शाकल्य व वैशंपायन या दोन गुरूंशी याज्ञवल्क्याने केलेला वैचारिक संघर्ष व सूर्यदेवाची उपासना करून मिळवलेली ज्ञानप्राप्ती याचे दर्शन आहे. दुसऱ्या अंकात जनकाच्या दरबारात तत्कालीन दार्शनिकांची याज्ञवल्क्याने केलेल्या चिंतनात्मक द्वंद्वाचे चित्रण आहे. तर तिसऱ्या अंकात याज्ञवल्क्याचे सांसारिक जीवन व मैत्रेयीबरोबर त्याचा संवाद प्रामुख्याने मांडला आहे. या संपूर्ण कथानकाला जोडणारे पात्र म्हणजे वाघ यांनी आपल्या कल्पनेने निर्माण केलेले ‘वृत्तकार नारद’ हे पात्र. भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांत लीलया भ्रमण करून शकणारा असा हा नारद वेळप्रसंगी त्या काळातून निघून अचानक वर्तमानातील प्रेक्षकांशी देखील संवाद साधतो. आजच्या परिस्थितीवर भाष्यही करतो. हे या संहितेचे वेगळेपण आहे.

दोन्ही नाटकांतील साम्य

दोन्ही नाटके संपूर्णत : वेगळ्या कालखंडातील आहेत, नाट्याची कथावस्तूही निराळी आहे तर दुसऱ्यामध्ये प्रखर ज्ञानाचे सार्वभौमत्व मांडलेले आहे. तरीही या दोन्ही नाटकांना एक समान सूत्र बांधून ठेवते ते म्हणजे ‘क्रांतिकारत्व.’ तुकाराम महाराज आणि महर्षी याज्ञवल्क्य यांच्या ठायी असणारे आचार विचारातील क्रांतिकारत्व. या दोघांनाही ते प्राप्त झाले ते त्यांचे ज्ञानचक्षू जागृत होते म्हणून. भटजीला, मंबाजीला भोळ्या भाबड्या जनतेला ते धर्माच्या नावाखाली हिडीसफिडीस करतात म्हणून तुकाबाचे संतापाच्या भरात शिव्या देणं किंवा पहिल्याच अंकात विलासी सुप्रिय राजा जेव्हा यज्ञाच्या पवित्र जलाचा अधिक्षेप करतो तेव्हा याज्ञवल्क्य ‘भरदिवसा हा व्यभिचार करताना आपणाला लज्जा कशी वाटत नाही?’ असा निर्भयपणे सवाल विचारतात. या घटना दोघांच्याही क्रांतिकारत्वाची झलक देतात. मी ब्राह्मणाच्या कुळात जन्मलो म्हणून ब्राह्मण नाही तर ज्ञानसाधना करून ब्राह्मणत्वाला पोहोचलो आहे, असा क्रांतिकारी विचार याज्ञवल्क्य मांडतात. कारण ज्ञानसाधनेचा अधिकार सर्वांनाच आहे. हाच समानतेचा विचार तुकोबा देखील आपल्या अभंगातून क्रांतिकारीपणे मांडतात. तुकोबाच्या अभंगातून व याज्ञवल्कयाच्या वाणीतून क्रांतिकारी विचारांची नवचेतना देण्याची शक्ती असलेला अक्षय ज्ञाननिर्झर दोघांच्या संवादातून पाझरत असतो.

विष्णू वाघ यांनी एक वेगळा तुकोबा मांडणे किंवा याज्ञवल्क्याला जे प्रखर बुद्धिमत्तेचे आदित्यचक्षू लाभले होते, त्याचा थोडा तरी प्रकाश या नाटकांद्वारे रसिकांपर्यंत पोहचावा आणि वाचकाने या दोघांचेही काळाला पार भेदून अजर अमर राहणारे विचार समजून घ्यावेत, या उद्देशाने ही नाटके लिहिली. यामागे त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर ‘महापुरूषाचं शारिरीक मरण हे तत्कालीन समाजाला घायाळ करणारं असतं यात वादच नाही. पण, याहून भयानक असते ती महामानवांची वैचारिक हत्या. भारताच्या इतिहासात अशा हत्या हरघडी होत आल्या. महापुरूषांचे विचार देव्हारे उभारून अंधश्रद्धांची मखरं सजवून महात्म्यांचे विचार गर्भकुडीत कसे गाडले जातात, हे तुकोबाच नव्हे तर अगदी अलीकडच्या काळातील चरित्रांवरूनही कळून येईल’. 

विष्णू वाघ यांनी अशा या दोन महात्म्यांचे विचार व जीवनचरित्र केवळ बासनात बंदिस्त राहू नये. अखिल जगाच्या विश्वमानव्याच्या हितासाठी यातले थोडे तरी किरण लोकांपर्यंत पोहचावे या हेतूने ही नाटके लिहिलीत, जी नि:संशय त्यांना सिद्धहस्त नाटककार म्हणून लाैकिक प्राप्त करून देणारी ठरली.

(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत)

दि.१४/०७/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल
L

No comments:

Post a Comment