Sunday, February 24, 2019

अलक्षित समाजवास्तवाचा वेध घेणारा नाटककार

अलक्षित समाजवास्तवाचा वेध घेणारा नाटककार

— डाॅ. अमृता इंदूरकर

सर्वप्रथम १९८० च्या सुमारास दलित नाटकाचा प्रारंभ झाला असला तरी नाटक या स्वतंत्र वाङ्मय प्रवाहाचा विचार करता त्याचा आरंभ १९५६ साली म. भी. चिटणीस यांच्या ‘युगयात्रा’ या नाटकाने झाला. परंपरेने दलितांवर हाेणाऱ्या अत्याचाराचे चित्रण प्रस्तुत नाटकातून येत असले तरी या नाटकाने पुढील दलित नाट्यलेखकांना लेखनाची प्रेरणा दिली. त्यातूनच त्या काळात वि. तु. जाधव, नामदेव व्हटकर, मा. का. कारंडे याशिवाय अधिक पुढे टेक्सास गायकवाड, कमलाकर डहाट, अरुणकुमार इंगळे, रामनाथ चव्हाण, प्रकाश त्रिभुवन, संपत जाधव, गोपाळ सोनारीकर, रुस्तुम अचलखांब, हेमंत खोब्रागडे, दत्ता भगत आणि शिल्पा मुंब्रसकर या नाटककार मंडळींनी आपल्या नाट्यलेखनातून दलितांच्या व्यथा, वेदनेला शब्दरूप दिले. 

साहित्यात जेव्हाही एखादा नवा प्रवाह निर्माण होतो, त्यावेळी त्यामध्ये लेखन करणाऱ्यांमुळे तो एका उंचीवर गेलेला असतो. पण कालौघात त्या प्रवाहामध्ये देखील नव्या जाणीवांच्या अभावामुळे एक प्रकारचे आवर्त तयार होते व कलाकृतींचा प्रभाव कमी व्हायला लागतो. अशावेळी या प्रवाहाला नव्याने केवळ उंचीच नाही तर खोली, व्यापकता व घनता याचे वेगळे परिमाण देणारा, या जाणिवांमधल्या नव्या कक्षांचा वेध घेणारा ताकदीचा लेखक हवा असतो. दलित नाट्यप्रवाहाबाबत मधल्या काळात काहीसे असेच झाले होते. पण, ही मरगळ दूर करणारा, वेगळ्या वाटा चोखाळणारा नाटककार दलित रंगभूमीला १९८० साली प्रेमानंद गज्वी यांच्या रुपाने मिळाला. 

१५ जून १९४७ रोजी जन्मलेले प्रेमानंद गज्वी यांची चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव ही जन्मभूमी. बालपण नागपूर जिल्ह्यातील कारगाव येथे गेले. जन्माने वैदर्भीय असणाऱ्या गज्वी यांची कर्मभूमी मात्र मुंबई आहे. २२, २३ तसेच आज २४ व उद्या २५ फेब्रुवारीला नागपुरात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे प्रेमानंद गज्वी हे नियोजित अध्यक्ष आहेत, ही गौरवाची बाब आहे. गज्वी यांच्या निमित्ताने समाजातील विविध रूढी, परंपरा, अन्यायांना आपल्या नाट्यकृतीतून वाचा फोडणारा, वेगळ्या विषयांना नाट्यरूप देणारा एक अग्र नाटककार संमेलनाध्यक्ष म्हणून प्राप्त झाला आहे. 

एक नाटककार म्हणून आपली लेखनप्रेरणा, त्याचे बीज कशामध्ये आहे हे स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘हे जग सुंदर कसे होईल या ध्यासातून मानवीमन, समाजभान, राष्ट्रमत, जनमत समजून घेण्याच्या चिंतनशिलतेतून वाङ्मयीन लेखन व समाज संरचनात्मक कार्य घडले आहे.’ नाटककार म्हणून गज्वी यांचा मूळ पिंड गंभीर लेखकाचा आहे. नातेसंबंधातील गुंतागुंत, कौटुंबिक तिढे तर कधी अतिजिव्हाळ्याचे संबंध यांचे चित्रण करण्यापेक्षा समाजामध्ये आजही कितीतरी अलक्षित असे वास्तव अव्यक्तच आहे. हे सामाजिक, राजकीय अलक्षित वास्तव गज्वींना नेमके टिपण्यात अधिक रस आहे. जेणेकरून त्यांचा प्रेक्षक सततच विचारप्रवृत्त झाला पाहिजे. नाटक बघणाऱ्या, वाचणाऱ्या प्रत्येकाला हे वाटले पाहिजे की, आपण ज्या समाजात सुखेनैव जगत आहोत, त्याच समाजात जगणाऱ्या काहींचे आयुष्य इतके विद्रूप भीषण आहे की, आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. या आंतरिक निकडीतूनच ‘एक गाव, एक पाणवठा’ सारखी एकांकिका सर्वप्रथम जन्माला आली. ‘देवनवरी’ हे त्यांचे पहिले नाटक जे खरेतर जयवंत देसाई यांच्या आग्रहाखातर एकांकिकेचे नाटक झाले. देवदासी म्हणजे देवाला सोडलेली, देवाशी लग्न झालेली अशी स्त्री. जिला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नाही. म्हणायला देवाला सोडलेली, पण दुसऱ्या बाजूने समाज उपभोग्य स्त्री. अशा या देवदासीवरील कलाकाराची बातमी वर्तमानपत्रात वाचून गज्वी यांच्यासारख्या समाजसंवेदनशील नाटककाराला ‘देवनवरी’ चे नाट्यकथाबीज सापडते. देवनवरीबद्दल नाटककार विजय तेंडुलकर म्हणतात, ‘आपल्यापाशी असलेल्या माध्यमातून गज्वींनी एक सामाजिक, अन्याय बोलका केला आहे. कोणत्याही अन्यायात त्यांना तीव्र नाट्य दिसते. अन्याय सहन केलेल्यांमध्ये सहजपणे ते नाट्य धरतात. आपल्याला जाणवलेल्या आशयाशी प्रामाणिक राहू इच्छितात.’ 
यानंतर गज्वी यांनी ग्रामीण जीवनातील जातीय गुंता उलगडणारे ‘वांझ माती’ हे नाटक वेठबिगारांचा मुक्तीसंघर्ष मांडणारे ‘तनमाजोरी’ हे नाटक, समर्थ रामदासांना एका वेगळ्या आयामातून मांडणारे ‘जय जय रघुवीर समर्थ’ ही नाटके लिहिली. स्वातंत्र्योत्तर काळापासूनच समस्याकेंद्री विद्रोही नाटकेच लिहिली जात होती. पुढे त्यामध्ये तोचतोचपणा यायला लागला होता. नेमक्या याचवेळी गज्वी यांनी या तोचतोचपणावर मात करीत दलित रंगभूमीच्या सर्वच सीमारेषा ओलांडल्या. त्या ओलांडणारे निमित्त ठरलेले नाटक म्हणजे ‘किरवंत’. जे गज्वी यांच्या नाट्यवाङ्मयाच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरते व गज्वी ‘किरवंतकार’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आतापर्यंत स्वजातीतील दु:खवेदनेचा वेध घेणारे गज्वी ‘किरवंत’ मधून मात्र जातीमर्यादा ओलांडून केवळ वेदनेशी, समस्येशी नाते जोडताना दिसतात. केवळ दलितच नाही तर समाजात जो जो उपेक्षित, शोषित, बहिष्कृत, तिरस्कृत आहे, त्या सर्वांना कवेत घेणारी ही गज्वींची रुढ अर्थाच्या दलित चौकटीच्याही पलीकडे जाऊन बघणारी जीवनदृष्टी दिसते. 

किरवंत म्हणजे मरणोत्तर क्रिया करणारा ब्राह्मण. कोंकणात हा ब्राह्मण किरवंत म्हणविला जातो. धर्मशास्त्रानुसार मरणकार्य हे पुण्याचे काम असले तरी प्रत्यक्षात मात्र, ब्राह्मण समाजाकडूनच दलितांसारखे बहिष्कृत जगणे यांच्या वाट्याला येते. कुठल्याही मंगलकार्यात या किरवंतांना निमंत्रण नसते. आज ब्राह्मण समाजाला देखील माहीत नसेल की, ब्राह्मणांमध्येही किरवंत प्रकार असतो आणि त्याच्या वाट्याला ते ब्राह्मणत्वही इतर ब्राह्मणांमुळे प्राप्त होत नाही. ‘किरवंत’ मधून गज्वी यांनी समान-जाती यांच्यातील श्रेष्ठ-कनिष्ठ प्रवृत्तीमुळे एखाद्या समाजगटाला दलितत्व लाभते आणि दुसरा श्रेष्ठ ठरतो. प्रत्यक्ष धर्म-मते आणि व्यवहार यात सोयीने सुसंगती-विसंगती येत असते हे मांडण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकाला लाभलेले सामाजिक परिणाम व त्यातून व्यक्त झालेली दलित जाणीव लक्षणीय ठरते. प्रत्यक्ष दलित जीवनाशय नसूनही हे नाटक दलित नाटक ठरते. 

या व्यतिरिक्त राजकीय पार्श्वभूमीवर गज्वी यांनी एक वैचारिक द्वंद्व निर्माण करणारे नाटक लिहिले, ते म्हणजे ‘गांधी-आंबेडकर’. दोन महापुरुषांच्या वैचारिक भिन्नतेच्या कारणांचा शोध घेणारे हे नाटक आहे. अस्पृश्यता कायमची नष्ट झाली पाहिजे, हा हेतू या दोघांचाही असून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तेव्हाही दोघे एकत्र का नाही येऊ शकले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या गरजेतून हे नाटक आकाराला आले. एकाच नाटकात दोन नायक घेऊन संपूर्ण नाटकच त्यांच्याभोवती फिरते ठेवणे, ही अजब किमया गज्वींना यात साधली आहे. इतक्या गंभीर विषयामध्ये या दोन नायकांना जोडणारा दुवा म्हणजे चक्क विदुषक हे पात्र म्हणजे तर गज्वींमधल्या अनवट प्रयोगशील नाटककाराला व्यक्त करते. शिवाय एक लेखक म्हणून, व्यक्ती म्हणून गज्वी यांच्या विचारतराजूंना आंबेडकरांकडे झुकला ना महात्मा गांधीकडे हे अतिशय महत्त्वाचे. 

यानंतर गज्वी यांनी विविध विषयांना स्पर्श करणारी बरीच नाटके लिहिली. ‘पांढरा बुधवार, रंगयात्री, नूर मोहम्मद साठे, शुद्ध बीजापोटी, व्याकरण, अभिजात जंतू, द बुद्धा, छावणी, घोटभर पाणी, बेरीजवजाबाकी, कृष्णविवर, उतारा’ या एकांकिकांचे लेखनही केले. या सर्वच कलाकृतींमधून केवळ दलित नाटककार असे मर्यादित न राहता समाज- माणूस, माणूस- माणूस, समाज- समाज यांचा संघर्ष व यातील आंतरसंबंधाचा वेध घेतला. हे करताना त्यांची शैली देखील प्रयोगशील राहिली. या शैलीचा अविष्कार प्रचारकी नव्हता, आवेशपूर्ण नव्हता, पण प्रेक्षकांपर्यंत वास्तवाची दाहकता पोहोचवणारा होता.

प्रेमानंद गज्वी हे नव्वद टक्के नाटककार आहेत तर उरलेल्या दहा टक्क्यांमध्ये त्यांच्यामध्ये एक कवी, कथाकार, कादंबरीकार, वैचारिक लेखन, पटकथाकार इत्यादी वाङ्मयप्रकारांचे पैलू देखील आहेत. कवी मनाचे भावविश्व उलगडणारा ‘एकतारी’ हा कवितासंग्रह ‘लागण’ आणि ​‘ढिवर डोंगा’ या कथा. याशिवाय वैदर्भीय बोली भाषेतील ग्रामीण जीवनाचा वेध घेणारी ‘जागर’ ही कादंबरी, ‘हवे पंख नवे’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर : चरित्र आणि चारित्र्य दर्शन यावर आधारित कादंबरी. वैचारिक लेखनामध्ये त्यांनी भारताचा पाच हजार वर्षांचा सामाजिक- सांस्कृतिक- राजकीय- धार्मिक चळवळीचा इतिहास ‘बोधी कला- संस्कृती’ मधून मांडला. ज्ञानासाठी कला... हे सूत्र सिद्ध करणारी वाङ्मयीन मांडणी ‘आर्ट फॉर नॉलेज’ मधून केली. १९९० साली दूरदर्शनवरील ‘घर’ या मालिकेचे पटकथा, संवाद, गीत लेखन, अजिंठा- वेरूळचा अभ्यास दौरा आयोजित करून स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकलांचा अभ्यास केला आणि या आगळ्या-वेगळ्या उपक्रमावर ‘अजिंठा नाट्यलेणी’ या ग्रंथाची संकल्पना व संपादन त्यांनी केले. जवळ- जवळ सर्व वाङ्मय प्रकारांमध्ये मुशाफिरी करणारे नाटककार प्रेमानंद गज्वी ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आहेत. ही सर्व नाट्यरसिकांसाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. 

(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
डॉ.अमृता इंदूरकर,नागपूर

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, February 3, 2019

तुम्ही द्वैभाषिक की बहुभाषिक?

तुम्ही द्वैभाषिक की बहुभाषिक?

तुम्हाला भाषा आवडतात का?भाषा कुणाला नाही आवडत? सर्वांनाच आवडतात. कारण भाषा हा मानवाच्या विचारांचा आरसा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची मातृभाषा त्याला प्रिय असतेच. पण, मातृभाषेव्यतिरिक्त तुम्हाला इतर भाषा देखील आवडतात का? मातृभाषेव्यतिरिक्त अजून किती व कोणकोणत्या भाषा तुम्हाला अवगत आहेत? नव्या, विविध भाषा परिश्रमपूर्वक आत्मसात करायला व तद्भाषी व्यक्तीशी, समुहाशी संवाद साधायला आवडतं का? असे केल्याने तुमच्या भाषिक व्यक्तिमत्त्वामध्ये फरक जाणवतो का? फार वेगळे वाटतात नाही का हे सर्व प्रश्न! कारण आपल्या अवतीभोवती असे कितीतरी लोक असतात किंवा विशिष्ट समुदाय असतो जो एकापेक्षा अधिक भाषा अवगत असणारा असतो. कदाचित आपणही त्यातलेच असाल. पण, मुळात व्यक्तीने द्वैभाषिक किंवा बहुभाषिक असणे हे आपल्याला वाटते तितके सोपे नाही. समाजशास्त्रीय भाषाअभ्यासाअंतर्गत या दोन्ही संकल्पनांना फार महत्त्व आहे.

संज्ञापन व्यवहार

एखादी व्यक्ती किंवा विशिष्ट प्रांतातील, देशातील समाजगट दोन भाषांमधून भाषाव्यवहार करते, तेव्हा या प्रकारच्या संज्ञापन व्यवहाराला द्वैभाषिकता म्हणतात. उदाहरणार्थ, कॅनडात फ्रेंच व इंग्लिश या दोन भाषांतून संज्ञापन व्यवहार चालतो. म्हणून कॅनडा हे द्वैभाषिक राष्ट्र मानले जाते. एखादी व्यक्ती द्वैभाषिक संज्ञापन करू शकते. तेव्हा तिला दोन भाषा अवगत असतात. मात्र, या दोन भाषांपैकी एका भाषेवर त्या व्यक्तीचे प्रभुत्व असते, तर दुसरी भाषा कामकाजापुरती, प्रसंगानुरूप, औपचारिक संज्ञापनव्यवहारात ती उपयोगात आणत असते.

अभ्यासक्रमात द्वितीय भाषा म्हणून मातृभाषेखेरीज अन्य भाषेचा अभ्यास करून जी भाषा शिकली जाते, ती निजभाषिकाने कमावलेली भाषा असते. त्यामुळे या कमावलेल्या भाषेत आणि निजभावेच्या संपादनात अंतर असते. म्हणूनच कॅनडासारख्या द्वैभाषिक राष्ट्रात द्वैभाषिक शाळा (Bilingual Schools) असून फ्रेंच व इंग्रजी या दोन्ही भाषांत समान प्रभुत्व असावे, यासाठी द्वैभाषिक माध्यमाचा अवलंब केलेला दिसून येतो.

कारणीभूत गोष्टी

द्वैभाषिकतेच्या संदर्भात अजून एका प्रकाराचा समाज भाषाविज्ञानाने विचार केलेला आहे, हे समजून घेण्यास उपयोगी पडतो. तो म्हणजे ‘एककालिन द्वैभाषिकत्व’ (Simultaneous Bilingualism). लहान मूल जेव्हा एकाच वेळी दोन भाषा शिकते त्यावेळी ते एककालिन द्वैभाषिक बनत असते. लहान मूल एककालिन द्वैभाषिक बनण्यामागे पुढील गोष्टींचा प्रभाव कारणीभूत असतो.

१) अशा मुलांच्या पालकांची दोन भाषांमध्ये बोलण्याची क्षमता असणे.
२) पालक किती व कशा प्रमाणात मुलांशी बोलताना या दोन भाषांचा वापर करतात.
३) घरातील लहान मूल (Sibling) कुटुंबातील इतर सदस्यांसोबत कोणती भाषा बोलते.
४) मूल बाहेर त्यांच्या लोकसमुदायामध्ये कोणत्या भाषेचा वापर करतात.
५) कोणत्या भाषेतून मूल शिक्षित होत असतं किंवा शिक्षण घेत असतं.

अशा पद्धतीचे एककालिन द्वैभाषिकत्व दाक्षिणात्य लोकांमध्ये बघायला मिळते. दाक्षिणात्य कुटुंबात वाढणारे मूल एकाचवेळी तामिळ व इंग्रजी अशा दोन्ही भाषा शिकत असते. पाश्चात्य देशात ट्युनिशिया आणि मोरोक्को येथे बराच उच्चभ्रू समाज असा आहे जो फ्रेंच आणि अरेबिक या दोन भाषांच्या बाबतीत एककालिन द्वैभाषिकत्व जपताना दिसतो. समाजात अशा कितीतरी कुटुंबांमधील मुलं पालकांकडून घरी एक भाषा शिकतात, शाळेमधून दुसरी आणि विविध भाषक मित्रपरिवाराकडून तिसरी. इथूनच पुढे एकभाषिकत्व, द्वैभाषिकत्व अथवा एककालिन द्वैभाषिकत्व आणि बहुभाषिकत्व अशा पद्धतीने भाषाअर्जनाला प्रारंभ होतो. Monolingual - Bilingual- Multilingual, असा हा क्रम असतो.

स्थायी द्वैभाषिक समाजगट

समाजातील द्वैभाषिकतेचा अनेक अंगांनी अभ्यास केला जातो. या द्वैभाषिक उपयोजनामागे सामाजिक स्तरभेदांचा जो परस्परसंबंध असतो ते देखील एक प्रमुख कारण आहे. सामान्यत: निम्नस्तरीय लोक एकभाषिक असतात, परंतु उच्चवर्गीय, अभिजन हे द्वैभाषिक असतात. सामान्य माणूस दुसरी भाषा प्रसंगपरत्वे समजू शकतो. परंतु, लिहू व बोलू शकत नाही. हिंदी जाणणारा एखाद्या वेळेस पंजाबी समजू शकेल, पण लिखित स्वरूपातील गुरुमुखी पंजाबी वाचू व लिहू शकणार नाही. पण, समाजात काही द्वैभाषिक संज्ञापन व्यवहार करणारा समुदायही आहे. अशांना स्थायी द्वैभाषिक (Stable Bilingual) समाजगट म्हणतात.

मग बहुभाषिकता म्हणजे काय ते पण जाणून घेऊ या. सर्व भाषिक जातींना लागू होणारी बहुभाषिक व्यक्तीची संज्ञा समजून घ्यायची असेल तर ती अशी -

बहुभाषिकता म्हणजे?

बहुभाषिक व्यक्तीला पॉलिग्लॉट (Pollyglot) म्हणतात. पॉली म्हणजे बहु आणि ग्लॉट म्हणजे भाषा/ भाषी म्हणजेच बहुभाषी, अशी ही संज्ञा आहे. एखाद्या व्यक्तीच्या किंवा समाजाच्या, देशाच्या संज्ञापन व्यवहारात तीन किंवा त्याहून अधिक भाषांचा उपयोग केला जातो. तेव्हा अशा संज्ञापन व्यवहाराला बहुभाषिकता म्हणतात. जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात एकभाषकापेक्षा बहुभाषकांची संख्या जगात अधिक आहे. एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक भाषांमध्ये मौखिकरीत्या, लिखित स्वरुपात किंबहुना गायनामधूनही सक्रीय असते तर काही भाषांमध्ये त्याच व्यक्तीची श्राव्यक्षमता, वाचनक्षमता ही थोडी अक्रियाशील असते. पण, रितसर ती भाषा ग्रहण न करताही समजू शकते, अशा दोन तीन किंवा त्याहीपेक्षा अ​धिक भाषा अवगत असणाऱ्या व्यक्तीला बहुभाषिक आणि त्रैभाषिक, असे देखील म्हणतात.

नेटीव्ह स्पिकर

भारत, मलेशिया, आफ्रिका, इस्रायल, सिंगापूर ही राष्ट्रे बहुभाषिक राष्ट्रे म्हणून ओळखली जातात. एखादा देश बहुभाषिक म्हणून ओळखला जातो, याचा अर्थ त्या देशातील सर्वच माणसांना तीन किंवा अधिक भाषांचे ज्ञान असतेच, असे नाही. कारण सर्वप्रथम बहुभाषिक व्यक्ती बालपणापासून त्याची प्रथम भाषा/ मातृभाषा आत्मसात केलेला असतो. अर्थात ही मातृभाषा ती व्यक्ती कोणतेही औपचारिक भाषिक शिक्षण न घेता आत्मसात करते. त्यानंतर औपचारिक शिक्षण घेताना ती व्यक्ती आपोआपच एककालिन द्वैभाषिकत्व आत्मसात करते. पण, एक जन्मजात भाषा येणारा म्हणून ज्याला आपण ‘नेटीव्ह स्पिकर’ म्हणतो. पुढे तो कितीही नव्या भाषा शिकत गेला तरी प्रत्येकवेळी इतर भाषा शिकताना त्याची मातृभाषा/ प्रथम भाषा या भाषाअर्जन प्रक्रियेवर अधिक प्रभाव टाकणारी ठरत असते.

इंग्रजीला जागतिक भाषा म्हणतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जी इंग्रजीभाषक नाही, ती प्रथम शिकलेल्या मातृभाषेची संगती लावतच इंग्रजी भाषा शिकत असते आणि याच पद्धतीने हळूहळू पुढे गरज भासेल तसे बहुभाषिकत्व प्राप्त करीत असते. अर्थात एखादी भाषा आत्मसात करणे आणि संपूर्ण शिक्षणच एखाद्या भाषेच्या माध्यमातून आत्मसात करणे या दोन प्रक्रियांमध्ये फरक आहे.

सामान्यत: एखादी व्यक्ती बहुभाषिक बनते ती पुढीलप्रमाणे -

१) एक भाषा उत्तम प्रकारे समजते, बोलता येते.
२) एकाच भाषेत उत्तम प्रकारे लिहिता येते.
३) त्या त्या लघुक्षेत्रानुसार विशिष्ट भाषेचा उपयोग करण्याचे संकेत ठरलेले असतात.
उदाहरणार्थ, मुंबईतील गुजराती व्यापारी घरी गुजराती बोलेल. व्यवसायक्षेत्रात, बाजारात मराठी अथवा हिंदी बोलेल. गिऱ्हाईक कोणता भाषक आहे ते समजून आणि परकीय प्रांतात अथवा देशात व्यवसायासंबंधी गेला असता इंग्रजी बोलेल.
आपल्या भाषिक समाजात ज्ञान, विज्ञानाची भाषा, धर्माची भाषा आणि व्यक्तिगत संभाषणाची भाषा असे भाषिक गट पडल्यामुळे हे गट व्यक्तीला बहुभाषिक बनण्यासाठी कायमच मदतनीस म्हणून सिद्ध होतात. भारतात असे भाषिक वैविध्य असल्याकारणाने भारतात त्रिभाषासूत्राचा वापर होतो.
नव्या सर्वेक्षणानुसार मानसोपचारतज्ञ देखील म्हणतात की, व्यक्ती जितकी बहुभाषिक असेल तितका त्या व्यक्तीचा मेंदू सक्रीय असतो. तेव्हा सर्वच भाषांवर प्रेम करा आणि नवनव्या भाषा आत्मसात करीत राहा. स्वत:ला एकभाषिकत्वाकडून बहुभाषिकत्वाकडे घेऊन जा!

धन्यवाद!

डॉ.अमृता इंदूरकर

(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)