निर्मितीप्रक्रियेचे धूसर अस्तर
डाॅ.अमृता इंदूरकर
कविता हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. काव्य आवडत नाही, असे म्हणणारी क्वचितच कुणी विरळा व्यक्ती सापडेल. कविता ही कशी जमते किंवा कशी जन्माला येते हा प्रश्न जसा कवितेचा आस्वाद घेणाऱ्याला पडतो तसा व तितक्याच प्रमाणात ताे कविता करणाऱ्या कवीलाही पडतो, पण या प्रश्नाचे निश्चित असे उत्तर कवी देखील देऊ शकत नाही. पण, तो त्या उत्तराच्या शोधात निरंतर असतो.
कविता जन्माला येण्यासाठी तिची कोणती प्रक्रिया असते? ती कशी असते याचा विचार मात्र नक्कीच करावा लागतो. खरेतर असा शोध घेणाऱ्या कवीची अवस्था त्या कस्तुरीमृगासारखी असते. स्वत:जवळ असलेल्या कस्तुरीच्या मधूर गंधाने वेडा होऊन रानभर कस्तुरीचा शोध घेत हा मृग सैरावैरा जीवाच्या आकांताने धावत असतो, पण शेवटपर्यंत त्याला कळत नाही की ही कस्तुरी त्याच्यातच दडलेली आहे. अगदी हीच अवस्था आपल्या निर्मितीच्या उगमाचा शोध घेताना कवीची होते. मराठी कवितेला ज्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करुन दिले व साहित्याच्या विस्तृत पटावर चिरंतन अढळपद मिळवून दिले, त्या सर्व कवींनी काव्यनिर्मिती प्रक्रियेचा सखोल विचार केलेला आहे. तो आधी लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.
केशवसुतांनी तर आनंदीरमण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. कविता म्हणजे आकाशीची वीज आहे ती धरू पाहणारे शेकडा ९९ आपणास होरपळून मात्र घेतात. मी अशा नव्याण्णवांपैकीच आहे. म्हणजे यामधून हे स्पष्ट होते की कवितेसाठी झुरून झुरून तिच्या निर्मितीस्तव होरपळणे केशवसुतांना अपेक्षित आहे. याचा अनुभव त्यांनी नक्कीच घेतला असणार म्हणून ‘झपूर्झा’ कवितेत ते म्हणतात, ‘जाणिवेच्या ज्ञात कुंपणावरून धीर धरत उड्डाण करत ही प्रतिभारुपी वीज नेणिवेच्या अज्ञाताच्या प्रदेशात जाते. तिथे तिला अंधूक आकृती दिसतात, ज्या सतत गूढ गीत गात असतात आणि त्यातून मग त्या गीताचे ध्वनी निर्माण होतात आणि काव्यनिर्मिती होते’.
कवी ‘बीं’ नी तर काव्याची व्याख्याच केली आहे. "सौंदर्याची दिव्य प्रस्फुरणे आणि मूर्तिमंत सौंदर्य म्हणजेच काव्य" असे ते म्हणतात. काव्यनिर्मितीच्या बाबतीत तर कोणकोणत्या गोष्टींना मज्जाव केलेला असतो, ते सांगताना ते म्हणतात की, निर्मितीचा जो उत्कट क्षण असतो त्यावेळेला इंद्रियानुभूती जाणवत नाही. बुद्धीचे मापक लावून त्याचे प्रमाण ठरविता येत नाही. वृत्ती मधली कठीणता टाकूनच त्या प्रक्रियेशी एकरूप व्हावे लागते आणि जेव्हा हे सर्व साधेल तेव्हाच तो खरा काव्यानंद नि:स्संगपणे उपभोगता येईल, असे बी म्हणतात.
तर गोविंदग्रजांच्या दृष्टीने केवळ सौंदर्याचा आलेख, शोभा म्हणजे काव्य नव्हे तर काव्य कराया जित्या जिवाचे जातिवंत करणेच हवे. काव्य निर्माण करायचे असेल तर तुमचे भावहृदय जिवंत असायला हवे. नुसतेच अर्थरहीत सौंदर्याचे लेणे ल्यायलेले बोल काही खरे नाहीत. त्यामध्ये दर्जेदार आशयाचा प्राणही आवश्यक असतो.
कवीवर्य भा. रा. तांबे यांनी देखील "कविता ही परमोत्कर्षास गेलेल्या भावनांचा उद्गार होय" , असे वारंवार अापल्या पत्रव्यवहारातून मांडले अाहे. निर्मितीप्रक्रिया मूळात गूढ अाहे ती केव्हा, कशी स्फुरेल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. एकीकडे कवीने कमळाच्या प्रेरणेतून प्रतिभारुपी काव्यमध रसिकांना पाजावा व रसिकानेही तो तितक्याच निश्चलतेने अास्वादावा अशी अपेक्षा करणारे तांबे, ‘मधुघटचि रिकामे पडति घरी!’ या जाणिवेने शंकीतही होतात. तांबेच काय पण प्रत्येक कवी मनातल्या मनात या दोन्ही भावनांनी झपाटलेला असतो. निर्मितीचे समाधान अाणि ही निर्मितीक्षमता कोणत्या क्षणी नष्ट होईल, याची भीती त्याला सतत भेडसावत असते.
निर्मितीपूर्व भय, त्यातील अात्मनाश अाणि परत निर्मितीचाच जन्म याबद्दल ग्रेस म्हणतात, "निर्मितीनाशाचे भय म्हणजे जसा निर्मितीचा नाश नव्हे, तद्वतच तो निर्मितीचाही नाश नव्हे. तर या भयाच्या दोलायमान अवस्थेवर अांदोलित होणारी सतेज निर्मितीशीलतेची वैराण, अनाथ अवस्था, तिचा निदिध्यास असे काहीसे कंप मला या अवस्थेत जाणवतात". मुळात प्रत्येक कवीला अापल्या सौंदर्यनिर्मितीचा संकेत अोळखता येतो, किंबहुना तो अोळखता यायला हवा. दैनंदिन जीवनात कितीतरी संवेदना अापल्यापर्यंत येत असतात, पण त्या सर्वच निर्मितीक्षम असतातच असे नाही. यासाठी एकप्रकारचे ‘अॅस्थेटिक जजमेन्ट’ महत्त्वाचे असते ही सौंदर्यानुभूती अाहे, याची जाणीव मुळात तीव्रतेने झाली पाहिजे. तितकी अात्मनिष्ठा असेल तर एखादी संवेदना येऊन भिडते तेव्हा मनात खळबळ माजते. एकप्रकारची अस्वस्थता निर्माण होते. या अस्वस्थेतेशी प्रामाणिक राहता यायला हवे. जोपर्यंत ही खळबळ शब्दात उतरविली जात नाही तोपर्यंत कवी जाणीव अाणि नेणीव या दोन्ही पातळ्यांवर शांत नसतो. ही अशांतताच उत्तम कलाकृतीचे बीज ठरणार असते. यानंतर प्रत्यक्ष निर्मितीसाठी अाशयाच्या अाकृत्या मनात तयार व्हायला लागतात. त्यांचा जेव्हा फार संयमाने पाठपुरावा होतो, तेव्हा अापोअापच काव्य साकार होते. अर्थात यासाठी कविला भावनात्मक पातळीवर खूप मोल द्यावे लागते. कारण हे सर्व प्रतिभेचे वादळ मनात घोंगावत असते.
काव्यप्रक्रिया ही कोळ्याच्या जाळ्यासारखी असते. अापण हे जाळे प्रथम बघतो तेव्हा त्याचे वीणकाम पाहून थक्क होतो. पण, जे वरवर दिसते ते खरे वीणकामच नव्हे. जेव्हा त्या जाळ्यावर उन्हाची तिरपी पडते तेव्हाच त्यातील खरे सूक्ष्म धागेदोरे उलगडले जातात अाणि त्यातील खरी कलाकुसर दिसू लागते. काव्यनिर्मितीचेही असेच अाहे. वरवरचे वीणकाम तर प्रत्येकच कवीला जाणवते, पण प्रतिभेची तिरीप जोपर्यंत त्यावर पडत नाही तोपर्यंत ती कविता अापल्या सौंदर्यासकट प्रकट होत नाही. प्रत्येक कवीने ही तिरीप पडण्याची वाट बघायला हवी. कारण काव्यनिर्मितीचा काळ ठरीव नसतो. कदाचित ती एका झटक्यात संपूर्ण स्फूर्तीनिशी सुचेल, नाहीतर काही महिने पण लागू शकतील. एखाद्या संवेदनेचा, अाघात अापल्यावर कसा होतो त्यावर हे सर्व अवलंबून असते.
काव्यप्रक्रिया ही कोळ्याच्या जाळ्यासारखी असते. अापण हे जाळे प्रथम बघतो तेव्हा त्याचे वीणकाम पाहून थक्क होतो. पण, जे वरवर दिसते ते खरे वीणकामच नव्हे. जेव्हा त्या जाळ्यावर उन्हाची तिरपी पडते तेव्हाच त्यातील खरे सूक्ष्म धागेदोरे उलगडले जातात अाणि त्यातील खरी कलाकुसर दिसू लागते. काव्यनिर्मितीचेही असेच अाहे. वरवरचे वीणकाम तर प्रत्येकच कवीला जाणवते, पण प्रतिभेची तिरीप जोपर्यंत त्यावर पडत नाही तोपर्यंत ती कविता अापल्या सौंदर्यासकट प्रकट होत नाही. प्रत्येक कवीने ही तिरीप पडण्याची वाट बघायला हवी. कारण काव्यनिर्मितीचा काळ ठरीव नसतो. कदाचित ती एका झटक्यात संपूर्ण स्फूर्तीनिशी सुचेल, नाहीतर काही महिने पण लागू शकतील. एखाद्या संवेदनेचा, अाघात अापल्यावर कसा होतो त्यावर हे सर्व अवलंबून असते.
मर्ढेकरांनी या अाघाताचे दोन प्रकार सांगितले अाहेत. पहिला ज्यामध्ये एकदम तेजस्वी वीज दगडावर पडते, अाणि दगड तत्काळ दुभंगतो. त्याचप्रमाणे प्रतिभेचा उद्रेक असा काही होतो की एकदम अप्रतिम काव्य जन्माला येते. वाल्मीकी ऋषींनी पारध्याने मारलेल्या बाणामुळे विद्ध होऊन प्राण सोडणारा क्रौंच पक्षी बघितला अाणि त्यासाठी विलाप करणारी त्याची जोडीदारीण बघितली, त्या बरोबर त्यांच्या मन:पटलावर असा काही अाघात झाला की अचानक उत्स्फुर्तपणे तोंडून निघाले,
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम:शाश्वती: समा:।
यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधी:काममोहितम्।।
यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधी:काममोहितम्।।
तर दुसऱ्या प्रकारचा अाघात म्हणजे एखाद्या दगडावर बरेच वर्ष थेंब थेंब पाणी पडत असते अाणि कालांतराने तो दगड दुभंगतो. म्हणजेच घटना, अनुभव तुमच्या जीवनात येतात, पण ते नकळत कुठेतरी मनात दडून बसतात. वरवर जरी अापण ते विसरलो असलो तरी सुप्तावस्थेत भावनेवर त्याचा निश्चित परिणाम झालेला असतो. अाणि मग कालांतराने त्यावर कविता जन्माला येते. कवीचे एकच काम असते की तो अाघात बरोबर त्याने अोळखावा, पचवावा अाणि मगच काव्यसृजन करावे.
काव्यनिर्मितीची प्रेरणा बनणारे अाघात फार अतर्क्य स्वरुपाचे असतात. विविधांगी रुपाच्या या प्रेरणा असतात;अाघात असतात. कधी दिवसभराचा मनाचा व्यावहारिक व्यापार संपला की जेव्हा मन निवांततेच्या, नीरवतेच्या अावरणात शिरलेले, बंदिस्त असते, तेव्हा मध्यरात्रीच्या गाढ झोपेतही सुप्त अवस्थेतील मनातून कविता जन्म घेते. कुणासाठी निसर्गातील ऋतूबदलांचा काळ हा अाघात ठरतो अाणि त्या अवस्थेतून काव्य जन्माला येते. तर कधी वळिवाचा येणारा अवचित पाऊस किंवा पानगळींचा वर्षाव, पानाचा अोलसर खच ही अाघातांची कारणे ठरू शकतात. तर काहींसाठी अभिजात दु:खच इतके असते की त्या अाघाताने प्रतिभेचा दगड कायम दुभंगलेलाच असतो. याचे स्वरुप इतके अस्पष्ट असते ते सहजासहजी पकडता येत नाही.
अापल्या मनातून अापल्याशी कुणी बोलत असल्याचा भास होतो. क्षीण एेकून येणारा अातला अावाज एकांत मिळताच तीव्रपणे एेकू यायला लागतो. सगळ्या बहिर्मुख संवेदना संकुचित होऊन अात्मकोशात गुरफटायला लागतात. या अात्मकोशात प्रतिभेला मूर्त रुप देणाऱ्या तिरीपेसाठी प्रचंड घुसमट सुरु होते. ते निर्मितीचे साकार रुप बाहेर येईपर्यंत हा अात्मकोश कवीच्या जिवाला इतका गुदमरवतो की अाता या अात्मकोशातच अापला नाश अाहे, शेवट अाहे असे वाटायला लागते अाणि हलकासा उजेडाचा शब्दरूप कवडसा मिळतो अाणि काव्य साकार होते. पण, कवी मात्र या अात्मकोशातून एका झटक्यात बाहेर येऊ शकत नाही. त्याच्या मनोसंवेदनेला जेव्हा ज्ञात पातळीवर तो जिवंत असल्याची जाणीव होते, तेव्हा तो त्या कोशाच्या बाहेर येतो.
काव्याच्या अभिव्यक्तीला हे असे प्रचंड घुसमट होणारे धूसर अस्तर कायमचे चिकटलेले असते. या अस्तराचा पोत जितका तलम असेल तितकेच व्यक्त रुपातील काव्यही सौंदर्यपूर्ण कलारूप धारण करणारे असेल.
काव्याच्या अभिव्यक्तीला हे असे प्रचंड घुसमट होणारे धूसर अस्तर कायमचे चिकटलेले असते. या अस्तराचा पोत जितका तलम असेल तितकेच व्यक्त रुपातील काव्यही सौंदर्यपूर्ण कलारूप धारण करणारे असेल.
कवितेच्या बाबतीत असे कधी होत नाही की, चला अाता दिवसभराची कामं अाटोपली अाहे. दुपारचा फावला वेळ अाहे. तर जरा कविता करू किंवा स्त्रीवादी, ज्वलंत घटना, शेतकरी समस्या अशा विषयांवर मागणी तसा पुरवठा म्हणून कविता करू. काव्य निर्मितीप्रक्रियेच्या या सर्व बाबी अापण जेव्हा लक्षात घेऊ तेव्हा एक चांगली कलाकृती जन्म घेईल. शेतात पेरणी झाल्यावर पीक यायला देखील ठरावीक वेळ जाऊ द्यावा लागतो. मूल जन्माला यायला सुद्धा नऊ महिन्याचा कालावधी असतो, मग काव्यसृजनाची घाई का करावी? कवीला परमोच्च अानंद मिळवून देणाऱ्या सृजनाची देखील संयमाने वाट पाहणेच योग्य.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
२१-०४-२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
@डॉ.अमृता इंदूरकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल
#अमृतवेल