Sunday, July 28, 2019

मातीशी एकरूप झिंजीर सांज...आणि...

मातीशी एकरूप झिंजीर सांज...आणि...
डाॅ अमृता इंदूरकर
वाचक हो, या सदरातील मागील लेखात साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांच्यातील क्रांतिकारक नाटककार आपण अनुभवला. प्रस्तुत लेखात  कवी म्हणून विष्णू वाघ  कसे निराळे आहेत, ते पाहू. वाघ एक नाटककार म्हणून परखड, सडेतोड, आक्रमक आहेत. मात्र, कवी म्हणून त्यांच्यामधील हळूवार, संवेदनशील पिंड प्रामुख्याने जाणवतो. कवी म्हणूनही त्यांचे भरपूर योगदान आहे.
झिंजीर झिंजीर सांज, फील गुड फेणी, सुशेगाद, वाघनखे, लोकोपनिषद, बच्चूभायची वाडी, सूदिरसूक्त हे कोकणी आणि ‘ती बाई मीच आहे’ ही त्यांची काव्यसंपदा प्रसिद्ध आहे. हे सर्व कवितासंग्रह बघितले तर असे लक्षात येते की आपल्या काव्याची नाळ मातीशी जुळवून ठेवतच त्यांच्या काव्यजाणिवांचा विकास झाला आहे. बालपणी मिळालेल्या सामाजिकतेच्या बाळकडूचे प्रतिबिंब त्यांच्या जवळ जवळ सर्वच काव्यामध्ये उमटलेले दिसते. वाघ हे आपल्या कवितेमार्फत समाज, संस्कृती, रीतिरिवाज, स्त्री मन या सर्वांनाच पुढे नेणारे कवी आहेत. या सर्व काव्यसंग्रहातून त्यांच्या प्रतिभेचे विविध पैलू अनुुवायला येतात. पण एक कवी म्हणून मात्र शेवटपर्यंत ते कायमच आत्ममग्न, अंतर्मुख राहिले.
विष्णू वाघ यांच्या काव्यपिंडाचे मूळ शोधायचे झाल्यास त्यांच्या ‘झिंजिर ​झिंजिर सांज’ या काव्यसंग्रहामध्ये ते मिळते. माझ्या डोंगरीत घुमे। पिढ्या-पिढ्यांचा रे ढोल।। मंद वाजते सुवारी। तिला काळजाची ओल।।असा आपल्या जन्मभूमीचा गौरव ‘माझी डोंगरी डोंगरी’ या कवितेतून ते करतात. जेथे आपण जन्मलो तेथल्या पारंपरिक लोक जीवनाशी, लोकसंस्कृतिशी कसे एकरूप झालाे आहोत, हे काव्याद्वारे लोकसाहित्याच्या अंगाने काव्यमय रुपात मांडायची वाघ यांची हातोटी वेगळीच आहे. गोव्यातील लोकजीवनामध्ये घडणाऱ्या विविध सामान्य, पण निरंतर अशा गोष्टींचे प्रभावी उल्लेख ‘झिंजीर सांज’ मध्ये येतात.
गोमंतकीय भूमीला लगडून आलेल्या ख्रिश्चन आणि पोर्तुगीज मिथकांचे दर्शन या कवितांमधून घडते. त्यांच्या सुवारी, इंत्रूज, धेंडलो, देवचार, भूतावळ, इंगर्ज, मेरी, रोंबाट या कवितांना अस्सल लोकजीवनाचा सुगंध लगडलेला आहे. गोव्यातील शिमग्याच्या सणातील वाजणाऱ्या ढोल, ताशा आणि कांसाळ्याच्या नादातून निर्माण होणारा आवाज  ‘घणचे कटर घण’हा त्यांना गोव्याच्या मातीतला आदीताल वाटतो. म्हणून गोव्याच्या भूमिपुत्राचा उल्लेख करताना ते म्हणतात, ‘घणचे कटर घण। पेटव रे भुईपुता। जिविताचे रण।’. हा शिमग्याचा जळणारा सण साजरा करण्यासाठी थोडी राख चाचपून ठिणगीचा कण शोधू, असे त्या भूमीपुत्राला आवाहन करतात. इंत्रूज म्हणजे अनंत उर्जा. न संपणाऱ्या अनंत उर्जेचा आनंददायी महोत्सव. पोर्तुगाल, स्पेन, ब्राझिल, अर्जेंटिना इथे याला ‘कार्निव्हल’ म्हणतात. तोच हा इंत्रूज. तो साजरा होत असताना प्रत्येकाला आनंदाचे उधाण येते, त्याचे वर्णन करताना वाघ म्हणतात, ‘पेड पिंपळाचे तिथे। देव शिंपतो गुलाल। भिडे ​काळजा काळीज। मिठी होते लालेलाल।’
धेंडलो’ ही गोव्यातील शेतकऱ्याच्या उत्सवावरील आहे. पाऊसपाणी बऱ्यापैकी झाले, शेती- भाती उत्तमरीत्या पिकली की कापणीचा आनंद व्यक्त करणारा हा ‘धेंडलो’. पण वाघ यांनी वर्णन केलेला ‘धेंडलो’ मात्र वाचकाचे मन विव्हळून टाकणारा आहे. पावसाने अवकृपा केली असल्याने हा धेंडलो नवसाला देखील पावला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘सुकले आसू डोळ्यांतले। भिजले गाणे गळ्यातले’ अशी झाली आहे. ‘सुंवारी’ ही कविता गोव्यातील आदिम लोकवादन प्रकारावर आधारीत आहे. तिच्या नादाची लय साधून त्यावर, अजाणता गर्भारपण भोगावं लागलेली एक कुमारी, वेदनेच्या झळा भोगते त्याचे वर्णन चपखल बसवले आहे. ‘नभाखाली माडावरी। वाजते सुंवारी। पोटातला गर्भ माये। लागतो जिव्हारी।’
सर्वत्र अंधार होता आणि या अंधारात प्रणवाच्या हुंकाराची खळबळ झाली आणि असे म्हणतात की तेव्हा मायेच्या गर्भातून विश्वाची निर्मिती झाली. म्हणजे मूळ माया या सृष्टी जन्माला कारणीभूत ठरली. पण, हे झाले ऋग्वेदाच्या नासदीय सूक्तांमधील सृष्टी उत्पत्तीचे ज्ञान. हेच ज्ञान मात्र जेव्हा विष्णू वाघ यांनी शेतकरी स्त्रियांच्या ‘धालो’ या लोकगीतातून ऐकले, तेव्हा त्यांना जाणवले की जणूकाही आपल्या आया-बहिणींच्या या गीतातून साक्षात वेदच ऐकला. धालो उत्सवात या स्त्रिया स्वत:ला ‘सरगीच्या देवरंभा’ म्हणवून घेतात. म्हणजे स्वर्गातील देवरंभा! आम्ही सरगीच्या देवरंभा साक्षात नक्षत्रांची चंद्रप्रभा चुंबून आलो आहोत. आम्ही ‘शारदेच्या रतनजुई। परमळाया आलो भुई। गंध मोर थुई थुई।’ असे त्या म्हणतात. यामध्ये वाघ यांनी गोव्याच्या लोकजीवनाचा अविभाज्य अंग बनलेले खारवी-गाबती, देवचार, जागोजागी दिसणारे खुरीस (क्रूस), शेतातली खोप, ग्रामदेवतेच्या पायाशी कौल घेणारा कोकणी माणूस, दर्या, किनारा अशा कितीतरींवर एकेक स्वतंत्र कविता लिहिली आहे. बालपणापासून हे सर्व मनात साठवून, जपून ठेवलेलं कवितेतून व्यक्त करताना जणू काही मनाची अवस्था त्या सागरातील भांग पाण्यासारखी होते. जिथे भरतीही नसते आणि सुकतीही नसते. अशा झिंजिर सांजवेळी आकाशात चंद्र असताना दगड पाण्यात भिरकावला की जणूकाही पाण्यात चांदणचुरा पडल्याचा भास होतो. या कविता लिहिताना अशीच काहीशी अवस्था विष्णू वाघ यांची झाली असणार म्हणून ते म्हणतात. ‘थरथरल्या हातांनी। लावला लामणदिवा। चंद्रिमाची चूड घेऊन। धाव आता देवा। सैरावैरा पाणियाला। कशी घालू बांध...... झिंजिर झिंजिर सांज।
कल्पना करा की समस्त कवी-कवयित्रींना प्रतिभारुपी परमन प्रवेशाचे वरदान नसते तर काय झाले असते? कवयित्रिंनी पुरुषांचे मन व्यक्त होणाऱ्या कविता लिहिल्या नसत्या तसेच कवी देखील कवितेतून स्त्रीमन व्यक्त करण्यास असमर्थ ठरले असते. पण, जेव्हा एखादा कवी याच्याही पलिकडे जाऊन म्हणतो ‘ती बाई मीच आहे’ तेव्हा त्याला नक्की काय म्हणायचे असतेे? याचे उत्तर विष्णू सूर्या वाघ त्यांच्या अगदी अलिकडचा कवितासंग्रह ‘ती बाई मीच आहे’ मधून देतात. प्रत्येक स्त्रीमध्ये सूक्ष्म रुपात स्त्रीत्व असते, या पुरुषातील बाईच्या शोधातून वाघ यांची ही दीर्घकविता जन्माला आली आहे. वैचारिक पातळीवर पुरुषामध्ये वसत असलेल्या बाईनेच या कविता लिहिल्या आहेत, असे वाघ स्वत: म्हणतात. हे समस्त विश्व बाईने व्यापलेले आहे. त्यावर असा एकही कोपरा नसेल जिथे फक्त पुरुष आहे, पण एकही बाई नाही. बाईच्या या विश्व व्यापकतेला समजून वाघ तिच्या असण्याचा व्यापक पट स्पष्ट करताना ती घरी-दारी, बंगल्यात-शहरात, चॅनलवर-पॅनलवर, जत्रेत-यात्रेत, मैफलीत-सहलीत, कवितेत-कवेत, श्वासात-ध्यासात, ग्लासात, पूजेत-मजेत, पदरात -उघडी - नागडी, विझवणारी - निजवणारी, अबोल- बोलकी अशी कितीतरी रुपे मांडली आहेत, पण शेवटी दोन्हीकडून थापा खाणारी मुकीच ढोलकी असते ती, असेही सांगतात.
वाघ यांच्या कविमनातील बाईचे पहिले रुप तीन प्रतिमांना साकारणारे आहे. पहिली आई, दुसरी आजी, तिसरी मुलगी. म्हणजे स्त्रीच्या जीवनात येणाऱ्या तीन स्थित्यंतरांना लक्षात घेऊन या तीन बाया साकार होतात. मुलीचा उल्लेख करता करता वाघ समस्त पुरुषप्रधान व्यवस्थेलाच एक बोचरा प्रश्न विचारतात की मुलीशी लग्न केल्यानंतर तुम्ही तिचे नाव बदलता. तिच्या बापाच्या जागी तुमचे नाव येते, पण खरंच का मग तुम्ही बापाची जागा घेता का? इथे तर तुमच्या असण्या-नसण्यावरुन बाईला विशेषणे लावली जातात. कुमारी- सौभाग्यवती- सवाष्ण -विधवा असा क्रम पिढ्यानपिढ्या चालत आला आहे, पण तुम्ही मात्र आयुष्यभर श्री किंवा मिस्टरच. समाजात चार वर्षाच्या मुलीपासून तर वृद्धेपर्यत ही बाई पुरूषाच्या वासनांध नजरेतून कधी सुटत नाही. शेतात पुरूषाच्या बरोबरीने राबणारी बाई असो किंवा मोलमजुरी करणारी मजूर बाई, मेहनताना तिला मात्र पुरुषापेक्षा अर्धाच दिला जातो. कारण काय तर ती बाई आहे म्हणून? खानदानी घरातली बाई असो किंवा गरिबीत जिवाचा आटापिटा करत जगणारी बाई, तिच्या बाजूला बसून तिच्या हातच्या गरम भाकऱ्या खाताना मात्र तिच्या करपलेल्या काळजाचा वास पुरुषांना कसे बरे येत नाही? खुळचट अंधश्रद्धेच्या लोकसमजुतीतून या बाईला देवाच्या नावाने सोडून दिले जाते. गावातल्या तमाम पुरुषांना लचके तोडायला तर कधी झारखंड, राजस्थान, छत्तीसगड, सारख्या ठिकाणी स्वत:च्या चारित्र्याची जपणूक करणाऱ्या बाईला अशुभ ठरवून डाकीण, चेटकीण ठरवून भर गावात निर्वस्त्र केले जाते.
बाईला अशी वागणूक देणाऱ्या समाजातील लोकांच्या मनोवृत्तीची पाळंमुळं वाघ यांना पूर्वसुरींमध्ये दिसतात. प्रत्येक धर्मात प्रारंभापासूनच धर्मकार्यापासून स्त्रीला ठेवले आहे. यावर ते प्रश्न विचारतात की तिला कधी गायत्री मंत्र म्हणण्याचा, यज्ञोपवित घालण्याचा अधिकार दिला नाही. तिला कायमच मशिदीत जाऊन नमाज पढण्यासाठी मज्जाव केला जातो. चर्चमध्ये कधीही प्रिस्ट होउन ‘सेरमन’ सांगण्याचा अधिकार बहाल केला? कधी साध्वी म्हणून वापरुन घेतली तर कधी धर्माच्या नावाचे साखळदंड तिच्या पायात अडकवले. पुराणात द​क्षाला देखील जेव्हा जाणीव होते की स्त्री निर्माण केली नाही तर सृष्टीचे सृजनचक्र चालणार नाही, मग दक्ष साठ कन्यांना जन्माला घालतो. म्हणजे नक्की कोणत्या स्वार्थातून या स्त्रियांचा जन्म झाला आहे, हे वेगळे सांगायला नको.
अहल्या, सावित्री, सीता, शकुंतला, सत्यवती, गांधारी, कुंती, द्रौपदी यांसारख्या भारतीय परंपरेत आदर्श असणाऱ्या स्त्रिया. मदर मेरी, मारिया या ख्रिश्चन धर्मातील पूज्य स्त्रिया आणि मुस्लिम धर्मात जिच्या संरक्षणासाठी कुराणालाही झाकून ठेवलंत शरीयतच्या काळ्या बुरख्याआड, अशा सर्व स्त्रिया आज आपल्यासमोर श्रद्धास्थानावर आहेत, पण खरंच का तेव्हा त्यांच्या वाट्याला खरा मान-सन्मान, आदर मिळाला एक बाई म्हणून? असा प्रश्न वाघ यांनी वारंवार विचारला आहे.
पुराणकाळापासून वर्तमानकाळापर्यंत बायांची विटंबना करणारी रुपे मांडल्यानंतर शेवटी वाघ यांनी या स्त्रीमधल्या शक्तीचेही रुप उलगडले आहे. गार्गी, मैत्रेयी सारख्या वेदांच्या अधिकारी बनल्या. कृष्णाला मदत करणारी सत्यभामाही आहे, पुत्राला या आर्यावर्ताचा राजा करणारी शकुंतलाही आहे. साक्षात ज्ञानियांच्या राजाला उपदेश करणारी मुक्ताबाई आहे, भरल्या बाजारी डोईचा पदर पाडून जाणारी जनाबाई आहे. शिवबाला स्वराज्य प्रेरणा देणारी जिजाऊ पण आहे. तुकारामाच्या भक्तीचा जळता अंगार पदरात बांधून घेणारी आवली पण आहे. वैधव्यावर मात करणाऱ्या पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर आहेत. ताराराणी, झाशीची राणी, कित्तूरची चन्नमा, रजिया सुलतान, ज्योतिबांची ढाल बनणारी सावित्रीबाई आहे. भीमाच्या पाठीशी असणारी रमाई आहे.
आज अशी कितीतरी स्त्रीची प्रेरणादायी रूपे आहेत. ज्यांनी इतिहास घडविला, देश बनविला, तरीही कवी वाघ यांचा शेवटचा उद्गार वाचकांना अंतर्मुख करतो,
यातली प्रत्येकजण
निश्चितपणे आहेच एक ठिणगी
पण प्रत्येकवेळी स्वतंत्रपणे पेटणारी
आणि म्हणूनच
तुमच्या निगरगट्ट मानसिकतेने
अद्यापही न स्वीकारलेली
ती बाई मीच आहे!
ज्या दिवशी प्रत्येक पुरुष त्याच्यात वास करणाऱ्या या बाईच्या विविधांगी रूपाला खऱ्या अर्थाने समजेल, त्या दिवशी ‘ती बाई आहे बरं’ असा वेगळा उल्लेखही करण्याची गरज पडणार नाही.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
२८/०७/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, July 14, 2019

सिध्दहस्त नाटककार:विष्णू सूर्या वाघ

सिध्दहस्त नाटककार:विष्णू सूर्या वाघ
डाॅ.अमृता इंदूरकर

            कधी कधी असे वाटते की या ब्रह्मांडाच्या अवकाशात निर्माण होणारी प्रचंड ऊर्जा जेव्हा ब्रह्मांडालाच पेलवत नाही, मावत नाही तेव्हा ती पृथ्वीवरील काही लोकांमध्ये संक्रमित केली जाते. या लोकांच्या बाैद्धिक शक्तीचा जसजसा इतरांना अनुभव येतो तसतसे या त्यांच्यामध्ये असलेल्या ऊर्जेचे विविध आयाम स्पष्ट होऊ लागतात. असेच एक प्रचंड ऊर्जा अंगी वागविणारे, गोमंतकीय भूमीतील व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘विष्णू सूर्या वाघ.’
गेल्या फेब्रुवारीत ते आपल्यामधून निघून गेले. येत्या २४ जुलैला त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त नाटककार विष्णू वाघ आणि कवी विष्णू वाघ अशा दोन लेखांद्वारे त्यांचे स्मरण करून त्यांच्यातील साहित्यिक उर्जेचा एक स्रोत समस्त वाचकांपर्यंत पोहचविण्याचा एक प्रयत्न.

खरेतर केवळ नाटककार आणि कवी एवढीच विष्णू सूर्या वाघ यांची आेळख मर्यादित नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अजून काय काय होतं? असे विचारण्यापेक्षा काय काय नव्हतं? हे विचारणे अधिक योग्य ठरेल. नाटककार कवी यासोबतच उत्तम साहित्यिक, संगीततज्ज्ञ, चित्रकार, वक्ता, गायक, वादक, उत्तम अभिनय, पत्रकारिता, संपादनकार्य, राजकारण, प्रवचनकार, पुराणाचे गाढे अभ्यासक, अध्यात्मचिंतक अशा सर्व सर्व क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटविणारे उर्जस्वल रसायन होते ते. याशिवाय आमदारकी, कला अकादमीचे अध्यक्षपद, ‘काव्यहोत्र’ हा लोकप्रिय उपक्रम लीलया समर्थपणे हाताळणारे असे विष्णू सूर्या वाघ म्हणजे हरहुन्नरी, जिंदादील, झंझावाती व्यक्तिमत्त्व.

नाटककार म्हणून विष्णू वाघ सिद्धहस्तच होते. कोकणी व मराठी मिळून चाळीसहून अधिक नाटके त्यांनी लिहिलीत. ‘एका माणसाचा मृत्यू’ हे त्यांचं पहिलं नाटक. या चाळीस नाटकांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर ‘धर्मश्री’, ‘समुद्रपक्षी’, ‘साम्राज्य’, ‘तुका अभंग अभंग’, ‘पुन्हा एकदा’, ‘भगव्या मातीचा माणूस’, ‘घर थकलेले एकाकी’, ‘स्मशानवेद’, ‘शिवगोमंतक’, ‘सुंवारी’, ‘पेद्रू पडलो बायंत’, ‘तीन पैशांचो तियात्र’ यासारख्या नाटकांचा समावेश आहे. यापैकी, ‘तुका अभंग अभंग’, ‘शिवगोमंतक’ आणि ‘आदित्यचक्षू’ ही तीन नाटके ग्रंथ स्वरूपात प्रकाशित झाली व याचे बरेच प्रयोगही झाले. त्यातही यामध्ये ज्या दोन नाटकांनी इतिहास घडविला ती नाटके म्हणजे ‘तुका अभंग अभंग’आणि ‘आदित्यचक्षू’. ही दोन्ही वाखाणण्यासारखी नाटके.
दोन्ही नाटकांतील वाघ यांना जाणवलेले वेगळेपण आता पाहू.

नाटकांतील वेगळेपण :

‘तुका अभंग अभंग’ या शीर्षकावरुनच स्पष्ट होते की हे संत तुकाराम महाराजांवर आधारित नाटक आहे. आजवर मराठी साहित्यात संत तुकारामांवर कितीतरी लेखक, साहित्यिकांनी लिहीलेले आहे. मग या नाटकात वेगळे असे काय आहे? हा प्रश्न साहजिकच पडतो. उलट या नाटकात इतके असे काय वेगळे आहे, ज्यामुळे हे नाटक वादग्रस्त ठरले, त्यांच्या प्रयोगांवर बंदी आली होती, असे विचारणे अधिक संयुक्तिक ठरेल. सहा-सात वर्षे अखंडपणे वाघ यांच्या मनात तुकारामावरील नाटक लिहिण्याचा विचार घोळत होता. संतांपेक्षा तुकोबा वेगळे आहेत. ते केवळ भक्तीत अडकलेले नाहीत. त्यापलीकडे गेलेले आहेत. त्यांचा ‘विठ्ठल’ हा केवळ पंढरपूरच्या विटेवर उभी असलेली पाषाण मूर्ती नाही. त्यांची भाषा केवळ भावनेने आेथंबलेली नाही तर क्रांतीनेही पेटलेली आहे, हे सतत विष्णू वाघांना जाणवत होते. खऱ्या अर्थाने तुकारामाला आत्मसात करून पचवून घेताना विष्णूपंत पागनीसांनी रंगवलेला भोळा, रडका, व्यवहारशून्य तुकाराम तेवढा मराठी जनतेच्या मनात ठसला आणि भोवतालच्या प्रखर सामाजिक वास्तवातून आत्मभानाचा वेध घेणारा महाकवी तुकाराम मात्र अंधारात फेकला गेला, असे विष्णू वाघांचे ठाम मत होते. तुकोबांच्या चरित्रात वर्तमानाच्या संदर्भात गतकालीन घटना व प्रसंगांची पुनर्निर्मिती करण्याची ताकद होती.

अभंगाच्या चोपड्या इंद्रायणीवर तरंगल्या यावर आता कुणीही विश्वास ठेवणे अशक्य. उलट आताचा संत तुकारामाचा आस्तिक भक्त असो किंवा नास्तिक व्यक्ती हाच तर्क लावणार की त्या चमत्कार घडून तरंगल्या नाहीत तर ते अभंगच मुळात, जनमानसात इतके मुखोद्गत झाले होते की तत्कालीन लोकांच्या मुखाद्वारे सतत म्हटले जात असल्यामुळे अमर झाले. तुकोबांचे असे बहुजन समाजातील, तळागाळातील लोकांच्या मनात आदराचे, उच्च स्थान प्राप्त करणे तत्कालीन उच्चवर्णियांना सहन न झाल्याने मंबाजी सारखा, लोकांची दिशाभूल करणारा पंडित संत तुकारामाचा काटा वाढतो आणि संपूर्ण गावात भोळ्याभाबड्या जनतेचा चटकन विश्वास बसेल अशी आवई उठवतो की तुकाराम महाराज विमानात बसून सदेह वैकुंठात गेले. असा तर्कशुद्ध विचार करून वाघ यांनी या नाटकाचा शेवट लिहिला. पण, एरवी कजाग बायको म्हणून रंगविण्यात आलेली तुकोबांची पत्नी आवली मात्र मंबाजीचे हे कटकारस्थान आेळखते आणि बाणेदारपणे तिच्यामधील प्रखर स्त्रीवादाची झलक दाखवत म्हणते, ‘तुमच्या अंगाला वास येतोय माज्या तुकोबाच्या रगताचा, पन लक्षात ठिवा, तुमी लाख येळा मारलात तरी तुकोबा मरणार न्हाय.’

'आदित्यचक्षू’ हे मुळात उपनिषदकालीन एका अलक्षित राहिलेल्या महर्षीचे अनवट चरित्र मांडणारे नाटक आहे. महान दार्शनिक महर्षी याज्ञवल्क्य यांचे जीवन आणि तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविणारे हे नाटक. भारतीयांना व्यास, वाल्मिकी, जैमिनी, शुक, वैशंपायन, दुर्वास, काश्यप, कपिल, पाराशर अशा कितीतरी ऋषींची माहिती आहे. मराठी साहित्यात यावर भरपूर लिहिलेही गेले आहे. पण याज्ञवल्क्य हे नाव माहीत असलेले मोजके सोडले तर एकूणच त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारे फारसे कुणी लिहिले नाही. ‘शाकल्य’ या आपल्याच गुरूबरोबर संघर्ष करणारा निर्भीड, बाणेदार शिष्य म्हणून याज्ञवल्क्याची प्रतिमा वाघ यांच्या मनात ठसली.
या तीन अंकी नाटकाच्या पहिल्या अंकात एेन कुमारवयात शाकल्य व वैशंपायन या दोन गुरूंशी याज्ञवल्क्याने केलेला वैचारिक संघर्ष व सूर्यदेवाची उपासना करून मिळवलेली ज्ञानप्राप्ती याचे दर्शन आहे. दुसऱ्या अंकात जनकाच्या दरबारात तत्कालीन दार्शनिकांची याज्ञवल्क्याने केलेल्या चिंतनात्मक द्वंद्वाचे चित्रण आहे. तर तिसऱ्या अंकात याज्ञवल्क्याचे सांसारिक जीवन व मैत्रेयीबरोबर त्याचा संवाद प्रामुख्याने मांडला आहे. या संपूर्ण कथानकाला जोडणारे पात्र म्हणजे वाघ यांनी आपल्या कल्पनेने निर्माण केलेले ‘वृत्तकार नारद’ हे पात्र. भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांत लीलया भ्रमण करून शकणारा असा हा नारद वेळप्रसंगी त्या काळातून निघून अचानक वर्तमानातील प्रेक्षकांशी देखील संवाद साधतो. आजच्या परिस्थितीवर भाष्यही करतो. हे या संहितेचे वेगळेपण आहे.

दोन्ही नाटकांतील साम्य

दोन्ही नाटके संपूर्णत : वेगळ्या कालखंडातील आहेत, नाट्याची कथावस्तूही निराळी आहे तर दुसऱ्यामध्ये प्रखर ज्ञानाचे सार्वभौमत्व मांडलेले आहे. तरीही या दोन्ही नाटकांना एक समान सूत्र बांधून ठेवते ते म्हणजे ‘क्रांतिकारत्व.’ तुकाराम महाराज आणि महर्षी याज्ञवल्क्य यांच्या ठायी असणारे आचार विचारातील क्रांतिकारत्व. या दोघांनाही ते प्राप्त झाले ते त्यांचे ज्ञानचक्षू जागृत होते म्हणून. भटजीला, मंबाजीला भोळ्या भाबड्या जनतेला ते धर्माच्या नावाखाली हिडीसफिडीस करतात म्हणून तुकाबाचे संतापाच्या भरात शिव्या देणं किंवा पहिल्याच अंकात विलासी सुप्रिय राजा जेव्हा यज्ञाच्या पवित्र जलाचा अधिक्षेप करतो तेव्हा याज्ञवल्क्य ‘भरदिवसा हा व्यभिचार करताना आपणाला लज्जा कशी वाटत नाही?’ असा निर्भयपणे सवाल विचारतात. या घटना दोघांच्याही क्रांतिकारत्वाची झलक देतात. मी ब्राह्मणाच्या कुळात जन्मलो म्हणून ब्राह्मण नाही तर ज्ञानसाधना करून ब्राह्मणत्वाला पोहोचलो आहे, असा क्रांतिकारी विचार याज्ञवल्क्य मांडतात. कारण ज्ञानसाधनेचा अधिकार सर्वांनाच आहे. हाच समानतेचा विचार तुकोबा देखील आपल्या अभंगातून क्रांतिकारीपणे मांडतात. तुकोबाच्या अभंगातून व याज्ञवल्कयाच्या वाणीतून क्रांतिकारी विचारांची नवचेतना देण्याची शक्ती असलेला अक्षय ज्ञाननिर्झर दोघांच्या संवादातून पाझरत असतो.

विष्णू वाघ यांनी एक वेगळा तुकोबा मांडणे किंवा याज्ञवल्क्याला जे प्रखर बुद्धिमत्तेचे आदित्यचक्षू लाभले होते, त्याचा थोडा तरी प्रकाश या नाटकांद्वारे रसिकांपर्यंत पोहचावा आणि वाचकाने या दोघांचेही काळाला पार भेदून अजर अमर राहणारे विचार समजून घ्यावेत, या उद्देशाने ही नाटके लिहिली. यामागे त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर ‘महापुरूषाचं शारिरीक मरण हे तत्कालीन समाजाला घायाळ करणारं असतं यात वादच नाही. पण, याहून भयानक असते ती महामानवांची वैचारिक हत्या. भारताच्या इतिहासात अशा हत्या हरघडी होत आल्या. महापुरूषांचे विचार देव्हारे उभारून अंधश्रद्धांची मखरं सजवून महात्म्यांचे विचार गर्भकुडीत कसे गाडले जातात, हे तुकोबाच नव्हे तर अगदी अलीकडच्या काळातील चरित्रांवरूनही कळून येईल’. 

विष्णू वाघ यांनी अशा या दोन महात्म्यांचे विचार व जीवनचरित्र केवळ बासनात बंदिस्त राहू नये. अखिल जगाच्या विश्वमानव्याच्या हितासाठी यातले थोडे तरी किरण लोकांपर्यंत पोहचावे या हेतूने ही नाटके लिहिलीत, जी नि:संशय त्यांना सिद्धहस्त नाटककार म्हणून लाैकिक प्राप्त करून देणारी ठरली.

(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत)

दि.१४/०७/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल
L